लेखांक 1
संस्कृत वाक्याचा अभ्यास करताना सर्वप्रथम सन्धिविच्छेद करावा लागतो. त्यामुळे वाक्यातील सारे स्वतंत्र शब्द समजतात. त्यांना पद म्हणतात.
मग प्रत्येक पदाचं व्याकरण व अर्थ समजून घेण्यासाठी प्रत्येक पदाचे विश्लेषण करून विवेचनात्मक दृष्टिकोन जोपासायचा. संस्कृत भाषेतील शब्दांचे पृथक्करण तीन प्रकारे करता येते.
1. धातू, यापासून मुख्यत्वे क्रियापदे (तिडःन्त) तयार होतात ती आपल्याला प्रथम, मध्यम आणि उत्तम पुरूष आणि तीन वचने (एक, द्वि. आणि बहु) अशी वाचायला मिळतात. ह्या धातूंनाच निरनिराळे प्रत्यय जोडले की त्याची कृदन्ते तयार होतात. जसे गम् धातू पासून गन्तव्य,आगमन वगैरे.
2. नाम सर्वनाम आणि विशेषण यांच्या मूळ शब्दाला प्रातिपदिक असे म्हणतात. यांची वर्णने लिंगानुसार (पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग), विभक्तीनुसार (एकूण 8 विभक्ती आणि त्यांची तीन वचने एक, द्वि आणि बहु) अशी केली जातात.
3. तिसरा प्रकार अव्यय, जी स्थिर स्वरूपात असतात (यांना विभक्ती आणि वचने नसतात) उदाहरणार्थ 'न', 'च', 'अपि,' 'एव' वगैरे.
संस्कृत भाषेतील प्रत्येक शब्दाचे असे विश्लेषण करून त्याचे मूळ रूप शोधून, त्याची अर्थानुसार कशी व्युत्पत्ती झाली असावी ह्याचा अभ्यास करताना एक वेगळीच अनुभूती मिळते. आपल्या पूर्वजांचे असे शास्त्रोक्त पद्धतीने केलेले काम नेहमीच उत्साहवर्धक आणि अभिमानास्पद वाटते.
माता आणि पिता हे आपल्या नेहमीच्या वापरातील शब्द. कसे तयार झाले असावे?
माता प्रातिपदिक मातृ
माता - मातृ विशेषण स्त्रीलिंग प्रथमा एकवचन.
अशा प्रकारे लिङ्ग, विभक्ति, वचन ह्या क्रमाने विश्लेषण करायचे. असा शब्द एका लयीत, एका ठेक्यात उलगडत जातात.
यापुढे जाऊन अभ्यास केला असता
मा धातू तृच् प्रत्यय
तृच् म्हणजे देणारा /देणारी
कृ धातू +तृच् प्रत्यय कर्तृ
धा धातू +तृच् प्रत्यय धात्री
पा धातू +तृच् प्रत्यय पितृ
कोणत्याही धातूला तृच् प्रत्यय जोडले असता त्याचे विशेषण तयार होते.
आता 'मा' आणि 'पा' धातूंचा अर्थ समजावून घेतल्यानंतर मातृ आणि पितृ हे शब्द कसे समर्पक आहेत ते लक्षात येईल.
मा धातू मोजणे.. जीवाला मोजमाप देणारी ती मातृ.
(जीवाला आकार देणारी)
पा धातू पालन करणे. अर्थात जीवाचे पालनपोषण करणारे पितृ.
संस्कृत भाषेत असे प्रत्यय जवळपास 139 इतके आहेत. त्यापैकी 11 प्रत्यय नेहमी वापरले जातात.
धातू पासून क्रियापदे निर्माण झाली की त्यांची 3 पुरूष आणि 3 वचने अशी 9 रूपे जे प्रत्यय लागून तयार होतात त्यांना तिडःन्त (तिड्ः+अन्त) असे म्हणतात. धातूंच्या गुणधर्मानुसार तिडःन्ताचे दोन प्रकार परस्मैपदी आणि आत्मनेपदी. म्हणजे एकूण तिडःन्त प्रत्यय 9+9= 18, यांचे वर्णन अष्टाध्यायी 3.4.78 ह्या सूत्रात वाचायला मिळते.
जवळपास 2259 धातू आपल्या साठी उपलब्ध आहेत.
प्रातिपदिक तयार होण्याचे मूळ, धातू हेच आहे. जसे बन्ध् धातूपासून प्रातिपदिक तयार झाले बन्धु. हा उकारान्त पुल्लिंगी शब्द अर्थातच 'उ' ह्या प्रत्ययामुळे तयार झाला. ह्याला स्वरान्त प्रातिपदिक असे म्हणतात. अशा प्रत्ययास कृत् प्रत्यय असे म्हणतात. सर्व प्रातिपदिकांची 7 विभक्ती आणि 3 वचनी रूपे (एकूण 21)निरनिराळे प्रत्यय लागून तयार होतात. त्यांना सुप् प्रत्यय म्हणजे सुबन्त असे म्हणतात. ह्या संबंधी माहिती अष्टाध्यायी च्या 4.1.2 ह्या सूत्रात वाचायला मिळते.
आता सर्वनामांच्या प्रत्ययांची माहिती करून घेऊ.
सर्वनामांना स्वतःचे असे लिंग नसते (किंवा सर्वनामे त्रिलिंगी असतात) ते वाक्याच्या अर्थाप्रमाणे ठरते. जसे मी, तुम्ही, अस्मद्, युष्मद् वगैरे. ह्या सर्वनामांची सुद्धा 7 विभक्ती आणि 3 वचनी रूपे असतात. ती ज्या प्रत्ययामुळे तयार होतात त्यांना सुद्धा सुबन्त असेच म्हणतात. अशी सर्वनामांची तिन्ही लिंगांची 63 रूपे आहेत. (21*3)
उदाहरणार्थ
सर्व हे सर्वनाम
पुल्लिंग प्रथमा सर्वः सर्वौ सर्वे
स्त्रीलिंगी प्रथमा सर्वा सर्वे सर्वाः
नपुसकलिंगी प्रथमा सर्वम् सर्वे सर्वाणि
काही अपवादात्मक उदाहरणे दिसून येतात, जसे
अस्मद् व युष्मद् ह्यांची द्वितीया, चतुर्थी व षष्ठी ह्या तीन विभक्तींमधे पर्यायी रूपें पण आहेत. म्हणून ह्यांची सुबन्ते एकूण 30 (21+9).
कृत् प्रत्ययापासून
कर्तृवाचक, विशेषणवाचक, भाववाचक, कर्मवाचक, करणवाचक, क्रियावाचक अशी रूपे तयार होतात. आपल्याला काही कृत् प्रत्यय माहित आहेत. जसे तव्यत्, अनीयर्, क्त, क्तवतु, तुमुन, क्त्वा, ल्यप्, शतृ, शानच् इत्यादी. काही प्रत्यये जसे तुम्, क्त्वा व ल्यप् ह्या कृदन्तांची सुबन्ते असत नाहीत. बाकी सर्व कृदन्तांची सुबन्त रूपे होतात.
कृदन्तांना आणखी प्रत्ययांची जोड लाभली की तयार होणारी रूपे म्हणजे तद्धिते.
तत्+हित तत् म्हणजे तें, हित म्हणजे बनलेले. इथे तत् म्हणजे तें, याचा “आधीच असणारं” असा अर्थ घेतल्यास, “असणाऱ्यापासून बनलेले ” ते तद्धित. उदाहरणार्थ
नम्-धातूपासून कृदन्त तयार नम्र. ह्या विशेषणाला ता-प्रत्यय लागून नम्रता हें भाववाचक नाम. तें तद्धित.
सर्व हें सर्वनाम होय. त्याला शः हा प्रत्यय लागून सर्वशः हें अव्यय बनलं, ते सुद्धा तद्धित.
आता खालील श्लोकाचे व्याकरणानुसार विश्लेषण करू.
उपेन्द्रवज् छंदातील या श्लोकाचा उल्लेख पांडव गीतेत (28) सापडतो. गांधारीने, भगवान श्रीकृष्णांची प्रशंसा करताना असे म्हटल आहे.
त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव। त्वमेव विद्या च द्रविणम त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देवः।।
त्वमेव माता च पिता त्वमेव,
त्वमेव त्वम्+एव
त्वम् तू युष्मद् सर्वनाम प्रथमा एक वचन
एव च (तूच) अव्यय
माता मातृ ऋकारान्त स्त्री. प्रथमा एक वचन
मा धातू मोजणी करणे +तृच् प्रत्यय (देणारा /देणारी)
जीवाला मोजमाप देणारी
च सुद्धा अव्यय
पिता पितृ ऋकारान्त पुल्लिंग प्रथमा एक वचन
पा धातू पालन करणे +तृच् प्रत्यय
जीवाचे पालन करणारा
बन्धुश्च बन्धुः +च
बन्धु पु. प्र.ए. व.
बन्ध् धातू बन्धन असणे +उ प्रत्यय
सखा साथ देणारा सखि पु. प्र. ए. व.
ख्या धातू सखि समान ख्यायते इति
ह्याचे स्त्रीलिंगी रूप सखी (प्रथमा एक वचन)
विद्या स्त्री. प्र. ए. व.
विद् धातू जाणणे +यत् प्रत्यय (यदन्त) जाणून घेण्याजोगे
द्रविणम् (द्रविणस्) धन (धन जे चलित स्वरूपात आहे जंगम मालमत्ता
द्रविण नपु. प्र. ए. व.
द्रु धातू वाहणे +त् प्रत्यय
द्रुत गतीने जाणे
द्रुपद ही महाभारतातील व्यक्तिरेखा अती गतीशील म्हणजेच अस्थिरता दर्शवते.
सर्वं सर्व नपु. प्र. ए. व.
मम माझे अस्मद् ष. ए. व.
देव देवः हे दोन शब्द जोडून लिहिलेले की एकत्र आहेत? जेव्हा दोन शब्दांची संधी झालेली नसते पण ते एकत्र आलेले दिसतात त्याला समास (सम+आस) असे म्हणतात. याचे विग्रह वाक्य मांडणे आवश्यक ठरते.
देवानाम् देवः म्हणजे देवांचा देव असा अर्थ लिहीता येईल.
देवः देव पु. प्र. ए. व.
दिव् धातू उजेड देणे.
आपण सर्व शब्दांचे रूढार्थाने अर्थ समजावून घेतले. आता प्रश्न असा आहे की गांधारी श्रीभगवानकृष्णांना तुम्ही चलन किंवा चलित धन आहात असे का बरे म्हणाली असेल? गांधारीला अशी मध्येच संपत्तीची आठवण का बरे यावी?
त्याचा मला समजलेला अर्थ असा..
सर्व प्रथम श्रीभगवानकृष्णांनी श्रीमद्भगवद्गीतेत स्वतःबद्दल वर्णन केलेले श्लोक आपण समजून घ्यायला हवे.
ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति।भ्रामयन्सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया ॥18.61॥
ईश्वर सर्वांच्या हृदयात विराजमान आहेत आणि सर्वांचे मार्गदर्शक आहेत. तसेच 10 व्या अध्यायातील 15 व्या श्लोकात अर्जुनाने
भूतभावन भूतेश देवदेव जगत्पते ।(सर्व सजीवांचे उद्गम, स्वामी, देवांचे देव आणि ब्रह्मांड नायक) असे वर्णन केले आहे.
गांधार देशातून हस्तिनापुरात आलेली गांधारी आपले पुढील आयुष्यात राजा धृतराष्ट्रांवरच्या रागापोटी डोळे पट्टीने बांधून जगते.
आयुष्यात काहीच शाश्वत नाही, सर्वकाही प्रवाही झाले आहे. आपले आईवडील, सख्या सर्वजण गांधार प्रदेशात मागे राहिले . 100 पुत्र झाले पण ते सुद्धा जीवंत राहिले नाहीत. कपटी असला तरी सख्खा भाऊ शकुनी सुद्धा राहीला नाही. युद्ध टाळण्याचे किती प्रयत्न झाले, आणि ते कोणीकोणी केले? द्रोणाचार्य आणि विदुरा सारखे विद्वान ते सुद्धा राजाज्ञे पुढे हतबल झाले. त्यांची विद्या सुद्धा मूक झाली. फक्त कृष्णनीती टिकून राहीली.
सर्व काही गमावले आहे. आणि आता फक्त श्रीभगवानकृष्णांचाच आधार आहे. तोच आता मार्ग दाखवणार आहे. म्हणून गांधारी आता श्रीभगवानकृष्णांना उद्देश्यून असे म्हणते आहे की
तूच माता, तूच पिता, तूच बंधू तूच सखा, तूच विद्या आणि तूच न टिकणारी संपत्ती, आणि सर्व देवांच्या देवा तूच माझा देव (मार्ग दाखवणारा) आहेस.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा