शुक्रवार, १८ ऑक्टोबर, २०२४

संस्कृत अध्ययन भाग 2

 लेखांक 2


.बुधकौशिक ऋषींबद्दल फारशी कोणाला माहिती नाही पण त्यांनी लिहिलेला मंत्र अजरामर आहे, जो रामरक्षा म्हणून आपल्या सर्वांनाच माहित आहे. असे म्हणतात की ऋषींना भगवान शंकरांनी हे स्तोत्र स्वप्नात सांगितले जे त्यांनी सकाळी उठल्यावर लिहून काढले. (रामरक्षा 15)

संस्कृत मध्ये अनुष्टुभ (स्तुन्भ धातू) म्हणजे गुणगान करणे, प्रशंसा करणे.

अनुष्टुप् छंदात मंत्र लिहिता लिहिता बुधकौशिक ऋषींनी संस्कृतचे व्याकरण सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जसे रामरक्षेतील 37 वा श्लोक. ह्या श्लोकाची आपण विस्ताराने माहिती करून घेऊ.

रामो राजमणि: सदा विजयते रामं रमेशं भजे । 

रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नम: ।। 

रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोSस्म्यहम्‌ । 

रामे चित्तलय: सदा भवतु मे भो राम मामुद्धर ।। रामरक्षा 37।।

रामः  राजमणि

रम् धातू रमणे ह्या पासून तयार झालेले राम हे प्रातिपदिक. 

रम्+अ=राम 

रामः राम अकारान्त पु. प्र. ए. व. 

अशा पद्धतीने 13 स्वरांची (अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, ऋ, दीर्घ ऋ, लृ) प्रातिपदिके तयार होतात. 

राजमणि हा सामासिक शब्द राम नामाचे विशेषण म्हणून वापरले आहे. ह्या समासाचे विश्लेषण करण्यापूर्वी समासाचे प्रकार जाणून घेऊ. 

1. तत्पुरुष समास - दोन शब्दांनी तयार झालेला ह्या समासातील उत्तर पद अर्थाच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. जसे देवालय देवस्य आलयः, ह्यातील आलय हा शब्द महत्त्वाचा. 

ह्याचे दोन प्रकार आहेत 

अ) कर्मधारय समास हा मुख्यत्वे विशेष्य विशेषणापासून बनतो. 

ब) द्विगुसमास ह्याचे पूर्वपद संख्यावाचक असते. उदा. त्रिलोकी त्रयाणां लोकानां समाहाराः 

2. द्वन्द्वः 

3. बहुव्रीहीः 

4. अव्ययभावः

राजमणि राजसु मणिः राजांमधील श्रेष्ठ, हे रामासाठी विशेषण वापरले आहे. 

संस्कृत भाषेतील नियमाप्रमाणे जे व्याकरण विभक्ती विशेष्याचे तेच व्याकरण विभक्ती विशेषणाचे. त्याचे सूत्र खालीलप्रमाणे. 

यल्लिङ्गं यद्वचनं या च विभक्ति:। विशेष्यस्य तल्लिङ्गं तद्वचनं सा च विभक्ति: विशेषणस्यापि।।


मागील लेखात आपण प्रत्ययांविषयी जाणून घेतले.

आता आपण उपसर्ग म्हणजे काय ते समजावून घेऊ. 

संस्कृत मधे एकूण उपसर्ग 20 आहेत. "प्रादयः उपसर्गाः क्रियायोगे ।अष्टाध्यायी

प्रादयः (1.4.58) 

उपसर्गाः क्रियायोगे (1.4.59). 

काहिजण ते 22 आहेत असे मानतात. जसे अति, अधि, अनु, अप, अपि, अभि, अव

आड्ः, उत्, उप, दुर्, नि, निर्, परा, परि, प्र, प्रति, वि, सम्, सु. 

उपसर्गासंबंधी दोन श्लोक प्रसिद्ध आहेत. 

"धात्वर्थं बाधते कश्चित् कश्चित् तमनुवर्तते ।

विनिशिष्टि तमेवार्थमुसर्गगतिस्त्रिधा ।।१।।

उपसर्गेण धात्वर्थो बलादन्यत्र नीयते ।

प्रहाराहार-संहार-विहार-परिहारवत् ।।२।।"

आ+ हार: = भोजन 

सम् + हार: = समाप्त होणे

वि + हार: = विहार करणे

परि+हार:=निर्णय घेणे 

प्र+हारः =हल्ला करणे

नुसत्या उपसर्गांचा वाक्यात काहीच उपयोग नसतो. मात्र जेव्हा हे उपसर्ग धातूंच्या आधी जोडले जातात, तेव्हा त्यांना अर्थ प्राप्त होतो. अशा उपसर्गांमुळे धातूंचे गुणकार्य होते. जसे 

1. धातू ला नवीन अर्थ प्राप्त करून देणे.

2. मूळ धातू च्या अर्थाची व्याप्ती वाढवणे.

3. काही अकर्मक धातू, सकर्मक होतात

4. काही परस्मैपदी धातू आत्मनेपदी होतात आणि काही आत्मनेपदी धातू परस्मैपदी होतात

5. एकापेक्षा जास्त उपसर्ग लावून नवीन शब्द तयार होतात जसे वि+आ+करण =व्याकरण सम्+आ+लोचन =समालोचन


आता परत मूळ श्लोकाचा अभ्यास करू. 

रामो राजमणि सदा विजयते

 रामः राम अकारान्त पु. प्र. ए. व.

राजमणि राजषु राजस् सकारान्त पु. स. ए. व. 

मणिः मणि इकारान्त पु. प्र. ए. व. 

विजयते वि+जि जयति धातू उत्कर्ष होणे. कर्तरि लट लकार प्र. पु. ए. व. 

आपल्याला क्रियापदांचे तीन काळ माहीत आहेत. त्यांचे संस्कृत भाषेतील विवेचन पुढील प्रमाणे.

लट् वर्तमाने लेट् वेदे भूते लुङ् लङ् लिटस्‍तथा । विध्‍याशिषोर्लिङ्लोटौ च लुट् लृट् लृङ् च भविष्‍यति ॥

अष्टाध्यायी सूत्राप्रमाणे सर्व धातूंचे 10 गणांत विश्लेषण केल्यानंतर त्यापुढे या धातूंचे परस्मैपदी आणि आत्मनेपदी असे वर्गीकरण केले आहे.

आत्मने आत्मन् पु. च. ए. व.

ज्याला द्यायचे त्याची चतुर्थी हा व्याकरण विभक्ती चा नियम आपल्याला माहीत आहेच. त्या उक्तीनुसार स्वतः साठी जी क्रिया केली जाते ते धातू आत्मनेपदी.

परस्मैपदी म्हणजे दुसर्‍यासाठी केलेली क्रिया.

परस्मै पर सर्वनाम  पु. प्र. ए. व.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा