रविवार, २८ नोव्हेंबर, २०२१

श्रीमद्भगवद्गीता अध्याय 5वा

 कर्म संन्यास योग हे गीतेच्या का पाचव्या अध्यायाचे नाव असून त्यात 29 श्लोक आहेत. ह्यात अर्जुन  श्रीकृष्णाला  कर्मयोग आणि ज्ञान योग ह्या दोन्ही तील फरक विचारत आहे, त्यावर श्रीकृष्णांचे उत्तर असे..

अर्जुन उवाच


संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि।

यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्िचतम्।।5.1।।


अर्जुन उवाच - हे कृष्ण कर्मणाम्‌ संन्न्यासम् पुनः योगम्‌ च शंससि; एतयोः यत्‌ एकम्‌ श्रेयः तत्‌ मे सुनिश्चितम्‌ ब्रूहि।


अर्जुन उवाच - 

हे कृष्ण 

कर्मणाम्‌ कर्मन् ष. ब. व. कर्मांचे 

संन्न्यासम् संन्यास

पुनः परत 

योगम्‌ योग जुळून येणे 

च आणि 

शंससि; शंस् धातू स्तुती करणे 

एतयोः एतद् ष. द्वि व. ह्या दोन्ही चे 

यत्‌ ते 

 एकम्‌ एक 

 श्रेयः श्रेय 

तत्‌ तद् 

मे अस्मद् माझ्या साठी  

 सुनिश्चितम्‌ सु +निश्चितम्, नक्की 

ब्रूहि। सांग 

 ब्रू धातू बोलणे

4 थ्या अध्याया चे नाव होते ज्ञान कर्म संन्यास योग. ह्यातील 4.41 मधे कर्म संन्यासावर विस्ताराने सांगितले आहे. तिसऱ्या अध्यायात कर्मयोगाचे विवरण दिले आहे. 4.33 मधे ज्ञानयोगाची प्रशंसा केली आहे. त्यामुळे अर्जुन संभ्रमित झाला आहे. 

म्हणून तो भगवंतांना प्रश्न विचारत आहे की 

हे कृष्णा 

आधी तुम्ही कर्म संन्यासावर बद्दल सांगितले (स्तुती केली) नंतर कर्म योगा बददल सुद्धा सांगितले. आता मला कृपया नक्की सांगा ह्या दोन्हीमध्ये माझ्यासाठी कोणता मार्ग श्रेष्ठ आहे? 

एकूण अर्जुनाने सोळा प्रश्न विचारले त्यापैकी हा पाचवा प्रश्न..

श्री भगवानुवाच


संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ।

तयोस्तु कर्मसंन्यासात्कर्मयोगो विशिष्यते।।5.2।।


श्रीभगवानुवाच - संन्न्यासः कर्म-योगः च उभौ निःश्रेयसकरौ; तयोः तु कर्म-संन्न्यासात् कर्म-योगः विशिष्यते।।

श्रीभगवानुवाच -

 संन्न्यासः संन्यास

कर्म-योगः च.    आणि कर्मयोग 

 उभौ उभ दोन्ही 

 निःश्रेयसकरौ; (निःश्रेयस्कर) निःसंशय पणे 

 तयोः तद् दोघांमधे 

तु  परन्तु 

कर्म-संन्न्यासात् कर्म संन्यास पेक्षा 

कर्म-योगः

 विशिष्यते।। विशेष गुण सांगणे 

शिष् धातू  गुणगान करणे

श्रीभगवानकृष्ण ( पहिल्या श्लोकात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना) असे म्हणतात की

कर्म संन्यास आणि कर्म योग दोन्हीही सारखेच कल्याणकारी आहेत पण कर्म संन्यासापेक्षा कर्म योग जास्त चांगला आहे.

ज्ञेयः स नित्यसंन्यासी यो न द्वेष्टि न काङ्क्षति।

निर्द्वन्द्वो हि महाबाहो सुखं बन्धात्प्रमुच्यते।।5.3।।


महाबाहो! यः न द्वेष्टि, न काङ्क्षति, सः नित्य- संन्न्यासी ज्ञेयः; हि निर्द्वन्द्वः सः सुखम्‌ बन्धात्‌ प्रमुच्यते।

महाबाहो! हे अर्जुना 

 यः जो

न द्वेष्टि, द्वेष करत नाही 

द्विष् धातू 

 न काङ्क्षति, आकांक्षा ठेवत नाही 

 काङ्क्ष् धातू 

सः तो

नित्य- संन्न्यासी नेहमीच संन्न्यासी 

 ज्ञेयः; ज्ञा धातू जाणून घे. 

 हि नक्की 

निर्द्वन्द्वः. द्वंद्व नसलेला 

 सः तो 

सुखम्‌

 बन्धात्‌ बन्ध बन्धनातून 

 प्रमुच्यते। त्याग करणे, मुक्ति मिळणे 

मुच् धातू मुक्ति मिळणे 

आधीच्या श्लोकात कर्मयोग जास्त श्रेष्ठ आहे असे सांगितले असल्याने त्यावरील विस्तृत वर्णन आता पुढे वाचू.

दोन प्रकारचे लोक आपल्याला पहायला मिळतात.

जसे काही जण सर्वसाधारण लोकांप्रमाणे संसाराच्या बंधनात अडकत नाहीत, संन्यास घेतात आणि त्यामुळे सुख दुःख इच्छा आकांक्षा ह्यापासून लांब असतात.

दुसर्या प्रकारचे लोक संसारात राहून दुसर्‍यांसाठी कर्म करत राहतात. जणू स्वतःसाठी ते जगतच नाहीत. त्यामुळे त्यांच्या मनात ना कोणाबद्दल राग असतो ना चढाओढ. एक प्रकारे संन्यासच हा. (असे म्हटले पाहिजे) मनात कोणत्याही प्रकारचे द्वंद्व नसल्याने सर्व प्रकारच्या सुखाच्या (मिळवण्याच्या धडपडीपासून) बंधनापासून मुक्त असतात.

सांख्ययोगौ पृथग्बालाः प्रवदन्ति न पण्डिताः।

एकमप्यास्थितः सम्यगुभयोर्विन्दते फलम्।।5.4।।


साङ्ख्य-योगौ पृथक्‌ (इति) बालाः प्रवदन्ति, न पण्डिताः। एकम्‌ अपि सम्यक्‌ आस्थितः उभयोः फलम्‌ विन्दते।

साङ्ख्य-योगौ साडःख्य योग 

पृथक्‌ वेगवेगळे करणे 

 बालाः  अज्ञानी 

 प्रवदन्ति, घोषित करणे 

प्र +वद् वद् धातू बोलणे 

न 

पण्डिताः। ज्ञानी

एकम्‌ अपि एकच 

 सम्यक्‌ पूर्णपणे 

आस्थितः स्थिरावले आहे 

 आ+स्थितः आस्था असणे 

उभयोः दोन्हीचे 

फलम्‌ फळ 

 विन्दते। मिळते 

विद् धातू आत्मने पदी मिळणे. 


वैराग्य दोन प्रकारचे आहे असे म्हटले जाते.

फल्गु वैराग्य म्हणजे ज्यांना प्रापंचिक जबाबदारी हा त्यांच्या मार्गातील अडसर वाटतो आणि युक्त वैराग्य म्हणजे प्रत्येक गोष्टीत लोकांना ईश्वराचा अंश दिसतो त्यामुळे आहे त्या परिस्थितीत ते निस्वार्थी पणे काम करत राहतात.

गृहीत्वापीन्द्रियैरर्थान् यो न द्वेष्टि न हृष्यति।

विष्णोर्मायामिदं पश्यन् स वै भागवतोत्तमः।।

(श्रीमद्भागवतम्-11.2.48)

संसारात राहून सुद्धा जो निःस्पृहः तेने, ईश्वराची शक्ती ओळखून काम करत राहतो तो परम भक्त असतो.

म्हणून श्रीभगवान असे म्हणतात की केवळ बालबुद्धीचे (अज्ञानी) लोक कर्म संन्यास आणि कर्म योग वेगवेगळे मानतात. परन्तु ज्ञानी मात्र कोणत्याही एका मार्गाचा अवलंब करून दोन्हीही मार्गांची फलस्वरूप परमात्म्याला प्राप्त करुन घेतात.

यत्सांख्यैः प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते।

एकं सांख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति।।5.5।।


साङ्ख्यैः यत्‌ स्थानम्‌ प्राप्यते, तत्‌ योगैः अपि गम्यते; यः साङ्ख्यम्‌ योगम्‌ च एकम्‌ पश्यति, स पश्यति।

साङ्ख्यैः कर्म संन्यास 

यत्‌ जे 

 स्थानम्‌ प्राप्यते, स्थान प्राप्त होते 

तत्‌ ते 

योगैः कर्मयोगाने 

अपि गम्यते; सुदधा प्राप्त होते 

 यः जो 

साङ्ख्यम्‌ सांख्य 

योगम्‌ च आणि योग 

 एकम्‌ पश्यति, एकसारखेच पाहतात (समजतात) 

 स ते 

 पश्यति। पाहतात. (त्यांनाच समजते)

आधीच्या श्लोकात सांगितल्या प्रमाणे कोणत्याही मार्गाचा अवलंब केला तरी परम तत्त्वाची प्राप्ती होऊ शकते., हेच परत थोड्या वेगळ्या पद्धतीने सांगितले आहे.

थोडक्यात ज्ञानयोग आणि कर्मयोग दोन्ही ची तत्वे आणि उद्दिष्ट सारखेच आहे असे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

म्हणजेच जे कर्म संन्यासाने प्राप्त होईल तेच कर्मयोगाने, आणि ज्याला ह्या दोन्हीकडे समान दृष्टीने पाहता येते तोच समजूतदार आहे.

संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमयोगतः।

योगयुक्तो मुनिर्ब्रह्म नचिरेणाधिगच्छति।।5.6।।


हे महाबाहो! अयोगतः तु संन्न्यासः आप्तुम्‌, दुःखम्‌ योग-युक्तः मुनिः न चिरेण ब्रह्म अधिगच्छति।

 हे महाबाहो! 

अयोगतः अ+योगतः योगरहित 

 तु परन्तु 

संन्न्यासः संन्यासी 

आप्तुम्‌, प्राप्त करतो 

दुःखम्‌ दुःख 

 योग-युक्तः कर्मयोगाने बांधलेला 

 मुनिः मुनी 

 न चिरेण लवकर 

 चिर म्हणजे दीर्घ 

ब्रह्म ब्रह्मन् परम सत्य 

अधिगच्छति प्राप्त करणे 

अधि +गम्

संन्यासींचे दोन प्रकार असतात

1. मायावादी संन्यासी जे सांख्यदर्शनाचा अभ्यास करताना शंकराचार्य भाष्य चे अध्ययन आणि चिंतन  करतात.

2. वैष्णव संन्यासी भागवत संप्रदायी असतात आणि प्रभूची भक्ती करतात, भक्ती करताकरता इतरही कार्य करत असतात.

सांख्ययोगींना सुद्धा सिद्धि होण्यासाठी कर्मयोगाची साधना करणे आवश्यक आहे, मात्र कर्मयोगींना सांख्ययोगाचा अभ्यास करण्याची गरज नाही. कारण सांख्ययोगाचा अभ्यासूने काय प्राप्त केले, आपल्या भावनांवर विशेषतः रागावर नियंत्रण मिळवले का हे या संसाररुपी परिक्षा केन्द्रातच सिद्ध होते 


यस्त्वसंयतषड्‍वर्ग: प्रचण्डेन्द्रियसारथि: ।

ज्ञानवैराग्यरहितस्‍त्रिदण्डमुपजीवति ॥ 11.18.40 श्रीमत् भागवत

भोंदू संन्यासी चे वर्णन केले आहे जो फक्त बाह्य स्वरूपी संन्यासी च्या वेश परिधान करून लोकांना फसवत आहेत त्याला काहीच प्राप्त होत नाही.

म्हणून श्रीभगवान असे म्हणतात की

हे महाबलशाली अर्जुना

भक्तियुक कर्म केल्याशिवाय कर्म संन्यासी होणे अवघड आहे. पण जे कर्मयोगी आहेत त्यांना परम तत्त्वाची प्राप्ती लवकर होते.

योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेन्द्रियः।

सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते।।5.7।।


योग-युक्तः, विशुद्ध-आत्मा, विजित-आत्मा, जित-इन्द्रियः, सर्व-भूत-आत्म-भूत-आत्मा, कुर्वन्‌ अपि न लिप्यते।


योग-युक्तः, कर्मयोगात अधिन असलेला 

विशुद्ध-आत्मा, शुद्ध 

 विजित-आत्मा, मनावर ताबा असलेला 

 जित-इन्द्रियः, इन्द्रियांवर ताबा असलेला 

सर्व-भूत सर्व जीव

आत्मभूत 

आत्मा, 

कुर्वन्‌ अपि काम करत असताना सुद्धा 

 न लिप्यते। अडकून पडत नाही 

लिप् धातू लेप देणे

ह्या श्लोकात आत्मा हा शब्द वेगवेगळ्या प्रकारांनी वापरला आहे जसे बुद्धी मन आणि इन्द्रिय. ह्या सर्वांवर विजय मिळवणारा आत्मा म्हणजे विशुद्ध-आत्मा, विजित-आत्मा आणि जीत-इन्द्रिय आत्मा.

जसे झाडाच्या बुंध्यावर पाणी घातले की ते मूळ, फांद्या, पाने सगळीकडे पोहोचणारच त्याचप्रमाणे कर्मयोगी, ज्याने बुद्धि मन आणि इन्द्रियांवर विजय मिळविला आहे, सर्व जीवांमधे परमात्म्याचे अस्तित्व पाहतो (आणि आपले काम निस्वार्थी पणे करत राहतो) तो त्यात अडकून पडत नाही.

नैव किंचित्करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित्। पश्यन् श्रृणवन्स्पृशञ्जिघ्रन्नश्नन्गच्छन्स्वपन् श्वसन्।।5.8।।

युक्तः तत्त्ववित्‌ पश्यन्‌, शृण्वन्‌, स्पृशन्‌, जिघ्रन्‌, अश्नन्‌, गच्छन्‌, स्वपन्‌, श्वसन्‌, न एव किञ्चित्‌ करोमि इति मन्येत।


युक्तः युक्त 

तत्त्ववित्‌ सत्य जाणणारा 

पश्यन्‌, बघताना 

शृण्वन्‌, ऐकताना 

स्पृशन्‌, स्पर्श करताना 

जिघ्रन्‌, वास घेताना 

 अश्नन्‌, खाताना 

गच्छन्‌, चालताना 

स्वपन्‌, झोपताना 

श्वसन्, श्वास घेताना 

 न एव किञ्चित्‌ करोमि मी काहीच करत नाही 

 इति मन्येत। अशी मान्यता, असा विचार करतो 


प्रलपन्विसृजन्गृह्णन्नुन्मिषन्निमिषन्नपि।

इन्द्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्।।5.9।।

 प्रलपन्‌, विसृजन्‌, गृह्णन्‌, उन्मिषन्‌ निमिषन्‌ अपि, इन्द्रियाणि इन्द्रिय-अर्थेषु एव वर्तन्ते इति धारयन्‌ ।

प्रलपन्‌, बोलत असताना 

प्रलपत् प्र +लप् 

लप् धातू बोलणे 

विसृजन्‌, वि+सृज् सोडून देणे 

 गृह्णन्‌, ग्रहण करतअसताना 

 ग्रह धातू घेणे 

उन्मिषन्‌ उन् +मिष् धातू डोळे उघडणे 

 निमिषन्‌ अपि, डोळे बंद करणे 

 इन्द्रियाणि इन्द्रिय 

 इन्द्रिय-अर्थेषु इन्दियांविषयी 

 एव वर्तन्ते वृत् धातू असणे 

इति धारयन्‌ ।धृ धातू धारण करणे 


सामान्य माणसाला एखादे काम पूर्ण झाले कि त्याचे श्रेय हवे असते. त्याच्यामुळेच हे कार्य संपन्न झाले असे त्याला वाटत असते.

अशाच अर्थाचा आणखी एक श्लोक ज्यात तत्त्ववित्‌ शब्दाचा वापर केला आहे 

विषयोत्थानि सौख्यनि दुःखानां तानि हेतवः ।

उत्पत्तिनाशयुक्तानि तत्रासक्तो न तत्त्ववित् ।।२२।। गणेशगीता 


सत्य जाणणारा योगी, बघताना ऐकताना, स्पर्श करताना, वास घेताना, खाताना, सोडून देताना, चालताना, झोपताना, श्वास घेताना, बोलताना, ग्रहण करत असताना, डोळे उघडताना, डोळे बंद करताना असाच विचार करत असतो कि ह्या सर्व गोष्टींचा कर्ता मी नाही. फक्त त्याचे इन्द्रिय त्या त्या विषयात क्रीयाशील आहेत.


कर्ता बहिरकरतान्तरलोके विहर राघव। 

(योग वाशिष्ठ) हे राघव बाह्य दृष्टीने तू तुझे कर्म करत रहा पण ह्याचा खरा कर्ता ईश्वर आहे हे समजून घे.

ब्रह्मण्याधाय कर्माणि सङ्गं त्यक्त्वा करोति यः।

लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा।।5.10।।


यः सङ्गम्‌ त्यक्त्वा ब्रह्मणि कर्माणि, आधाय करोति, सः अम्भसा पद्म-पत्रम्‌ इव, पापेन न लिप्यते।

यः जो 

 सङ्गम्‌ संगत आसक्ती

 त्यक्त्वा त्यज त्याग करणे 

 ब्रह्मणि ब्रह्म 

कर्माणि, कर्म 

आधाय समर्पित 

धा धातू पकडून ठेवणे

 करोति, करतात 

सः तो 

अम्भसा पाण्याने 

अम्भस पाणी 

पद्म-पत्रम्‌ कमळाचे पान 

इव, सुध्दा 

 पापेन पापाने 

न लिप्यते। लेपन होत नाही 

 लिप् धातू लेप देणे

एकूणच भारतीय तत्त्वज्ञान सांगताना कमळाची उपमा बरेचदा वाचायला मिळते जसे कमलनयन, चरणकमल, करकमल वगैरे. सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे कमळ चिखलात उगवते आणि ते अतिशय पवित्र आणि सुंदर दिसते. त्याची पाने पाण्यात असून सुद्धा पाण्याने भिजत नाहीत.

ह्याच गुणाचा भगवंतांनी ह्या श्लोकात उल्लेख केला आहे.

सर्व कर्मांचा करविता ईश्वर ब्रह्म आहे असे सांगणारे श्लोक 

एतत् सर्वं हि ब्रह्म। 2 माण्डूक्योपनिषद

तस्मात् एतत् ब्रह्म नाम रुपम् अन्नं च जायते ॥मुण्डकोपनिषद् 1.2.10.

जो आपल्या कर्माची फळे ब्रह्मा ला समर्पित करतो (त्याचे श्रेय घेत नाही, निस्वार्थी पणे काम करतो) त्याच्या हातून काही चुका (पाप) झाल्याच तर त्यासाठी त्यासाठी त्याला जबाबदार धरले जात नाही, ते पाप त्याला चिकटत नाही जसे कमळाच्या पानांना पाण्याचा स्पर्श होत नाही.

कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि।

योगिनः कर्म कुर्वन्ति सङ्गं त्यक्त्वाऽऽत्मशुद्धये।।5.11।।


योगिनः कायेन, मनसा, बुद्‌ध्या, केवलैः इन्द्रियैः अपि सङ्गम्‌ त्यक्त्वा आत्म-शुद्धये कर्म कुर्वन्ति।

योगिनः योगी 

कायेन, काया (तृतिया) च्या साह्याने   

मनसा, मन च्या साह्याने

बुद्‌ध्या, बुद्धि च्या साह्याने

केवलैः केवळ 

इन्द्रियैः इन्द्रिय च्या साह्याने

अपि सुद्धा 

सङ्गम्‌ आसक्ती 

त्यक्त्वा त्यज त्याग करणे 

आत्म-शुद्धये आत्म शुद्धि साठी 

कर्म कर्म 

 कुर्वन्ति। करतात

एक खूप मोठा विचार ह्या श्लोकात मांडला आहे. जसे एखादी महत्त्वाची गोष्ट करण्याचा मान काही विशिष्ठ व्यक्तीलाच मिळतो. त्यामागे हे कार्य प्रभू आपल्याकडून करवून घेत आहेत अशी भावना असते. जसे मी हे भाषांतर करत आहे.. हे कार्य करत असताना खरे तर माझे ज्ञान वाढत आहे, ह्या श्लोकांचा माझ्या मनावर परिणाम होत आहे आणि माझी विचारशक्ती विकसित होत आहे, माझ्या आचारविचारांवर ह्याचा परिणाम होत आहे. नेमके हेच भगवान ह्या श्लोकात सांगत आहेत. 

योगी निस्वार्थी पणे कोणत्याही श्रेयाची अपेक्षा न करता आपले शरीर मन बुद्धि ह्याच्या साह्याने जे काम करतात त्याचा उद्देश केवळ आत्मशुदधि हाच असतो. 

अशाच अर्थाचा एक श्लोक 


मम नाथ यद् अस्ति योऽस्म्यहं सकलम् तद्धी तवैव माधव ।

नियतस्वम् इति प्रबुद्धधैरथवा किं नु समर्पयामि ते।। 

(श्रीस्त्रोत रत्न-50) 

मी जेव्हा अज्ञानी होतो तेव्हा मला असे वाटायचे की मी तुम्हाला (श्री विष्णुंना) खूप काही अर्पण करू शकतो, पण आता मला समजले आहे की हे सर्व तुमचेच आहे (मी तुम्हाला काय देणार?) 

फक्त तुम्ही हे माझ्या करवी घेत आहात.

युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम्।

अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते॥५-१२॥


ह्या श्लोकातील 

 *शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम्* . ह्या शब्दांनी माझे लक्ष वेधून घेतले आणि त्याचे व्याकरण काय आणि त्याचा अर्थ काय असावा ह्याचा मी विचार करत होते. 

ह्यातील 

शान्तिमाप्नोति =शांतिम् म्हणजे शांती आप्नोति म्हणजे मिळवणे. 

आता नैष्ठिकीम् शब्दाचा विचार करु. 

नैष्ठिकीम् च्या जवळचा आपल्याला माहीत असलेला शब्द म्हणजे निष्ठा.

आता निष्ठा हा शब्द कसा तयार झाला?

नी +स्था

नी म्हणजे निरंतर

स्था म्हणजे स्थिर असणे (स्थावर, स्थितप्रज्ञ)

ह्या स्था ला नी जोडला की जी स्थिरता लाभते ती निरंतर असते. 

एखादी व्यक्ति निष्ठावान असते म्हणजे त्याची कायमस्वरुपी श्रद्धा असते एखाद्या व्यक्तीवर, एखाद्या गोष्टीवर. 

नैष्ठिकी हा शब्द संस्कृत भाषेतील सौंदर्य आहे.

जसे

भाव भावकी

भाऊबंदक भाऊबंदकी

तसेच निष्ठा नैष्ठिकी. 

तर अशी निरंतर  शांती लाभलेला योगी. 

ही शांति जी तात्पुरती नसते. 

हमास आणि इस्राइल मध्ये स्थापन झालेली शांती ही नैष्ठिकी नव्हे. अशी बरीच उदाहरणे देता येतील.

 नैष्ठिकी शब्दाच्या व्याकरणानंतर दोन शब्द महत्वाचे आहेत.

युक्तः आणि अयुक्तः

युक्त ह्या शब्दाचे दोन अर्थ होऊ शकतात.

युज +ग=योग

युज +त =युक्त

युक्त हा शब्द समजायला सोपा आहे.

 युक्त म्हणजे युक्ती करणारा म्हणजेच युक्ती ने कर्म सिद्धीस नेणारा थोडक्यात eligible

(आयुक्त हा शब्द असाच निर्माण झाला आहे)

दुसरा अर्थ आहे योग, ज्याचा अर्थ आहे जोडणारा. 

आता योगी स्वतः ला कशाशी जोडून घेतो तर अर्थातच ब्रह्म तत्वाला. 

असा हा योगी त्याने केलेल्या कर्माच्या फला चा त्याग करतो.

इतकेच नव्हे तर कर्मफळाच्या इच्छेचा सुद्धा त्याग करतो.

ह्या नंतर चा शब्द अयुक्तः म्हणजेच जो ब्रह्म तत्त्वाला जोडलेला नाही तो...

तो सुद्धा आपले कर्म करतच असतो पण त्याला मात्र आपल्या केलेल्या कर्माच्या श्रेयाची अपेक्षा असते

सर्वकर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी।

नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन्।।5.13।।


वशी देही सर्व-कर्माणि मनसा संन्न्यास्य न कुर्वन्‌, न कारयन्‌ , एव नव-द्वारे पुरे, सुखम्‌ आस्ते।

वशी वशीन् वश करणे 

 देही दहीन् 

सर्व-कर्माणि सर्व कर्मे 

 मनसा मनस् मनाने 

संन्न्यास्य संन्यास घेतलेला 

 न कुर्वन्‌, करत नाही 

 न कारयन्‌ ,घडवून आणत नाही 

 एव फक्त 

 नव-द्वारे पुरे, नऊदारे असलेली नगरी 

सुखम्‌ सुखी 

 आस्ते। अस् धातू असणे 

देह धारण केलेला जीव जो संन्यस्त आहे, आत्मसंयमित आहे  तो ह्या नऊ दरवाजे असलेल्या शरीरात सुखाने नांदतो आहे कारण तो (अहंकारापासून) मीच कर्ता किंवा मीच एखादी गोष्ट घडवून आणणारा असे समजतो, अशा विचारांपासून दूर आहे. 


नवद्वारे पुरे देही हंसः बहिः लेलायते। सः स्थावरस्य चरस्य सर्वस्य लोकस्य वशी॥3.18 श्वेताश्वेतर उपनिषद.

न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः।

न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते।।5.14।।

ह्यातील पाहिल्या ओळी चा अर्थ बघू.

ह्या मधे कर्ता आणि क्रियापद आहे प्रभुः सृजति

मूळ धातू सृज म्हणजे निर्माण करणे.

प्रभु हा शब्द भू ह्या धातुला प्र हा उपसर्ग लावून तयार झाला आहे.

भू भवति म्हणजे होणे.

प्रभवति म्हणजे प्रभाव पडणारा. इथे प्रभू हा शब्द ह्या श्लोकाची मुद्दाम वापरला आहे जो ह्या लोकांवर प्रभाव टाकतो तो प्रभू.

(एकूण 14 लोक आहेत भूलोक स्वर्गलोक.. वगैरे)

आता हा प्रभाव नक्की कोणावर पडतो? ज्याचा प्रभु वर विश्वास आहे त्याच्यावर की जो नास्तिक आहे त्याच्यावर सुद्धा?

म्हणजे इथे आधी आस्तिक आणि नास्तिक कोणाला म्हणायचे ते स्पष्ट करणे आले.

वेदांत सांगितल्या प्रमाणे जो वेदांना मानतो तो आस्तिक आणि जो वेदांना मानत नाही तो नास्तिक. पण इथे मात्र जो प्रभू चे अस्तित्व मानतो तो आस्तिक.

प्रत्येकाच्या मनात जसा भाव आहे त्याला तसा तो दिसतो.

नका विचारू देव कसा, देव असे जो भाव तसा.

आता खरी गंमत सुरू होते.

ज्यांचा देवावर अजिबात विश्वास नसतो ते प्रत्येक कार्य त्यांना पटेल असे करत असतात. मग ते विद्यानाचा आधार घेतील, वादविवाद चर्चा करतील आणि आपले काम करतील. आणि दुसर्‍या गटातील लोक मात्र देवावर विश्वास ठेवून त्याच्यावर सर्व सोपवून मोकळे होतील, कदाचित फारसा प्रयत्न करणार सुद्धा नाहीत. जे होईल ते, जसे नशिबात असेल तसे.

इथे भगवान् श्रीकृष्ण स्पष्ट पणे सांगतात

न कर्तृत्वं न कर्माणि (लोकस्य) सृजति प्रभुः।

आता कर्तुत्व आणि कर्माणि ह्या शब्दांचा विचार करू.

कर्तुत्व हा शब्द दोन अक्षरांनी तयार झाला आहे. 

कर्तृ + त्वं 

कृ + तृत् = कर्तृ

कर्तृ शब्दाची पंचमी आणि षष्ठी होते कर्तृः आणि पुल्लिंगी प्रथमा होते कर्ता. 

कर्ता कर्ती

कर्ता म्हणजे करणारा. 

कर्तृ + त्वं चा अर्थ कर्ता ची योग्यता दर्शवतो. 

ह्याच नियमानुसार 

दा +तृत्=दातृ पासून झाले दाता दात्री 

मातृ 

पितृ 

ह्यांना त्व जोडले की विशेषणे तयार होतात 

कर्तुत्व, दातृत्व, मातृत्व, पितृत्व. 

शब्दाला त्व जोडला की त्या व्यक्तीची योग्यता दर्शवते. 

असे हे कर्तृत्व, न सृजति प्रभुः। म्हणजेच प्रभु घडवून आणत नाही. (तुम्ही आस्तिक असाल कींवा नास्तिक असाल) कर्म तर घडतच राहतात. 

आता प्रश्न येतो, कर्म म्हणजे काय?

त्याबद्दल गीतेमध्ये काय सांगितले आहे? ह्या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी गीतेच्या इतर श्लोकांचा आधार घ्यावा लागेल.


आपल्याला कर्म करत रहा असे सांगितलेले माहीत आहे पण मुळात कर्म म्हणजे काय? त्याची व्याख्या कुठे सांगितली आहे असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे, त्यासाठी आपण इतर श्लोकात काय सांगितले आहे ते पाहूया.

3रा अध्यायात कर्मयोग सांगितला आहे पण कर्म म्हणजे नक्की काय ते काही सांगितलेले नाही. 4था अध्याय ज्ञानकर्म योग पण इथेसुद्धा कर्म म्हणजे काय ते स्पष्ट केलेले नाही. आता आपण 8व्या अध्यायातील 3रा श्लोक पाहू 

भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसंज्ञितः || ३ ||”

ह्यातील पाहिल्या शब्दाची फोड

भूत भावो उद्भव करोती अशी करता येईल.

उद्भव = उद् + भू (होणे)

उद् म्हणजे वर म्हणजे थोडक्यात प्रगती होणे.

आता आधीच्या दोन शब्दाना हे जोडून घेतले तर ते असे लिहिता येईल

भूतस्य (भूतकाळ) भावः (वर्तमानकाळ) उद्भवं (भविष्यकाळ) करोति।

आपल्याला सर्वांनाच हे माहीत आहे की आपल्या भूतकाळात वर्तमानकाळ असतो आणि वर्तमानकाळात भविष्यकाळ असतो.

आयुष्यातील प्रत्येक क्षण हा भूतकाळात जात असतो.

म्हणजेच (भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसंज्ञितः) आपण एक एक क्षण सोडून देत असतो.

म्हणजे त्याचा विसर्ग करत असतो. (धरणातून पाण्याचा विसर्ग करतात)

तर असे हे एक एक क्षण (भूतकाळ विसरून) सोडून देऊन भविष्यकाळात प्रवेश करणे ह्यालाच कर्म म्हणतात.


सहजं कर्म सदोषमपि न त्यजेत्।

सर्वारम्भा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृताः।।18.48।।

श्री भगवान पुढे असेही म्हणतात की कोणतेच कर्म हे निर्दोष नसते.  जरी ते सदोष असले तरी त्याचा त्याग करायचा नाही. कारण अग्नि ऊब देतो तसाच धूरही देतो. मग काय तुम्ही कर्म करण्यास सुरवातच करणार नाही का? ह्याबद्दल 3 र्या अध्यायात भगवान म्हणतात


 न कर्मणामनारम्भान्नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते।

न च संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति।।3.4।।

म्हणजे कर्माचा आरंभ केलाच नाही म्हणून नैर्ष्कम्य प्राप्त होणार नाही, तसेच कर्माचा त्याग केला म्हणून सिद्धि प्राप्त होणार नाही. 

थोडक्यात कर्म हे करावेच लागेल.

आता परत आपल्या मूळ श्लोका कडे येऊ. 

न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः।

आपण जे कर्म करतो किंवा आपले जे काही कर्तुत्व असते त्यावर कसलाही प्रभाव नसतो.

न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः।

न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते।।5.14

आपण कर्म म्हणजे काय? त्यावर कसा प्रभु चा प्रभाव नसतो, कर्म करत राहणे कसे अपरिहार्य आहे ते बघितले आता ह्या श्लोकातील 2र्या ओळी चा विचार करू. 


न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते।।

प्रवर्तते =प्र +वृत् 

प्रवृत्त करणे 

स्वभावः =स्वस्य भावः 

प्रत्येक जण आपापल्या स्वभावाप्रमाणे वागतो. 

सर्वांनाच साधु आणि विंचवाची गोष्ट माहीत असेलच. पाण्यात बुडणाऱ्या विंचवाला साधू पुन्हा पुन्हा वाचवण्याचा प्रयत्न करत असतो तर विंचू पुन्हा पुन्हा साधूला दंश करत असतो. ह्याला कारण स्वभाव. दोघेही आपापल्या स्वभावाप्रमाणे वागतात.

कर्म तर आपण करतोच पण दरवेळेस आपल्याला यश मिळतेच असे नाही. ह्यावर 18 व्या अध्यायातील 13 व्या श्लोकात सुंदर विवेचन दिले आहे.


पञ्चैतानि महाबाहो कारणानि निबोध मे।

सांख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणाम्।।18.13।

कर्म सिद्धीस नेण्यासाठी 5 कारणांची आवश्यकता असते ती कोणती?


अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधम्।

विविधाश्च पृथक्चेष्टा दैवं चैवात्र पञ्चमम्।।18.14।।

अधिष्ठानं म्हणजे काम करणारे साधन, कर्ता म्हणजे क्रिया घडवून आणणारा.. (इच्छा करणारा) 

करणं पृथकविधम् म्हणजे विविध कार्य करू शकणारी इंद्रिये 

विविध पृथक्चेष्टा म्हणजे इंद्रियांची विविध काम करण्याची शक्ती (skills) 

आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दैव. 

पळण्याच्या स्पर्धेत अर्ध्या सेकंदाने पदक हुकते. 

आपण बिया पेरतो पण सर्वच उगवतात असे काही नाही. 

क्षत्रियाचा धर्म लढण्याचा पण त्याच्या कर्मफलसंयोगाप्रमाणेच त्याला विजय मिळेल. 

थोडक्यात आपले कर्तृत्व, कर्म ह्यावर भगवंताचा प्रभाव नसतो तसेच त्यांच्या कर्मा ची फळे सुद्धा तो देत नाही.

नादत्ते कस्यचित्पापं न चैव सुकृतं विभुः।

अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः।।5.15।।

न+आदत्ते 

दा ददाति म्हणजे देणे

आ दा म्हणजे परत घेणे (आदानप्रदान शब्द माहीत असेल)

न कास्यचित् पापं न च ऐव सुकृतं

येथे सुकृत हा शब्द पुण्य ह्या अर्थासाठी वापरला आहे.

विभूः=विशेष भवति इति

भू म्हणजे होणे.

काही विशेष घडणे

विभूती हा शब्द माहीत आहेच.

जसे गम पासून गती

स्था पासून स्थिति

तसेच विभू पासून विभूति

आता अर्थ सोपा आहे.

विभूः न आदत्ते पापं, न सुकृतं च.

पुढच्या ओळी कडे जाण्यापूर्वी

अजून एक संदर्भ देते.


सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज।

अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः।।18.66।।

जरी 5व्या अध्यायात भगवंत म्हणत असले की ते पापही घेत नाहीत आणि पुण्य सुद्धा घेत नाहीत

पण 18 व्या अध्यायात मात्र अर्जुनाला असे सांगत आहेत की तू मला शरण ये, मी तुला सर्व पापातून मुक्ति देईन.

ह्याचा नक्की अर्थ काय असावा?

हे समजून घेण्यासाठी आधी पाप आणि पुण्य म्हणजे काय ते जाणून घ्यायला लागेल.

पा + अप

पा म्हणजे रक्षण करणे

अप म्हणजे त्या पासून दूर

थोडक्यात जो वाईट कर्म करेल त्याचे प्रभू रक्षण करणार नाही.

आता वाईट आणि चांगले कर्म कसे ठरवायचे?


सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ।

ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि।।2.38।।

ह्याचा थोडक्यात अर्थ असा की सुख दुःख, लाभ हानि, जय पराजय हे सर्व सारखेच असे मानून तू युद्धाला तयार हो. तू युद्ध केलेस म्हणून तुला पाप लागणार नाही.

आता पुण्य शब्द कसा तयार होतो ते बघू

पु पुनति म्हणजे शुद्ध करणे

पुण्यकर्म म्हणजे पवित्र कर्म.


पाप आणि पुण्य ह्यांच्या संकल्पना आपण बघितल्या

आता 5.15 मधील 2र्या ओळीचा अर्थ पाहू.

अज्ञानेनावृतं =अज्ञान +आवृत्त

आ+ वृत. वर्तते. वृत्त

वृत् म्हणजे सांगणे

आवृत्त म्हणजे एक प्रकारे आवरण (झाकून ठेवणे)

अज्ञानेनावृतं ज्ञानं ह्याचा अर्थ अज्ञानामुळे ज्ञान झाकून ठेवणे.

आपण जसे म्हणतो

Where there is smoke there is fire म्हणजे धुरा मागे अग्नि असणारच.

3.38 मध्ये हेच सांगितले आहे.

धूमेनाव्रियते वह्निर्यथाऽऽदर्शो मलेन च।

यथोल्बेनावृतो गर्भस्तथा तेनेदमावृतम्।।3.38।।

धुरा मुळे अग्नि झाकला जातो, धुली मुळे आरसा स्पष्ट दिसत नाही. अर्भक त्याच्या वर च्या आवरणात असते (अर्भकची उपमा फारशी पटण्यासारखी नाही पण ते असो.) त्याच प्रमाणे अज्ञानामुळे ज्ञान झाकले जाते.

मुह्यन्ति मुह्य धातू म्हणजे चलबिचल (confusion)

आता सर्व स्पष्ट आहे

अज्ञानामुळे जर ज्ञान झाकले गेले असेल तर मनात चलबिचल होते.

Knowledge makes man perfect.


यज्ज्ञात्वा न पुनर्मोहमेवं यास्यसि पाण्डव।

येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि।।4.35।।

इथे सुद्धा भगवान् हेच सांगत आहेत.

जर तुझ्याकडे ज्ञान असेल तर तुला पुन्हा मोह होणार नाही.

Half knowledge is dangerous.

एखादी गोष्ट लहान मुलाला करू नको असे सांगितले की त्याला तेच करावेसे वाटते कारण त्यातील धोके त्याला माहीत नसतात. मग तीच गोष्ट करण्याचा त्याला मोह आवरत नाही. 


अन्धं तमः प्रविशन्ति येऽविद्यामुपासते।

ततो भूय इव ते तमो य उ विद्यायां रताः ॥

ईशोपनिषद्. 9 मध्ये हेच सांगितले आहे. 

ज्याच्या कडे ज्ञान नाही तो घोर अंधकारमय जीवन जगतो पण ज्याला आपल्या कडे खूप ज्ञान आहे असे वाटते तो त्यापेक्षा वाईट अवस्थेत असतो. (आपल्या अज्ञानाची त्याला जाणीव नसते)


विद्याञ्चाविद्याञ्च यस्तद्वेदोभयं सह।

अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्ययाऽमृतमश्नुते ।।

ईशोपनिषद् 11 मध्ये सांगितलेला थोडक्यात अर्थ असा की

अविद्या चा शेवट अटळ आहे पण विद्या अमर्त्य आहे. सत्य हे चिरंतन आहे.


 तत्सादृश्यमभावश्च तदन्यत्वं तदल्पता । अप्राशस्त्यं विरोधश्च नञर्था: षट् प्रकीर्तिता: ॥

(थोडेसे विषयांतर करून सांगते 

आपल्या बाराखडी मधल्या अ अक्षराचा नकारात्मक अर्थ तयार करण्यासाठी उपयोग करतात 

जसे विद्या अविद्या 

चल - अचल 

ज्ञान अज्ञान

कर्म अकर्म

तर असे नकार 6 प्रकारचे असतात असे ह्या श्लोकात सांगितले आहे. 


 यस्यामतं तस्य मतं मतं यस्य न वेद सः ।

अविज्ञातं विजानतां विज्ञातमविजानताम् ॥ ३॥केनोपनिषद्

ह्याचा मला समजलेला अर्थ असा

ज्याला असे वाटते की त्याला सर्व काही समजले आहे खरे तर ते त्याचे अज्ञान असते. आपण कायम ज्ञान प्राप्ती करत राहिले पाहिजे.

म्हणजेच आपण आपले ज्ञान सतत तपासून घेत राहिले पाहिजे.

Alertness.

सावधानता.

धा धानम् धारण करणे

अवधान - चुकीचे धारण करणे

व्यवधान - विशेष (लक्षपूर्वक) धारण करणे

सावधान (काळजीपूर्वक) धारण करणे


क्रोधाद्भवति संमोहः संमोहात्स्मृतिविभ्रमः।

स्मृतिभ्रंशाद् बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति।।2.63।।

Alertness बददल बोलताना ह्या श्लोका बददल सुद्धा सांगायला हवे.

आपले लक्ष कसे विचलित होऊ शकते त्याचे विवरण इथे दिले आहे.

जर आपण रागात असू तर आपल्या मनात चलबिचल असते, त्याचा आपल्या स्मृती वर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अर्थात बुद्धिभेद होतो, आणि बुद्धिभेद झाला की विनाश अटळ आहे.

(नज़र हटी दुर्घटना घटी 😀😀)

पुन्हा आपल्या मूळ श्लोका कडे येऊ यात.

जर अज्ञानाचे आवरण ज्ञानावर नसेल तर मोह होणार नाही.

ज्ञानेन तु तदज्ञानं येषां नाशितमात्मनः।

तेषामादित्यवज्ज्ञानं प्रकाशयति तत्परम्।।5.16।।

मागील अध्यायात आपण ज्ञानाची महती जाणून घेतली आता ह्या अध्यायात ज्ञानाचे गुणविशेष जाणून घेऊ.

ह्या श्लोकाची वाक्य रचना आधीपेक्षा थोडी निराळी आहे. येथे भगवान् म्हणतात की 

येषां आत्मनः अज्ञानं ज्ञानेन नाशितम् 

म्हणजे ज्ञानाने अज्ञानाचा नाश होतो. ज्ञान म्हणजे सत्य. 

सत्य हे एक आणि एकच असते. असत्य (गोष्टी, कारणे) कितीही असू शकतात. म्हणून 4 थ्या अध्यायात ज्ञानाला अग्नि ची उपमा दिली आहे. 

यस्य सर्वे समारम्भाः कामसङ्कल्पवर्जिताः।

ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पण्डितं बुधाः।।4.19।।


जे कर्म कोणताही संकल्प किंवा कामना न ठेवता केले ते कर्म ज्ञान रुपी अग्नीत जळून भस्मसात झाले म्हणजेच असे कर्म केले ज्याच्या फळाची अपेक्षाच नष्ट झाली. निष्काम कर्मः तोच खरा पंडित. 

आता प्रश्न असा आहे की हे ज्ञान मिळवायचे कसे? ते खाली दिलेल्या श्लोकात स्पष्ट केले आहे. 

तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया।

उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः।।4.34।।

याचा थोडक्यात अर्थ असा की 

ज्ञानेच्छू ने गुरु कडे अतीशय नम्रपणे त्यांची सेवा करुन विनंती केल्यास गुरु ज्ञान देइल. 

पण हे इतके काही साधे सोपे नाही. 

उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः.। ।

उपदेक्ष्यन्ति=उप +दिश ह्या धातूचा भविष्यकाळ वापरला आहे. 

ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः=ज्ञानिन तत्व दर्शिनः

म्हणजे गुरु फक्त ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग दाखवेल. 

तो काळच वेगळा होता. आताच्या सारखे पैसे भरून डिग्री विकत घेता येत नव्हती. 

म्हणजे थोडक्यात काय तर तुम्हाला आत्मज्ञान च झाले पाहिजे. 

असे आत्मज्ञान कसे असावे? 

तेषामादित्यवज्ज्ञानं प्रकाशयति तत्परम्।।

मूळ श्लोकाची दुसरी ओळ. 

तेषाम् आदित्य वत् ज्ञानं, तत् परम ज्ञानं 

कमालीचे सुंदर शब्द वापरले आहेत. 

परम म्हणजे सर्व श्रेष्ठ 

आदित्यवत् 

वत् म्हणजे सारखे. 

म्हणजेच सूर्यासारखे... प्रकाशमान. 

ज्ञानं प्रकाशयति।

ह्या वाक्यात ज्ञान हा कर्ता समजायचे की कर्म? 

ज्ञान प्रकाशित करते की ज्ञान प्रकाशित होते? 

येथे सूर्याची उपमा चपखल दिली आहे. 

ज्ञान हे सूर्यासारखे स्वयंप्रकाशित असते. ते स्वयंसिद्ध असते. 

(त्या काळी सूर्य स्वयंप्रकाशित आहे हे माहीत होते हे पण विशेष) 

उजेडी राहिले उजेड होऊन 

मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजेड... 

(कायम मनात असणारा अभंग) 


ज्याला असे आत्मज्ञान झाले त्याचे वर्णन खालील श्लोकात दिले आहे. 

प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान्।

आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते।।2.55।।


आत्मनि आत्मनात आत्मनः ज्ञानं

अब्राहम लिंकन चे शब्द थोडे स्वतः साठी बदलून लिहीते

For the self, by the self, of the self 

असे स्वतः, स्वतः साठी स्वतः च मिळवलेले ज्ञान हे परम ज्ञान असते. 

आत्मन्येवात्मना तुष्टः=आत्मन् एव मना तुष्टः

ज्याच्या कडे असे ज्ञान आहे तो स्वतः मुळेच संतुष्ट झाला. तो स्थितप्रज्ञ झाला. Man of steady wisdom. 

आपल्या कड़े ज्ञानी माणूस ओळखण्यासाठी काही परिक्षा आहेत. 

ज्ञान मिळवण्यासाठी काही माध्यम तर हवेच. 

त्याला म्हणायचे प्रस्थानत्रयी. 

प्रस्थान म्हणजे जाणे, त्रयी म्हणजे तीन. श्रुती प्रस्थान (उपनिषद्) स्मृति प्रस्थान (भगवद् गीता) न्यायप्रस्थान (ब्रह्मसूत्र) 

ज्याला आपण logical explanation म्हणतो ते ह्या प्रस्थानत्रयी मुळे शक्य होते.

तद्बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणाः।

गच्छन्त्यपुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषाः।।5.17।।

तत् बुद्धयः तत् आत्मानः तत् निष्ठाः तत् परायणाः गच्छन्ति अपुनरावृत्तिं ज्ञान निर्धूत कल्मषाः।

परायणा =परम् +अयनम्

परम म्हणजे श्रेष्ठ

अयनम् म्हणजे जाणे

मागच्या श्लोकात आपण ज्ञानाचे गुणविशेष पाहिले. आता ज्ञान प्राप्त झाले कि काय होते त्याबद्दल सांगितले आहे.

तदबुद्धयः बुध धातू, बुध होणे, बोध होणे. म्हणजेच ज्ञान प्राप्त होणे. राजपुत्र सिद्धार्थ ला दुख अजिबात दिसणार नाही अशी तजवीज करुन ठेवली होती. आणि अचानक त्याला दुःख दिसले. माणसाला दुःख का होते ह्याच्या शोधात तो बाहेर पडला आणि बुद्ध झाला. त्याचे सारे संशय दूर झाले.

ज्याची बुद्धि केवळ ज्ञान प्राप्त करण्यासाठीच काम करते आहे, ज्याचे मन सुद्धा बुद्धिप्रमाणे काम करते आहे त्याला जे ज्ञान प्राप्त झाले आहे, त्या ज्ञानाने सर्व किल्मिष धुवुन टाकली जातात अशा आत्म्याची पुनरावृत्ती होत नाही म्हणजेच त्यांना परमगति प्राप्त होते. इथे गती हा शब्द जरी वापरला असला तरी त्याचा अर्थ निर्वाण असा आहे

(हे वाचत असताना मला परमवीर चक्र हा शब्द आठवला, चक्र म्हणजे सुद्धा गती च. पण आता ह्या पुरस्काराची ऊंची जाणवते. त्यामागची भावना किती उदात्त आहे ते जाणवते

विद्याविनयसंपन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनि।

शुनि चैव श्वपाके च पण्डिताः समदर्शिनः।।5.18।।

ह्या श्लोका मधे ज्ञानी पुरुषाचे लक्षण सांगितले आहे.

गवि गो गाय

हस्तिनी हत्ती

शुनि कुत्रा

श्वपाके कुत्रा खाणारे

गाय कुत्रा आणि हत्ती ह्या प्राण्यांचे नाव का घेतले आहे? त्या काळात हे प्राणी जास्त दिसत होते म्हणून असे लिहिले आहे का मला कल्पना नाही.

येथे पंडित म्हणजे ज्ञानी पुरुष जो विद्यमान आहे त्याचबरोबर विनयशील आहे तो सर्वांकडे एकाच दृष्टिने पाहतो.

समदर्शिनः

मात्र 

गाय- सत्वगुणी

हत्ती- रजोगुणी

कुत्रा- तमोगुणी

श्वपाके- शूद्र..विद्याविहीन

या सर्वांना समदृष्टीने पाहणारा.

एकतर सर्वांप्रती निर्लेपता...दुसरे सर्वांच्या दु:खांप्रती करुणा

अशा अर्थाने विचार केला तर ही उदाहरणे समर्पक आहेत असे वाटते. 

मागच्या श्लोकात ज्ञानी पुरुषाचे वर्णन करताना तो सूर्यासारखा स्वयंप्रकाशित असावा असे म्हटले होते, त्याच सूर्याचा हा गुण आहे सर्वांकडे सारख्या दृष्टीने पाहण्याचा.

समदर्शी तू खरा..

भा. रा. तांबे यांची कविता, ह्यातील प्रत्येक शब्द अर्थपूर्ण आहे.

सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि।

ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः।।6.29।।

आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन।

सुखं वा यदि वा दुःखं सः योगी परमो मतः।।6.32।।

वरील दोन श्लोकात सुद्धा समदर्शी असण्याचे दाखले दिले आहेत.

इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः।

निर्दोषं हि समं ब्रह्म तस्माद्ब्रह्मणि ते स्थिताः।।5.19।।

न प्रहृष्येत्प्रियं प्राप्य नोद्विजेत्प्राप्य चाप्रियम्।

स्थिरबुद्धिरसम्मूढो ब्रह्मविद्ब्रह्मणि स्थितः।।5.20।।

वरील दोन श्लोकात सुद्धा ज्ञानी माणसाची वैशिष्ट्ये सांगितली आहेत.

इथे सुद्धा सूर्या ची उपमा चपखल लागू होत आहे.


इह एव तैः जितः सर्गो येषां 

सर्ग सृज म्हणजे निर्माण करणे 

सर्गो तैः जितः म्हणजे निर्माण होणाऱ्या गोष्टी ला जिंकले म्हणजेच जन्म जिंकला, म्हणजेच पुनर्जन्माची आता गरज नाही. कारण 

साम्ये स्थितं मनः 

मन आता समदर्शी आहे, सगळ्यांना एकाच दृष्टिने पहात आहे. 

आधीच्या श्लोकात सूर्य समदर्शी आहे असे सांगितले आहे, असा समदर्शी सूर्य निर्दोष आहे. त्याला कोणाचेही दोष दिसत नाहीत, त्यामुळे तो सर्वांना सारखाच प्रकाश देतो. आणि हे निर्दोषत्व ब्रह्मा सारखे आहे (ब्रह्म निर्दोष ही सम)

असा हा ज्ञानी पुरुष ज्याला कुणाचेही दोष दिसत नाहीत तो ब्रह्म तत्व होउ शकतो.

अहं ब्रहमास्मि..


ब्रह्मणो हि प्रतिष्ठाऽहममृतस्याव्ययस्य च।

शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्यैकान्तिकस्य च।।14.27।।

मी कोण आहे? 

स्वतः भगवान सुद्धा ब्रम्ह आहेत. 

न प्रहृष्येत्प्रियं प्राप्य नोद्विजेत्प्राप्य चाप्रियम्।

स्थिरबुद्धिरसम्मूढो ब्रह्मविद्ब्रह्मणि स्थितः।।5.20।।

प्रहृष्ये =प्र +हृष हर्षित होणे. 

न उद्विजेत म्हणजे सैरभर न होणे 

स्थिरबुद्धिः ज्याची बुद्धि स्थिर आहे असा 

असम्मूढा ज्याच्या कडे मोह शिल्लक नाही असा 

ब्रह्मविद, विद विद्या ज्याला ब्रह्म तत्त्वाचे ज्ञान आहे असा 

ब्रहमाणि स्थित जो ब्रहमतत्वात स्थिर झाला आहे असा 

 थोडक्यात ज्याला प्रिय अप्रिय सर्व सारखेच असते, ज्याला हर्ष होत नाही आणि जो उद्विग्न सुद्धा होत नाही असा तो ब्रहमतत्वात स्थिर झाला आहे.

न प्रहृष्येत्प्रियं प्राप्य नोद्विजेत्प्राप्य चाप्रियम्।


स्थिरबुद्धिरसम्मूढो ब्रह्मविद्ब्रह्मणि स्थितः।।5.20।।

हा श्लोक म्हणजे 5.19 श्लोका चाच पुढील भाग असे म्हणता येईल.

न प्रहृष्ये प्र +हृष = हर्ष होत नाही

प्रियं प्राप्य =आवडणार्‍या गोष्टी मिळाल्या म्हणून 

नोद्विजेत्प्राप्य  न+ उद् विज (सैरभर होत नाही) 

च +अप्रियम्. न आवडणार्‍या गोष्टी मिळाल्या म्हणून.

असे कोणाचे होत नाही? तर ज्याची बुद्धि स्थिर आहे, स्थिरबुद्धिः

असम्मूढा  अ  सम+मूढ म्हणजे ज्याच्या कडे मोह शिल्लक नाही. म्हणजेच तो ब्रह्मविद (ज्याला ब्रह्म कळले आहे असा)

ब्रहमणि स्थितः तो त्याच ब्रहमतत्वात स्थिर झाला आहे असा.

बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्दत्यात्मनि यत्सुखम्।


स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते।।5.21।।

20 व्या श्लोका प्रमाणे जर ज्ञानी माणसाला (ब्रह्म तत्त्वांमध्ये स्थिर असलेल्या) कोणत्याही प्रिय अप्रिय गोष्टींमुळे आनंद किंवा दुःख होत नसेल तर त्याची मानसिक स्थिति कशी असेल बरे?

बाह्य  स्पर्शेषु (ज्ञानेंद्रियाद्वारे आणि कर्मेन्द्रियांद्वारे होणाऱ्या जाणिवा) आसक्त आत्मा

विन्दयति आत्मानि

विद् वेत्ति प्राप्त करणे (विद्यमान)

यत् सुखम् विन्दयति

सः ब्रहमयोग युक्त आत्मा

सुखम् अक्षयं अश्नुते

अक्षय पात्र (द्रौपदीची थाळी) 

अश् धातू अशनम् (जेवणे) उपभोग घेणे. 


ज्याचा आत्मा ब्रहमतत्व युक्त असा आहे, जो बाह्य जगाबद्दल (मिळणाऱ्या सुखांबाबत) आसक्त आहे त्याला (बाहेर सुख शोधण्याची गरजच काय?) जे आत्म सुख प्राप्त होत असते ते चिरंतन असते


आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते।।2.55।।

स्वतः स्वतः मुळेच तृप्त असलेला असा स्थितप्रज्ञ

आनंदाचे डोही आनंद तरंग...

ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते।


आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः।।5.22।।

 हा श्लोक आपल्या आजकाल चालू असलेल्या वागणूकी संबंधी उपदेश देणारा आहे.

ह्याचा एक अर्थ असा की आजकाल आपण सर्वच सुखाच्या मागे धावत असतो. आपली एक इच्छा पूर्ण झाली की आपल्याला दुसरी इच्छा निर्माण होते आणि ती पूर्ण करण्यासाठी आपण धडपडत राहतो. म्हणजे सुख दुःखाचे हे चक्र अविरत फिरत राहते.

आता हि सुखे कोणत्या प्रकारची आहेत तर जी

संस्पर्श +ज जायते

संस्पर्शे जायते इति भोगाः

स्पर्शाने मिळणारे सुख मग ते नेत्रसुख असेल, कर्णसुख असेल नाहीतर स्पर्शसुख.

 (स्पर्श संपला की सुख संपले म्हणून आपण नवीन स्पर्श शोधायचा प्रयत्न करतो, stimulus)

ह्याचा अंत आहे जसा आरंभ आहे 

आदि अंत वत् 

म्हणजेच हे सुख नाशवंत आहे. 

आधीच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे अक्षय (ज्याचा क्षय होत नाही असा) नाही. 

म्हणून 

बुधः तेषु न रमते 

बुधः बोध होत राहतो असा 

मला सर्व समजले असे जर म्हटले तर तो बुद्ध 

 येथे बुध शब्द वापरला आहे म्हणजेच जो सतत सावधान असतो, समजून घेण्यासाठी प्रयत्नशील असतो तो. 

असा बुध विनाशी सुखाच्या फंदात पडत नाही.

शक्नोतीहैव यः सोढुं प्राक्शरीरविमोक्षणात्।


कामक्रोधोद्भवं वेगं स युक्तः स सुखी नरः।।5.23।।

शक्नोती +इह +एव

सोढुं सह् धातू सहन करणे

प्राक् पूर्वी 

शरीर विमोक्षणात्

शरीरस्य विमोक्षणं 

आत्मा शरीराला मोक्ष देतो

जो आपल्या मृत्यूपूर्वी सहन करु शकतो... 

काय सहन करु शकतो?

कामक्रोध उद्भवं वेगं 

वेगं विज् धातू चलबिचल होणे 

वेगं सोढुं शक्नोती 

रामरक्षेत सुद्धा वेगं हा शब्द आला आहे 

मनोजवं मारुततुल्य वेगं 

इथे काम आणि क्रोध ह्यातून उद्भवणारा वेग ( झळा) जो मृत्यू होण्यापूर्वी सहन करु शकतो तोच योगी आणि तोच सुखी..

योऽन्तःसुखोऽन्तरारामस्तथान्तर्ज्योतिरेव यः।


स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति।।5.24।।


यः अन्तः सुखः अन्तरा रामः तथा अन्तर जोतिः एव यः, सः योगी

सः अधिगच्छति

ब्रह्मभूताः योगी ब्रह्मनिर्वाणं


आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते।।2.55।।

 आत्मनि एव आत्मना तुष्टः


आराम: कल्पवृक्षाणां विराम: सकलापदाम्‌ ।

अभिरामस्त्रिलोकानां राम: श्रीमान्‌ स न: प्रभु: ।।16।। रामरक्षा

रम् धातू पासून सुरवात करुया.

रम् रमणे रामः

जिथे रमावेसे वाटते तेथे राम असतोच.

(दशरथाच्या आयुष्यातील रामच संपला. हनुमानाचे छाती फाडून राम दाखवला)

अन्त शब्दाचे दोन अर्थ होतात

आतला (अन्तपूर)

शेवट

आता मूळ श्लोकातील शब्द

अन्तः आरामः तथा अन्तर जोतिः अन्ता सुखः

आता अर्थ खूपच सोपा झाला

ज्याच्या आतमध्येच सुख आहे, जो ते उपभोगत आहे, जो स्वतः च्या आतल्या प्रकाशाने उजळून गेला आहे असा योगी ब्रह्म तत्त्वाशी जोडला गेला आहे.

लभन्ते ब्रह्मनिर्वाणमृषयः क्षीणकल्मषाः।

छिन्नद्वैधा यतात्मानः सर्वभूतहिते रताः।।5.25।।

लभन्ते लभ् धातू लाभते 

ब्रह्मनिर्वाणमृषयः = ब्रह्मनिर्वाणम् ऋषयः 

निर्वाण चा अर्थ मागच्या वेळेस सांगितला 

ज्याला ब्रह्मनिर्वाणाची स्थिति प्राप्त झाली आहे असा ऋषि, जो... 

यतात्मानः यत् आत्मनः

यत् यम नियम (दुसर्‍या साठी नियम, स्वतः साठी यम) 

यत आत्मा म्हणजे सर्व दृष्टीने नियमानुसार चालणारा 

(स्वतः हून पाळण्याचे नियम जसे सत्य अहिंसा अस्तेय अपरिग्रह वगैरे) 

छिन्नद्वैधा =द्वैधा द्विधा द्वि दुविधा छिन्न झाल्या, छाटल्या गेल्या.

क्षीणकल्मषाः क्षी धातू क्षीण होणे, नष्ट होणे

कल्मष म्हणजे पाप

रतः रममाण होणारा (कशात) 

सर्व भूत हिते म्हणजे सर्वांच्या सुखात

असा ऋषि ज्याचा आत्मा नियमबद्ध आहे, ज्याच्या मनात कोणत्याही दुविधा नाहीत, ज्याची पापे नष्ट झाली आहेत आणि ज्याला दुसर्‍यांच्या सुखात आनंद मिळतो असा त्याला मोक्ष प्राप्त होतो


5व्या अध्यायातील 24. 25. 26

ह्या श्लोकात निर्वाण हा शब्द आला आहे (तसेच तो 2.72 आणि 6.15 मध्ये पण आलेला आहे)

म्हणुन निर्वाण शब्दाचा अर्थ जाणून घ्यायला हवा.

निर +वाण

वा वाहणे

नि म्हणजे वेगळे होणे, त्याच्याशिवाय

(निर्वात, निरिच्छ निर्दोष वगैरे )

जो वाहतो तो वायू,

सर्व वायूंचे वाहणे थांबले (श्वास थांबला)

निर्वाण हा शब्द फक्त गीतेत नाही तर बौद्ध, जैन धर्मातील साहित्यात आला आहे.

निर्वाण षटकम् तर माहित आहेच.

निर्वात म्हणजे दिव्यातील वात संपणे

निर्वात म्हणजे वारा सुद्धा नाही म्हणजे जिथे कांहीच नाही अशी पोकळी. Vacuum. Barometer मधे पाऱ्याच्या वर असते तशी. ती पोकळीच असते हा सिद्धांत Torricelli नं मांडला. म्हणून vacuum measurement साठी torr टॅार हें युनिट आहे. समुद्रसपाटीला barometer मधे पारा ७६ सें.मी. इतका असतो. जितके वर जाऊं तितकी पाऱ्याची उंची कमी म्हणजे निर्वातता अधिक. 

पांडव जेव्हा स्वर्गारोहण करत असतात, तेव्हां अमुक उंचीवर गेल्यावर युधिष्ठिर सांगतो “इथून पुढे संवाद बंद, आत्मकेंद्रित रहायचं” हिमालयात जाऊन साधना करण्यामागे तें रहस्य असूं शकतं.

निर्वाण चा साधारण अर्थ मोक्ष, मुक्ति

तात्विक अर्थ आत्मा आणि ब्रहमतत्वाची सांगड

जैन तत्वज्ञानाप्रमाणे आत्म्याची मुक्ति

बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानाप्रमाणे सर्व इच्छां पासून मुक्त, पुनर्जन्मापासून मुक्ति.

ग्रंथसाहिबा मध्ये निर्बाण असा शब्द आहे ज्याचा अर्थ सुद्धा मुक्ती.

सर्वात शेवटी निर्वाण षटकम्

ज्यामध्ये 6 श्लोक आहेत. जेव्हा आदि शंकराचार्य आपल्या गुरुंना प्रथम भेटले त्यावेळी त्यांनी स्वतः ची ओळख ह्या 6 श्लोकातून सांगितली. जरुर त्याचा अर्थ समजून घ्या.

कामक्रोधवियुक्तानां यतीनां यतचेतसाम्।


अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनाम्।।5.26।।

अभितः चोहीकडे, सर्वबाजूने 

अभि शब्दाचा योग्य वापर झालेला दिसून येतो काही शब्दात 

रक्ताभिसरण 

अभिराम वगैरे. 

विदितात्मनाम् विदितः आत्मन् येन सः 

विदित विद् विद्यते 

ज्याला आत्मज्ञान झाले आहे असा 

(ज्ञानेश्वरांनी आत्मानुभव लिहिले) 

वर्तते वृत धातू म्हणजे असणे, to exist. 

ज्याला आत्मज्ञान झाले आहे त्याच्या आजूबाजूलाच ब्रह्म निर्वाण असते जो.... 

काम क्रोध

 वियुक्त (न युक्त) 

यतचेतसाम्, यतचेतस्, यतं चेतः यस्य सः ज्याचा स्वतः वर ताबा आहे असा. 

यतीनां म्हणजे ज्ञानी पुरुष. 

जो राग लोभ ह्यापासून मुक्त आहे, ज्याचा स्वतः वर ताबा आहे असा ज्ञानी, त्याच्या आजूबाजूलाच मुक्ति चा मार्ग आहे.

स्पर्शान्कृत्वा बहिर्बाह्यांश्चक्षुश्चैवान्तरे भ्रुवोः।


प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ।।5.27।।

योगाभ्यास आणि प्राणायाम करणार्यांना हा श्लोक चांगलाच मनाला भावेल.

5 वा अध्याय उपनिषद् ब्रह्मविद्या आणि योगशास्त्र ह्यावर आधारित आहे.

यज्ञभोक्तामहापुरुषमहेश्वरः असे नाव आहे ह्या अध्यायाचे. 

विशेषतः 27 आणि 28 व्या श्लोकात ध्यानयोगावर विवेचन केले आहे. 


प्राणापानौ म्हणजे श्वास आणि उच्छ्वास

समौ कृत्वा म्हणजे समसमान करणे

नासा अभ्यंतर चारिणौ म्हणजे आपल्या नाकपुड्यातून चालणारा

स्पर्शान् कृत्वा स्पर्श करतो

स्पर्श फक्त हातानेच होतो असे नाही तर तो नाकाद्वारे गंध, (जीभेद्वारे रस आणि शब्दांचा सुद्धा) आणि अर्थात डोळ्याने रंग आणि रुप. 


बहिः बाह्यान् च चक्षू एव अन्तरे भ्रुवोः

आपण जेव्हा ध्यान करण्यासाठी बसतो तेव्हा डोळे मिटून बाह्य जगाशी संपर्क थांबवण्याचा प्रयत्न करत असतो.

मी प्रयत्न करत असतो असे म्हणते आहे कारण डोळे मिटून घेतले तरी आपल्याला दिसत असतेच. त्याला कारण आपले मन. सर्व काही आपल्या मनावर अवलंबून असते. अगदी जागेपणी सुद्धा आपले लक्ष नसेल तर शेजारच्या माणसाचे बोलणे ऐकू येत नाही. अगदी सहज आपण म्हणतो, माझे लक्ष नव्हते परत सांग.

तर मनावर ताबा मिळवायचा असेल तर डोळे बंद करून आपल्या दोन भुवयांच्या मध्ये दृष्टी ठेवून आपला श्वास आणि उच्छ्वास समान ठेवून, श्वासामूळे निर्माण होणारा ध्वनी (स्पर्श) ऐकण्याचा प्रयत्न करायचा.


यतेन्द्रियमनोबुद्धिर्मुनिर्मोक्षपरायणः।


विगतेच्छाभयक्रोधो यः सदा मुक्त एव सः।।5.28।।

अशाप्रकारे (ध्यानयोगाचा अभ्यास करुन) 

यतेन्द्रियमनोबुद्धिः

यतानि (संयतानि) इन्द्रियाणि मनः बुद्धिश्च 

मुनिः मोक्षपरायणः

मन आणि बुद्धी ह्यावर ताबा मिळवलेला मुनी मोक्षाच्या दिशेने वाटचाल सुरू करतो. 

मोक्षपरायण मुमुक्षू 

क्षू म्हणजे इच्छा करणारा

विगतेच्छाभयक्रोधो 

विगता इच्छा 

विगतः भयं 

विगतः क्रोधः 

इच्छा भिती राग हे सर्व लांब गेले. ह्या सर्वांपासून मुक्ती मिळेल. 

मुक्तीचे सुद्धा 5 प्रकार सांगितले जातात.

सालोक्य, सार्ष्टि, सारूप्य, सामीप्य और सायुज्य

मुक्ती हा विचार म्रृत्यु नंतरचा असल्याने (आणि मी science student असल्याने, त्याहीपेक्षा मला मृत्यू पश्चात् आपले काय होते हे जाणून घेण्यात रस नसल्याने) इथेच थांबते.


भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरम्।


सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति।।5.29।।

5व्या अध्यायातील हा शेवटचा श्लोक.

शान्तिम् ऋच्छति

ऋ धातू म्हणजे मिळवणे

सुहृदं- साधू हृदयः यस्य सः

सुहृदं सर्वभूतानि म्हणजे जो सर्वांप्रती चांगले भाव ठेवून आहे असा

ज्ञात्वा मां मला जाणून घेतल्यानंतर

सर्वलोकमहेश्वरम् सर्वेः लोकाः महान ईश्वर 

भोक्तारं भुज भुन्ज धातू भोग घेणारा, उपभोग घेणारा

यज्ञतपसां यज्ञ (ह्याचा अर्थ पूर्वी सांगितला होता)

तपस तपश्चर्या

आता प्रश्न असा आहे की यज्ञ आणि तप ह्याचा उपभोग घेतला म्हणजे काय?

ध्यानयोग करताना ज्ञान सुद्धा तितकेच महत्त्वाचे. 

मागील श्लोका मध्ये भगवान् म्हणाले होते की मी पाप आणि पुण्य घेत नाही पण मी यज्ञ-तपांचा भोक्ता आहे 


भोक्ता यज्ञ-तपांचा मी सोयरा विश्व-चालक । 

जाणूनि ह्यापरी माते शांतीस वरिला चि तो ॥ २९ गीताई

म्हणजे ह्या विश्वाची धुरा सांभाळणारा मीच आहे.

धुरा धुर्य (बैल) बुद्धिमान आणि शक्तिमान असा तो

शहाणा बैल जोडलेल्या गाडी चा गाडीवान बैलावर विश्वास ठेवून झोपून जातो तसेच

हा परमात्मा विश्वाचा बैल आहे. त्याला सर्वांबद्दल सहानुभूती आहे आणि तो आपल्याला इच्छित स्थळी पोहोचवणार आहे.

हे सर्व जेव्हा तुला समजेल तेव्हा तुला शांती प्राप्त होईल.

                     🙏🙏🙏🙏


गुरुवार, १८ नोव्हेंबर, २०२१

श्रीमद्भगवद्गीता 3रा अध्याय

 गीतेच्या 3 र्या अध्यायाचे नाव कर्मयोग असे असून त्यामध्ये 45 श्लोक आहेत.


अर्जुन उवाच


ज्यायसी चेत्कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन।

तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव।।3.1।।

अर्जुन उवाच - हे जनार्दन! बुद्धिः कर्मणः ज्यायसी ते मता चेत्‌, तत्‌ हे केशव! माम्‌ घोरे कर्मणि किम्‌ नियोजयसि ?

अर्जुन उवाच - अर्जुनाने विचारले 

 हे जनार्दन! हे श्रीकृष्णा

 बुद्धिः बुदधि

 कर्मणः कर्मन् कामापेक्षा 

 ज्यायसी ज्यायस् श्रेष्ठ 

 ते मता असे मानतात 

चेत्‌ जर 

 तत्‌ तर

हे केशव! 

माम्‌ मला 

घोरे भयंकर 

कर्मणि कर्म 

किम्‌ का

 नियोजयसि ? आज्ञा देणे 

 नि +योजसि युज् धातू लागू करणे

अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण युद्ध भूमीवर उभे आहेत

अर्जुन श्रीकृष्णाला विचारत आहे

जर कर्मा पेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे तर मग तू मला हे भयंकर युद्ध का करायला भाग पाडत आहेस?

—-------------—------------------------------------------------

व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे।

तदेकं वद निश्िचत्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम्।।3.2।।

व्यामिश्रेण इव वाक्येन मे बुद्धिं मोहयसि इव। तत्‌ एकं निश्चित्य वद, येन अहम्‌ श्रेयः आप्नुयाम्‌।व्यामिश्रेण व्य +आ +मिश्र 

व्य व्यापून गेलेले 

 इव वाक्येन असे वाक्य 

 मे बुद्धिं माझी बुद्धि 

मोहयसि इव। मुह् धातू बुद्धि भ्रष्ट होणे 

तत्‌ तद् ते 

एकं 

निश्चित्य 

वद, सांग 

 येन यद् ज्यामुळे 

अहम्‌ मी 

 श्रेयः श्रेयस अधिक चांगले 

 आप्नुयाम्‌। आप् धातू मिळणे 


दुसर्या अध्यायात कर्मयोग, ज्ञानयोग, सांख्ययोग, बुद्धि योग आणि आत्मज्ञान ह्या वरील विवेचन ऐकल्यानंतर अर्जुन गोंधळून गेला आहे. विशेषतः कर्म योग आणि ज्ञानयोग ऐकल्यानंतर. कारण क्षत्रियाचा धर्म तर लढण्याचा, म्हणुनच अर्जुन पुढे असे म्हणतो

कृष्णा तुझ्या अशा सरमिसळ वाक्यामुळे माझी बुद्धि भ्रमित झाली आहे, म्हणून तू ठोस असे काही तरी सांग ज्यामुळे माझ्या समजुतीत अजून स्पष्टता येईल.

--------------------------------------------------------

श्री भगवानुवाच


लोकेऽस्मिन्द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयानघ।

ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनाम्।।3.3।।

श्रीभगवानुवाच - हे अनघ! अस्मिन्‌ लोके द्विविधा निष्ठा मया पुरा प्रोक्ता साङ्ख्यानाम्‌ ज्ञान-योगेन, योगिनाम्‌ कर्म-योगेन ।

श्रीभगवानुवाच - 

हे अनघ! अ+नघ निष्पाप 

 अस्मिन्‌ लोके ह्या इहलोकात 

द्विविधा द्वि विधा विध् धातू नियम करणे, विधान करणे 

निष्ठा नियम श्रद्धा 

मया माझ्या कडून 

पुरा पूर्वीच 

प्रोक्ता समजावणे 

 प्र उक्त वच् धातू बोलणे 

साङ्ख्यानाम्‌ साडःख्य योग 

ज्ञान-योगेन, झानाने 

योगिनाम्‌ योगींचे 

 कर्म-योगेन कर्मा ने 

आधीच्या श्लोकात अर्जुनाने जे प्रश्न विचारले त्याची उत्तरे आता श्री भगवान देत आहेत. 

ते म्हणतात 

हे निष्पाप अर्जुना 

माझ्या कडून पूर्वीच लोकांना मोक्षप्राप्तीचे दोन मार्ग सांगून झाले आहेत. ज्यांना ज्ञानप्राप्तीची ओढ लागलेली आहे त्यांच्या साठी (साख्यांना) ज्ञानयोग. आणि जे कर्मावर विश्वास ठेवतात त्यांच्या साठी कर्मयोग.

----------------------------------------------------------

न कर्मणामनारम्भान्नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते।

न च संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति।।3.4।।

 

पुरुषः कर्मणाम्‌ अनारम्भात्‌ नैष्कर्म्यं न अश्नुते। न च संन्न्यसनात् एव सिद्धिम्‌ समधिगच्छति।

पुरुषः माणूस 

कर्मणाम्‌ कर्माचे 

 अनारम्भात्‌, न आरम्भात् 

 नैष्कर्म्यं निष्कर्म, कर्म रहीत 

 न 

अश्नुते प्राप्त होणे 

 अश्न धातू खाणे 

 न च आणि नाही 

संन्न्यसनात् सम +न्यसनात्

सम +नी +अस् त्याग करणे 

एव 

सिद्धिम्‌ सिद्धि 

समधिगच्छति सम अधि गच्छति प्राप्त होणे 

आता ह्या श्लोका पासून श्रीभगवानांनी कर्मयोग उलगडून सांगायला सुरवात केली आहे.

पहिल्या ओळीत कर्मयोग्यासाठी सल्लावाचक सूचना आणि दुसर्‍या ओळीत ज्ञानी माणसासाठी सूचना.

कर्मयोग समजावून घेताना कर्म म्हणजे काय ह्याची कल्पना स्पष्ट असायला हवी. जगण्यासाठी आवश्यक जे करावे लागते ते कर्म.

जगणे म्हणजे काय?

ईशा वास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत्‌।

तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्यस्विद्धनम्‌ ॥ ईशावास्योपनिषद 1

कर्मयोगीने जर कर्म करण्याचा आरम्भच केला नाही (प्रत्यक्ष कृती नाही पण मनात विचार चालूच आहेत) तर त्याला कर्मा पासून मुक्ति मिळाली असे नाही.

आणि जर ज्ञानी माणसाने (ज्याने ज्ञानार्जनाचा मार्ग स्वीकारला आहे असा) कर्म करायचे सोडून दिले म्हणून त्याची लक्ष्य पूर्ती होणार नाही. (त्याला ज्ञान प्राप्त करावेच लागेल). 

------------------------------------------------

न हि कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत् ।

कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः ॥ 3.5।।

पाचव्या अध्यायातील 4था श्लोक वाचल्यानंतर आता 3 र्या अध्यायातील 5 वा श्लोक चा अर्थ समजून घेणे जास्त आवडेल.

ह्यातील पाहिल्या ओळीचा अर्थ सरळ सोपा आहे. 

कश्चित क्षणं अपि न हि जातु अकर्मकृत।

18 व्या अध्यायातील 48 व्या श्लोका प्रमाणे कोणतेच कर्म हे निर्दोष नसते आणि 3 र्या अध्यायातील 4 थ्या श्लोका प्रमाणे कर्म हे करावेच लागेल, कर्माचा त्याग केला म्हणून सिद्धि प्राप्त होणार नाही आणि कर्माचा आरंभ केला नाही म्हणून नैष्कर्म्य प्राप्त होणार नाही. आणि आता भगवान् असेही सांगत आहेत की कर्म तर कोणालाच चुकलेले नाही. असा एकही क्षण नाही जो मनुष्याचा कर्म केल्या वाचून जात नाही.

आता दुसर्‍या ओळीत खरी मेख आहे.

कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः।

ह्यवशः=हि+अवशः

वश करणे म्हणजे ताब्यात ठेवणे. Control करणे.

कार्यते म्हणजे केले जाते.

कर्म ताब्यात ठेवले जाते कसे तर


सर्व प्रकृतिजैः गुणैः।

म्हणजेच प्रकृति (निसर्ग) च्या नियमानुसार.

ह्याचा थोडक्यात अर्थ असा की आपण जे कर्म करतो, ते आपल्याला करणे भागच असते कारण ते सर्व निसर्ग नियमानुसार चालू असते. त्यातून आपली मुळीच सुटका नाही. 

वश ह्या शब्दावरून कोणता मराठी शब्द /गाणे आठवते बरे.? 

परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला... 

ह्या गाण्यामध्ये कवीच्या भावना थेट हृदयापर्यंत पोहोचतात. 

अशाच अर्थाचे दुसरे गाणे 

पराधीन आहे जगति पुत्र मानवाचा..

यावर पुन्हा भगवान् असेही सांगून मोकळे होतात

न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः।

आपण जे कर्म करतो त्यावर प्रभूंचा काहिच प्रभाव नाही बरं. 😀

----------------------------------------------

कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन्।

इन्द्रियार्थान्विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते।।3.6।।

यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन।

कर्मेन्द्रियैः कर्मयोगमसक्तः स विशिष्यते।।3.7।

गीते तील एकएक श्लोक म्हणजे आपल्या मानवी स्वभावाचे कंगोरे उलगडून तर दाखवतानाच आपल्याला उपदेश सुद्धा देतात.

6वा श्लोकात आस्ते हे क्रियापद आहे

आ+अस=आस धातू आसन ग्रहण करणे

स्मरन् =स्मृ धातू स्मरण करणारा

मनसा स्मरन्= मनात स्मरण करणारा

कशाचे स्मरण चालू आहे?

आपल्याला 5 कर्मेन्द्रिय दिली आहेत, त्याचा संयम जरी बाळगला असला तरी मनात मात्र त्याचेच विचार चालू आहेत.

इंद्रिय +अर्थाः+मूढ +आत्मा

मिथ्य +आचारः

येथे आत्मा म्हणजे मन असा अर्थ घेतला की सर्व काही स्पष्ट होते.

आपले मन हे सुद्धा एक इंद्रियच आहे. आपल्या मनाच्या आदेशानुसारच आपण कृती करत असतो.

जर आपले मन आणि आपण करत असलेली कृती ह्याचा ताळमेळ नसेल तर त्याचा अर्थ आपण फसवत असतो स्वतः ला ही आणि दुसर्‍यांना ही. 

मिथ्य आचरण करणारा म्हणजेच खोटारडा माणूस. 

आपण आपल्या मनाशी प्रामाणिक असले पाहिजे असे म्हणतात तेच हे. 

आता पुढचा श्लोक आपल्याला कर्म योगाचा एक धडा शिकवून जातो. 


यस्त्विन्द्रियाणि = यः तू इंद्रियाणि 

मनसा

 नियम्यारभतेऽर्जुन=नियम्य +आरभते 

कर्मेन्द्रियैः

कर्मयोगमसक्तः =कर्मयोग +आसक्तः

तू विशिष्यते=वि +शिष 

शिष म्हणजे पारखणे 

विशिष =विशेष पारखून घेणे 

शिष वरुन शिष्य शब्द आला आहे. 

पूर्वीच्या काळी सर्व शिष्य काही एकाच तुकडीत बसून एकच अभ्यासक्रम शिकत नसत. तर गुरु प्रत्येक शिष्याची पारख करुन त्याच्या कुवतीप्रमाणे शिकवत असत जसे अर्जुनाला धनुर्विद्या, भीमाला गदायुदध वगैरे.

तर अशा प्रकारे जेव्हा आपण आपल्या इंद्रियांवर आपल्या मनाने निर्बंध घालतो (नियम घालून देतो) आणि आपले कर्म करतो तो..... 


दोन श्लोकातील फरक नीट लक्षात घ्या.

आधीच्या श्लोकात जरी कृती करणे चालू नसले तरी त्या बद्दल चे विचार मनात चालूच होते.

7व्या श्लोकात कृती चालू ठेवायची आहे पण मन मात्र आसक्त आहे.

न सक्तः

सज, सज्ज (सज्ज होणे म्हणजे मनाची पूर्ण तयारी असणे) मन त्यात गुंतलेले असणे.

असक्त म्हणजे मन अजिबात गुंतलेले नसणे.

ह्या शब्दाची थोडी वेगळी छटा जो शब्द आपण हिंदी भाषेत ऐकतो.

सक्त आदमी, सक्त ताकीद

म्हणजे आता कोणतीही सूट नाही.

Fully dedicated, fully focused.

अर्जुनाची आणि पक्षाच्या डोळ्याची गोष्ट तर माहित आहेच आपल्याला

कर्णाची गोष्ट सुद्धा तशीच. आपल्या गुरुची झोपमोड होऊ नये म्हणून त्याला चावलेला विंचू त्याच्या मनापर्यंत पोहोचलाच नाही तो फक्त आपले कर्तव्य करत राहिला.

तो.... विशेष कर्म योगी असतो (विशिष्यते)

-------------------------------------------------------

नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः।

शरीरयात्रापि च ते न प्रसिद्ध्येदकर्मणः।।3.8।।

गीते मध्ये काही श्लोक खूप विचार करायला लावणारे आहेत पण काही श्लोक हे रोजच्या जीवनात सहज मार्गदर्शक ठरतात.

जसा हा श्लोक.

जीवन यात्रा हा शब्द आपण सहज वापरतो, ह्या श्लोकात शरीर यात्रा असा शब्द वापरला आहे.

कठोपनिषद् मध्ये शरीर यात्रा चा उल्लेख आहे.

आत्मानं रथिनं विद्धि शरीरं रथमेव तु ।

बुद्धिं तु सारथिं विद्धि मनः प्रग्रहमेव च ।।

(कठोपनिषद्, अध्याय १, वल्ली ३, मंत्र ३)


इंद्रियाणि हयानाहुर्विषयांस्तेषु गोचरान् ।

आत्मेन्द्रियमनोयुक्तं भोक्तेत्याहुर्मनीषिणः ।।

(कठोपनिषद्, अध्याय १, वल्ली ३, मंत्र ४)

तुमच्या जीवनरथाचा तुम्ही स्वामी आहात आणि शरीर हा रथ असून, तुमची बुद्धी तुमचा रथ हाकते आहे आणि मन हा लगाम आहे.

दशरथ म्हणजे 10 घोड्यांचा रथ म्हणजेच 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेन्द्रिय असणारे शरीर.

आता मूळ श्लोकाचा अर्थ पाहू.

नियतं =नि+यम (धर्म म्हणजे duty) नियमाप्रमाणे चालणारी ती नियती.

सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजेत्।

सर्वारम्भा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृताः।।18.48।।

सहज समोर आलेले कर्म जरी सदोष असले तरी त्याचा त्याग करायचा नाही (न त्यजेत्) कारण जेथे अग्नि असतो तेथे धूर निर्माण होतोच.  

म्हणूनच 

कर्म ज्यायो ह्यकर्मणः

कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे (जायस आहे) केव्हाही चांगले. 

आता दुसर्‍या ओळीतील 

 प्रसिद्ध्येदकर्मणः 

हा शब्द थोडा गमतीशीर, थोडा बोचरा सुद्धा जेव्हा आपण तो शरीरयात्रा ह्या शब्दाशी जोडून घेतो. 

प्र +सिद्ध् म्हणजे सिद्ध होणे. 

प्रसिद्धे अकर्मणः 

म्हणजे आपल्या शरीरयात्रेचे कर्म न केल्यामुळे प्रसिद्ध न होवो. 

आजकाल आपला सर्व नियम झुगारून जीवन जगण्याकडे कल दिसून येतो जसे कधीही उठायचे, कधीही झोपायचे, काहीही कितीही खायचे प्यायचे. ह्या सर्वांचा परिणाम म्हणजे लठ्ठपणा. आजकाल साध्या साध्या गोष्टी लठ्ठपणा मुळे लोकांना करणे अवघड जाते, सहाजिकच ते कुचेष्टेचा विषय होतात. रामायणात फक्त कुंभकर्णाला अशी कुप्रसिद्धी मिळाली होती. 

थोडक्यात नियमानुसार आपला आहार विहार ठेवून, आपली कुचेष्टा होऊ देऊ नका असेच सांगायचे आहे असे वाटते.

---------------------------------------------------

यज्ञार्थात्कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः।

तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंगः समाचर।।3.9।।

आपण आधीच्या भागात कर्म म्हणजे काय ते वाचले आता पुढे. 


प्रत्येक माणूस जन्माला आला की काहीना काही तरी कर्म करणारच. कालांतराने त्याला त्या कर्माचा मोह होऊ लागतो. त्या कर्माची संगत त्याला आवडायला लागते. मग अशा कर्माला यज्ञ म्हणायचे का?

कारण यज्ञ केल्यावर तर आहुती देण्याची पद्धत आहे आणि

इदं न मम असे म्हणण्याची पद्धत आहे.

मग कर्म आणि यज्ञ ह्या दोन्हीचा अर्थ कसा काय बरे समजून घ्यावा.

आपले तुकाराम महाराज त्यांच्या 12 अभंगात तर जन्मा विषयी असे म्हणतात

जन्माचे तें मूळ पाहिलें शोधून । दु:खासी कारण जन्म घ्यावा॥१॥

पापपुण्य करूनी जन्मा येतो प्राणी । नरदेही येऊनी हानी केली ॥ २ ॥.

म्हणजे आधीच्या जन्मी पाप पुण्ययाचा हिशोब पूर्ण झाला नाही म्हणून हा जन्म घ्यावा लागला. आणि माणूस कर्म बंधनात अडकला. जर आपल्याला मागचे राहिलेले दुःखच भोगायचे आहे तर मग आपण सुखाचा शोध का बरे घेतो?

यज्ञार्थात्कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः।

यज्ञार्थात कर्मणः अन्यत्र लोकः अयं कर्मबन्धनः

अन्यत्र म्हणजे ना अत्र ना तत्र, ना इथे ना तिथे.

जेथे यज्ञ चालू आहे असे कर्म बंधनकारक असत नाही.

अन्यत्र कर्म मात्र बंधनकारक असते.

एखादे कर्म काही विशिष्ट हेतू ठेवून केले असेल तर तो यज्ञ. जसे स्वातंत्र्या साठी क्रांती.

ह्या साठी स्वतः ची आहुती सुद्धा द्यावी लागेल पण ते सर्व हसत हसत करायचे कारण इदं न मम. आहुती देणे म्हणजेच स्वतः चा अहंकार जाळून टाकणे. दान दिलेल्या द्रव्यावर आपले नाव उरत नाही म्हणजेच ते बन्धन मुक्त होते.

म्हणून अर्जुना तू असे कर्म कर जे

मुक्तसडःगः समाचरः असेल

सम +आ+चर

सडःग= सज सन्ज्य म्हणजे मिळून जाणे

मुक्तसंगः म्हणजे संगत सुटणे.

म्हणजेच ह्याचा थोडक्यात अर्थ असा की

अर्जुना तू जेव्हा यज्ञ कर्म करशील तेव्हा तुझी अहंकाराची संगत संपलेली असेल असे सम्यक आचरण तू ठेव.

-------------------------------------------

सहयज्ञाः प्रजाः सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः।

अनेन प्रसविष्यध्वमेष वोऽस्त्विष्टकामधुक्।।3.10।।

पुरोवाच 

पुरा +उवाच, पूर्वीच सांगितलेले

सृष्ट्वा सृज निर्माण केलेली (प्रजा)

कशी निर्माण केली? सहयज्ञाः म्हणजे यज्ञासहीत

यज्ञ ह्या शब्दाचा अर्थ आपण पूर्वीच समजून घेतला.

यज्ञ म्हणजे विशिष्ट हेतूने केलेले कर्म. Activation of energy.

यज्ञ करताना आहुती द्यावी लागते. यज्ञ कोणी केला? 

सह यज्ञेन अनेन प्रजापतिः (विष्णू)

थोडक्यात

प्रजापती नी यज्ञ करुन सृष्टि निर्माण केली (आणि काय सांगितले?)

प्रसविष्यध्वं, अशी प्रसूती होत राहू देत.

एषः वः अस्ति इष्टकामधुक्

इष्ट इच्छति

धूक दुह धातू म्हणजे दोहन करणे दूध काढण्याची क्रिया 

कामधुक कामधेनु

प्रजोत्पादन हा यज्ञ असाच पुढे चालू राहू दे

म्हणजेच सृष्टिचे कायम अस्तित्व राहू देत.

ह्या एका वाक्यात बर्‍याच गोष्टी चा विचार मांडला आहे.

विशेषतः ह्या कोरोना काळात आपले आरोग्य, त्यासाठी आवश्यक असणारे अन्न धान्य, प्रदूषण मुक्त वातावरण, स्वच्छ पाणी आणि हवा ह्या सर्व गोष्टी उपलब्ध असतील तरच ही सृष्टी अबाधित राहू शकते.

-------------------------------------------------------

देवान्भावयतानेन ते देवा भावयन्तु वः।

परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ।।3.11।।

आधीच्या श्लोकातील Ecological thought पुढे नेणारा विचार ह्या श्लोकात सांगितला आहे

वरकरणी पहायला गेलो तर थोडासा गंमतीशीर विचार पण आजच्या शास्त्रीय युगात आपल्याच कर्माचा पुनः विचार करायला लावणारा. आपण जर असेच वागत राहिलो आणि भगवान आपल्या समोर अवतरले तर ते आपल्याला असेच म्हणतील.

पहा मी आधीच सांगितले होते तुम्हाला..

आपण संतांना देवासमान मानतो कारण देव म्हणजे आदर्श ( ideal) असेल तर संतांचे वागणे आदर्शवादी असते. भारतीय संस्कृति नेहमीच आपल्याला विनम्रता शिकवते. आपल्याला तारुन नेणारी पंचमहाभूते जसे पर्जन्य, पृथ्वी, वायू, अग्नी, आकाश ह्यांच्या परी कृतज्ञता व्यक्त करताना आपण त्यांना देवता मानतो.

 देवान् भावयत भावयन्तु अनेन ते देवाः वः

भावयत, भावयन्तु, भू भाव, भावुक होणे

देव भावाचा भुकेला.

आजच्या capitalism च्या युगात आपल्याला नैसर्गिक संपत्ती ओरबाडून घेण्याची सवय झाली आहे. त्याचे परीणाम सुद्धा दिसायला लागले आहेत जसे Climate Change. वेळीअवेळी पडणारा पाऊस, बदलते हवामान. आपण निसर्गापुढे खरे तर नतमस्तक असले पाहिजे, पण आपल्या निष्ठाच बदलल्या.

ह्या श्लोकात नेमके हेच सांगितले आहे.

परस्परं भावयन्तः म्हणजे तुम्ही देवतांचा आदर करा त्यांच्या विषयी मनात भाव असू द्या.

(देव दिव धातू दिव्यत्त्व म्हणजेच ज्ञान) असा विनम्र भाव 

त्यांच्या मनात तुमच्याविषयी भावुकता ठेवतील.

आणि असे परस्परांविषयी भाव (concern) ठेवल्याने काय होइल? 

परम श्रेयः अवाप्यसथ

अव +आप आप्नोति म्हणजे मिळवणे.

आधीच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे ह्या सृष्टिचा परम (उच्च) स्तर गाठला जाईल.

म्हणजेच उच्च दर्जाचा निसर्ग आपल्याला भरभरुन (श्रेय) देईल.

--------------------------------------------------------------

इष्टान्भोगान्हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः।


तैर्दत्तानप्रदायैभ्यो यो भुङ्क्ते स्तेन एव सः।।3.12।।

आधीच्या श्लोका मध्ये यज्ञ म्हणजे काय ह्या बददल लिहिले होते

भोजन हे सुद्धा एक यज्ञकर्म, त्यामागे शेतकरी दादांचे धान्य उगवण्या साठी घेतलेले कष्ट, त्यांना निसर्गाने दिलेली साथ आणि भोजन तयार करण्यासाठी केलेले प्रयत्न सर्व काही विचारात घेतले आहे.

असे विविध प्रकारचे यज्ञ आपल्याकडून केले जात असतात तेव्हा आपले आयुष्य पुढे जात राहते.

अग्नि चा शोध आणि अग्नि निर्माण करण्याची क्षमता हा मानवी आयुष्यतील मैलाचा दगड ठरला. 

यज्ञ म्हणजे activation of energy 

5 प्रकारचे यज्ञ सांगितले आहेत

१) देवयज्ञ

2) पितृयज्ञ

3) भूतयज्ञ

4) मनुष्ययज्ञ

5) ब्रह्मयज्ञ

भोजन करण्याचा मुख्य हेतू शरीरात उर्जा निर्माण करणे म्हणजेच आपले जीवन चालू ठेवणे. 

यज्ञ म्हणजे प्रगती. आपल्या ईष्ट देवतांना (पंचमहाभूते) प्रसन्न करून घेण्याची संधी. 


येन सदनुष्ठानेन सम्पूर्णविश्वं कल्याणं भवेदाध्यात्मिकाधिदैविकाधिभौतिकतापत्रायोन्मूलनं सुकरं स्यात् तत् यज्ञपदामिधेयम्।


हे सर्व करताना आपण देवतांना काही अर्पण करत असतो. 

पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति।

तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः।।9.26।।

यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत्।

यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्।।9.27।।

देवाला पान फूल फळ काहीही दिले तरी आवडते 

पंचमहाभूतांनी दिलेल्या गोष्टी आपण त्यांना परत देत असतो का? तर ते तसे नाही. आपण त्यांच्या ऋणांची उतराई करत असतो. त्यामागचा भाव महत्वाचा.. 

देव भावाचा भुकेला 

दहि भाताची ऊंड़ी लावीन तुज तोंडी 

अगदी शबरीची उष्टी बोरे सुद्धा चालतात.

इष्टान् भोगान् हि वः देवाः दास्यन्ते यज्ञभाविताः

असे देवतांकडून मिळालेले दान (ज्याच्या मूळे आपले आयुष्य सुखकर होते) ज्याचा फक्त उपभोग घेतला 


तैः दत्तान् अप्रदाय एभ्यः यः भुङ्क्ते स्तेन एव सः

अप्रदाय म्हणजे परत न करणे

स्तेन म्हणजे चोर


आणि जर त्याची काही परतफेड केली नाही तर असा तो चोर असतो.

--------------------------------------

यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः।


भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात्।।3.13।।

बारावा श्लोकाचा अर्थ समजून घेतल्यानंतर 13 व्या श्लोकाचा अर्थ खूपच सोपा आहे. 

यज्ञशिष्टाशिनः सन्तः मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः

भुञ्जते ते तु अघं पापाः ये पचन्ति आत्मकारणात्  

देवाचा प्रसाद तर आपण आवर्जून घेतोच पण देवाला दाखवलेल्या नैवेद्याच्या ताटातील भोजन करणे हा एक मान समजतात. 

यज्ञशिष्टाशिनः यज्ञात शिष्टम आशिन 

शिष् धातू शिल्लक राहिलेले 

शिष् धातू चा अजून एक अर्थ वेगळे करणे, शिष्य 

प्रत्येकाला त्याच्या कुवतीनुसार शिक्षण देणे 

अश्नाति सेवन करणे 

आशिष आशिर्वाद 

असे यज्ञशिष्ट जे सेवन करतात ते सन्त असतात. 

सत् सत्य जो सत्य वागतो तो सन्त. 

सर्वकिल्बिषैः मुच्यन्ते 

सन्त पापरहित होतात.

आत्मकारणात् म्हणजे आत्मा हेच जगण्याचे कारण 

ये पचन्ति 

आपण म्हणतो ना

खाण्यासाठी जगणे (फक्त उपभोग घेणे)

पचन्ति म्हणजे अन्न शिजवणे 

ते पापाः अघं भुन्जते

अघं म्हणजे पाप

फक्त स्वतःच्या मतलबाचा विचार करणारे असे पापी, ते पापच (प्रसाद नाही) खात असतात.

---------------------------------------------------

अन्नाद्भ‍वन्ति भूतानि पर्जन्यादन्नसम्भवः ।

यज्ञा‍द्भ‍‍वति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भ‍वः ॥ 3.१४ ॥

भूतानि अन्नात्‌ भवन्ति, अन्न-सम्भवः पर्जन्यात्‌, पर्जन्यः यज्ञात्‌ भवति, यज्ञः कर्मसमुद्भवः।


ह्या अध्यायातील 10 व्या श्लोकात यज्ञाचा तात्विक अर्थ आपण पाहिला. तोच अर्थ इथे सुद्धा अभिप्रेत आहे. 11 आणि 12 व्या श्लोकांचा अर्थ मनात ठेऊन हा श्लोक वाचला कि अर्थ लगेचच समजतो.

भूतानि प्राणीमात्र

अन्नात्‌ भवन्ति अन्नामुळे होतात. (अन्नावर वाढतात)

अन्न-सम्भवः पर्जन्यात्‌ धनधान्य पावसामुळे तयार होऊ शकते

पर्जन्यः यज्ञात्‌ भवति यज् धातू प्रार्थना करणे प्रार्थनेमूळे पर्जन्यवृष्टी होते 

यज्ञः कर्मसमुद्भवः.  

सम उद्भवः उत् +भू उत्पन्न होणे यज्ञ आपल्या कर्मातून (कर्तव्यातून) निर्माण होते.

खरेतर हा श्लोक पर्यावरण शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यासायला हव्या. निसर्गाचे नियमच जणू ह्या श्लोकात सांगितले आहेत. वातावरणात होणारे बदल आणि प्रदूषण टाळण्यासाठी करावे लागणारे परिश्रम ह्यांना यज्ञ मानले तर हा यज्ञ आपल्या कर्तव्यभावनेतूनच निर्माण होतो.

-------------------------------------------------------

कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवम्।

तस्मात्सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्।।3.15।।

कर्म ब्रह्म-उद्भवं विद्धि, ब्रह्म अक्षर-समुद्भवम्‌, तस्मात्‌ सर्वगतं ब्रह्म यज्ञे नित्यं प्रतिष्ठितम्‌।

मागच्या श्लोकात यज्ञ करण्याचे प्रयोजन पाहिले, त्या बद्दल जास्तीची माहिती इथे सांगितली आहे.

आपल्या चार वेदांत माणसाची कर्तव्ये सांगितली आहेत. वेदांना अपौरुषेय मानतात. जगातील सर्वात प्राचीन वाड्मय जे ईश्वरकृत आहे 


अस्य महतो भूतस्य निश्वसितमेतद् य इग्वेदो यजुर्वेदः सामवेदोऽथ्वङ्गिरस इतिहासः पुराणं विद्या उपनिषद इल्यादि । कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवम्।

तस्मात्सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्।।3.15।।

कर्म ब्रह्म-उद्भवं विद्धि, ब्रह्म अक्षर-समुद्भवम्‌, तस्मात्‌ सर्वगतं ब्रह्म यज्ञे नित्यं प्रतिष्ठितम्‌।

मागच्या श्लोकात यज्ञ करण्याचे प्रयोजन पाहिले, त्या बद्दल जास्तीची माहिती इथे सांगितली आहे.

आपल्या चार वेदांत माणसाची कर्तव्ये सांगितली आहेत. वेदांना अपौरुषेय मानतात. जगातील सर्वात प्राचीन वाड्मय जे ईश्वरकृत आहे 

अस्य महतो भूतस्य निश्वसितमेतद् य इग्वेदो यजुर्वेदः सामवेदोऽथ्वङ्गिरस इतिहासः पुराणं विद्या उपनिषद इल्यादि ।

बृहदारण्यक उपनिषद् 4.5.11


म्हणजेच वेदांमध्ये स्वतः ईश्वरानेच माणसांसाठी यम नियम सांगितले आहेत आणि ते अशा प्रकारे सांगितले आहेत की आपला प्रापंचिक धर्म निभावता निभावता त्याची अध्यात्मिक उन्नती होईल. ह्या सर्वांचे मूर्त स्वरूप म्हणजे यज्ञ.


कर्म ब्रह्म-उद्भवं ब्रह्मा पासून निर्माण झालेले (सांगितलेले) कर्म 

विद्धि विद् धातू माहीत करुन घे 

ब्रह्म -समुद्भवम्‌, सम उद्भवम् ब्रह्मा पासून निर्माण झालेले 

अक्षर क्षी धातू नष्ट होणे अक्षर कधीही नष्ट होत नाही 

 तस्मात्‌ सर्वगतं सगळीकडे व्यापलेला 

ब्रह्म 

यज्ञे यज्ञकर्म 

नित्यं प्रतिष्ठितम्‌ शाश्वत असा स्थापन झाला आहे.


ब्रह्मा पासून निर्माण झालेले कधीच नष्ट न होणारे सर्वव्यापी यज्ञकर्म ब्रह्मा ने व्यापून टाकले आहे.

------------------------------------------------------------

एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयतीह यः।

अघायुरिन्द्रियारामो मोघं पार्थ स जीवति।।3.16।।

हे पार्थ! यः इह एवं प्रवर्तितम्‌ चक्रम्‌ न अनुवर्तयति, अघायुः इन्द्रिय-आरामः सः मोघम्‌ जीवति।

हे पार्थ

यः इह जो इथे 

प्रवर्तितम्‌ चक्रम्‌ 

प्र +वृत् धातू प्रवृत्त होणे 

प्रवर्तितम्‌ चक्रम्‌ पायंडा पडणे

न अनुवर्तयति 

अनु +वृत् अनुसरण करणे

अघायुः पापी आयुष्य 

इन्द्रिय-आरामः भोगी विलासी जीवन 

सः तो 

मोघम् मुह् मोघ बुद्धि भ्रष्ट होणे

जीवति जीव धातू जगणे

(15 व्या श्लोकात सांगितल्या प्रमाणे ईश्वराने जे काही नियम सांगितले आहेत ज्यामुळे त्याची अध्यात्मिक उन्नती होऊ शकेल)

हे अर्जुन जो मनुष्य अशा प्रकारे पायंडा घालून दिलेल्या पद्धतीचे अनुसरण करत नाही त्याचे जीवन दोषयुक्त आहे, भोगवादी आहे म्हणूनच व्यर्थ आहे.

---------------------------------------------------------------

यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः।

आत्मन्येव च सन्तुष्टस्तस्य कार्यं न विद्यते।।3.17।।

यः मानवः तु आत्म-रतिः एव, आत्म-तृप्तः च, आत्मनि एव सन्तुष्टः च स्यात्‌ तस्य कार्यम्‌ न विद्यते।

 तु यः मानवः आत्म-रतिः पण जो माणूस स्वतः मधे आनंदी असतो 

 रम् धातू आनंदी असणे

आत्म-तृप्तः च, आत्म समाधानी 

आत्मनि एव सन्तुष्टः स्वतः मधे संतुष्ट 

च 

स्यात्‌ आहे 

तस्य कार्यम्‌ त्याचे कार्य 

 न विद्यते। असत नाही 

विद् धातू अस्तित्व असणे

आधीच्या श्लोका मध्ये वेदांत सांगितलेले नियम ज्यामुळे आत्मिक उन्नति होण्यास मदत होते त्याची माहिती घेतली.

आता आत्मिक उन्नति झाली आहे. असा योगी ईश्वरामधे रममाण झाला आहे म्हणजेच त्याला आत्यंतिक सुखाची प्राप्ति झाली आहे. मग आता त्याला नियम पाळण्याची काय गरज? जसे लहान मूल शाळेत जात असते तेव्हा ते शाळेचे नियम पाळत असते. शाळेतून बाहेर पडल्यावर त्या नियमांची काही गरज नसते. असाच काहीसा प्रकार.

जो माणूस स्वतः मधेच संतुष्ट आहे, (बाहेरील जगाचा आता त्याच्यावर काही परिणाम होत नाहीये) त्याच्या साठी आता कोणतेच कर्म, कर्तव्य उरलेले नाही.

------------------------------------------------------

नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन।

न चास्य सर्वभूतेषु कश्िचदर्थव्यपाश्रयः।।3.18।।

तस्य इह कृतेन न कश्चन अर्थः, न अकृतेन एव च, न अस्य सर्व-भूतेषु कश्चित्‌ अर्थ-व्यपाश्रयः।

तस्य त्याचे

इह

 कृतेन कृत कर्माने 

न कश्चन अर्थः

न अकृतेन एव च,कश्चित्‌ अर्थ-

न अस्य सर्व-भूतेषु 

व्यपाश्रयः भरवसा असणे 

व्यपा +श्री धातू , श्रयः आश्रय घेणे

वि +अप +आ

असा आत्मिक उन्नति झालेल्या माणसाला त्याचे कर्म करण्यात काही हेतू नसतो, कर्म केले नाही म्हणून सुद्धा काही फरक पडत नाही. असा माणूस (कर्म केले काय किंवा न केले काय) दुसर्‍या कोणावर अवलंबून सुद्धा नसतो.

-----------------------------------------------------------

तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर।

असक्तो ह्याचरन्कर्म परमाप्नोति पूरुषः।।3.19।।

तस्मात्‌ सततम्‌ असक्तः कार्यम्‌ कर्म समाचर, हि असक्तः कर्म आचरन्‌ पूरुषः परम्‌, आप्नोति

तस्मात्‌ म्हणुन

सततम्‌ सतत

असक्तः अंतर ठेवून असणे 

सञ्ज् धातू जवळीक असणे 

कार्यम्‌ कर्म

 समाचर सम आचर कार्यान्वित असणे 

 चर म्हणजे चालणे 

 कर्म आचरन्‌ काम केल्यावर 

हि असक्तः गुंतून न पडता 

पूरुषः 

परम्‌, श्रेष्ठ 

आप्नोति प्राप्त होते 

(ह्या श्लोकात काही शब्द परत परत आले आहेत. आधीच्या श्लोका पेक्षा थोडे विषयांतर पण वाटते आहे )

म्हणुनच आपले कार्य आपण त्यात गुंतून न पडता करायचे, असे अलिप्त राहून (प्रसिद्धीपासून लांब) केलेल्या कामाने मनुष्याला श्रेष्ठत्व प्राप्त होते.

---------------------------------------------------------

कर्मणैव हि संसिद्धिमास्थिता जनकादयः।

लोकसंग्रहमेवापि संपश्यन्कर्तुमर्हसि।।3.20।।

जनक-आदयः कर्मणा एव संसिद्धिम्‌ आस्थिताः। हि लोक-संग्रहम्‌ सम्पश्यन्‌ अपि कर्तुम्‌ अर्हसि एव।

जनक-आदयः जनक आणि इतर 

कर्मणा एव कामाने सुद्धा 

कर्मन् काम

संसिद्धिम्‌ चोख काम होणे 

सिद्धि सिध् धातू सिद्ध होणे

आस्थिताः आ +स्थित स्था धातू स्थापित करणे 

हि म्हणुन 

लोक-संग्रहम्‌ लोकांचा सहभाग, पाठिंबा 

सम्पश्यन्‌ विचारात घेऊन 

अपि 

कर्तुम्‌ अर्हसि एव।

अर्ह् धातू पात्रता असणे स्वतः ला कामाने पात्र करणे

ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की

जनक आणि इतर राजांनी आपल्या कर्मयोगातून सिद्धि प्राप्त केली तू सुद्धा असे काम करून आदर्श निर्माण केला पाहिजेस आणि लोकांचा विश्वास प्राप्त केला पाहिजे.

----------------------------------------------------

यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः।

स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते।।3.21।।

श्रेष्ठः यत्‌ यत्‌ आचरति इतरः जनः तत्‌ तत्‌ एव । सः यत्‌ प्रमाणम्‌ कुरुते, लोकः तत्‌ अनुवर्तते।

ह्या श्लोकात नेता किंवा सामान्य माणसाने ज्याचे अनुकरण करावे अशा व्यक्ती बद्दल भाष्य केले आहे.

अर्थ अगदी सरळ सोपा आहे.

श्रेष्ठः यत्‌ यत्‌ आचरति

इतरः जनः 

तत्‌ तत्‌ एव । (आचरति) 

सः यत्‌ प्रमाणम्‌ कुरुते, 

लोकः तत्‌ अनुवर्तते।

ज्या ज्या गोष्टी (ज्याप्रमाणे) आदरणीय लोक करतात, आचरणात आणतात, त्या त्या प्रमाणे इतर लोक (सामान्य लोक) अनुकरण करत असतात. अशा प्रकारे थोर लोकांचे कर्म प्रमाण मानून लोकही तसेच करत असतात.

----------------------------------------------------

न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किञ्चन।

नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि।।3.22।।

हे पार्थ! मे त्रिषु लोकेषु किञ्चन कर्तव्यम्‌ न अस्ति, अवाप्तव्यम्‌ अनवाप्तम्‌ न कर्मणि एव च वर्ते ।

कर्म आणि अकर्म ह्या दोन्ही मधील फरक आपण आधीच्या श्लोकात समजावून घेतला आहेच. साक्षात श्रीभगवान स्वतः च्या कर्मा बद्दल बोलत आहेत 

हे पार्थ! 

मे मला 

त्रिषु लोकेषु तिन्ही लोकांत 

किञ्चन किम् चन काहीतरी, काही

कर्तव्यम्‌ न अस्ति, जबाबदारी (बंधन) नाही 

 अवाप्तव्यम्‌ अव् धातू प्राप्त होणे

 न अनवाप्तम्‌ 

अनवाप्तव्यम् = न अवाप्तव्यम् - नञ्तत्पुरुषः

कर्मणि एव च 

वर्ते वृत् धातू व्यस्त असणे बांधून घेणे

हे पार्थ

माझ्यासाठी तिन्ही लोकांत करण्यासाठी कोणतेही कर्तव्य नाही ना मला काही (स्वतः साठी) साध्य करायचे आहे. तरीसुद्धा मी माझ्या कामात व्यस्त असतो.

हा श्लोक 4.17 आणि 7.6 असे एकत्र वाचले तर छान समजतील.

-------------------------------------------------------------

यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः।

मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः।।3.23।।

मनुष्याः सर्वशः मम वर्त्म अनुवर्तन्ते। हे पार्थ यदि जातु अहं हि अतन्द्रितः कर्मणि न वर्तेयम्‌..

हे पार्थ अर्जुना, 

मनुष्याः सर्वशः (सर्वशस्) माणसे सर्व प्रकारे 

मम वर्त्म (वर्त्मन्) मी घालून दिलेला मार्ग 

अनुवर्तन्ते। अनुसरण करणे 

अनु +वृत् धातू प्रवृत्त होणे, 

यदि जर 

जातु कोणत्याही वेळी 

अहं हि 

अतन्द्रितः अ + तन्द्रितः अविरत 

तन्द्रित आळशी 

कर्मणि कर्तव्ये 

 न वर्तेयम्‌ न भवेयम्

ह्या श्लोकात श्रीभगवान स्वतः च्या कर्तव्यांबद्दल बोलत आहेत.

त्यांनी स्वतः मनुष्य जन्म घेऊन आपले कार्य करुन लोकांसमोर धडा घालून दिला.

ते अर्जुनाला सांगताहेत

जर मी माझ्या कामात आळशीपणा केला तर लोक सुद्धा जे मी घालून दिलेल्या मार्गावर चालतात (त्यांचे खूप नुकसान होईल)

ह्या श्लोकाचा अर्थ 24 व्या श्लोका बरोबर जोडून वाचायला लागेल

उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहम्।

सङ्करस्य च कर्ता स्यामुपहन्यामिमाः प्रजाः।।3.24।।

अहम्‌ कर्म न कुर्याम्‌ चेत्‌ इमे लोकाः उत्सीदेयुः, सङ्करस्य कर्ता च स्याम्‌ इमाः प्रजाः उपहन्याम्‌ ।

अहम्‌ मी 

चेत्‌ जर

कर्म न कुर्याम्‌ काम केले नाही 

  इमे लोकाः सर्व लोक 

उत्सीदेयुः, उद् +सद् नाश होणे 

सद् धातू शक्तीहीन होणे 

सङ्करस्य सङ्कर मिश्रण गोंधळात टाकणारे 

कर्ता च 

स्याम्‌ अस् धातू 

इमाः प्रजाः हे लोक 

उपहन्याम्‌ उप +हन्

मी जर माझे कार्य केले नाही तर ह्या लोकांचे अपरिमित हानी होईल, लोक नष्ट भ्रष्ट होतील आणि मीच ह्यांच्या नाशाला कारणीभूत असेन.

-------------------------------------------------------------

सक्ताः कर्मण्यविद्वांसो यथा कुर्वन्ति भारत।

कुर्याद्विद्वांस्तथासक्तश्िचकीर्षुर्लोकसंग्रहम्।।3.25।।

हे भारत! कर्मणि सक्ताः अविद्वांसः यथा कुर्वन्ति, असक्तः विद्वान्‌ लोक-संग्रहम्‌ चिकीर्षुः तथा कुर्यात्‌।

हे भारत! अर्जुना 

कर्मणि काम 

सक्ताः ओढ आपुलकी 

अविद्वांसः अज्ञानी लोक 

यथा कुर्वन्ति, जसे करतात 

असक्तः विद्वान्‌ 

लोक-संग्रहम्‌ 

चिकीर्षुः कर्तुमनाः (कर्तुम् इच्छुः) इच्छा असणे 

तथा कुर्यात्‌। तसेच करावे 

3.20 लोकसडःग्रह हा शब्द येऊन गेला आहे.

कर्म आणि अकर्म ह्यांच्या संकल्पना स्पष्ट आहेत.

त्यामुळे अर्थ खूपच सोपा आहे.

अर्जुना 

अज्ञानी लोक आपले काम हेतूपुरस्सर (श्रेयाची अपेक्षा ठेऊन) करतात मात्र ज्ञानी लोकांनी, लोकांचे हित मनात ठेऊन (म्हणजे लोक आपोआपच पाठिंबा देतील) निःस्वार्थीपणे आपले काम केले पाहिजे.

----------------------------------------------------------

न बुद्धिभेदं जनयेदज्ञानां कर्मसङ्गिनाम्।

जोषयेत्सर्वकर्माणि विद्वान् युक्तः समाचरन्।।3.26।।

युक्तः विद्वान्‌ कर्म-सङ्गिनाम्‌ अज्ञानाम्‌ बुद्धि-भेदम्‌ न जनयेत्‌ समाचरन्‌ सर्व-कर्माणि जोषयेत्‌।

युक्तः विद्वान्‌ ज्ञान युक्त असा विद्वान 

 कर्म-सङ्गिनाम्‌ कामाशी जोडला गेलेला 

जनयेत्‌ जन् धातू 

अज्ञानाम्‌ न जाणणारा 

अ +ज्ञ धातू जाणणे 

न बुद्धि-भेदम्‌ बुद्धि भेद करू नये (मनात गोंधळ निर्माण करू नये) 

समाचरन्‌ सम +आचरण 

सर्व-कर्माणि

 जोषयेत्‌ 

जुष् धातू आदर्श घालून देणारे काम करणे

आदर्श मार्गदर्शक कसा असावा ह्याचे वर्णन ह्या श्लोकात सांगितले आहे.

प्रत्येक व्यक्तिची बुद्धि, विचार करण्याची कुवत कमी जास्त असते म्हणूनच एखादा दिशा दाखवणारा असतो आणि बाकीचे त्या मार्गाने जाणारे.

अगदी युद्धात सुद्धा अर्जुनाला युद्ध करण्याबाबत संभ्रम निर्माण झाला पण ते त्याने सैनिकांसमोर हे उघड केले असते तर त्यांच्या मनाचा गोंधळ उडाला असता.

म्हणून श्रीभगवान असे सांगत आहेत की

ज्ञानी पुरुषांनी आपल्या कामातून नेहमीच सामान्य लोकांसमोर आदर्श घालून दिला पाहिजे. त्यांच्या मनात कोणताही संशय निर्माण न करता त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे.

------------------------------------------------------

प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः।

अहङ्कारविमूढात्मा कर्ताऽहमिति मन्यते।।3.27।।


कर्माणि सर्वशः प्रकृतेः गुणैः क्रियमाणानि अहङ्कार-विमूढ-आत्मा 'अहम्‌' कर्ता इति मन्यते।


कर्माणि कर्म 

सर्वशः सर्व प्रकारेण 

 प्रकृतेः गुणैः प्रकृतीच्या वैशिष्ट्यानुसार 

क्रियमाणानि कृ धातू लट लकार करत असतात

 अहङ्कार-विमूढः आत्मा 

अहङ्कारेण विमूढः अहंकाराने गर्विष्ठ झालेला आत्मा 

'अहम्‌' कर्ता मीच कर्ता 

इति मन्यते मन् धातू समजणे असे समजतो 

ह्या श्लोकात श्रीभगवान माणसांच्या दुर्गुणांबद्दल विवेचन करत आहेत.

खरेतर आपापल्या प्रकृति नुसार गुणांनुसार तीन भागात वर्गीकरण केले आहे सात्विक रज आणि तामसी गुण. ह्या गुणांप्रमाणेच आपले स्वभाव विशेष, शारीरिक वैशिष्ट्ये दिसून येतात..

प्रत्येक जण आपल्या प्रकृती नुसार कर्म करत असतो पण आपल्या बुद्धि ला जडलेल्या अहंकारामुळे त्याला तो स्वतः कर्म करतो असे वाटते. (आपल्यातील प्राकृतिक गुणांना श्रेय देणे नाकारतो).

-------------------------------------------------------

तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्मविभागयोः।

गुणा गुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते।।3.28।।

हे महाबाहो! गुण-कर्म-विभागयोः तत्त्ववित्‌ तु 'गुणाः गुणेषु वर्तन्ते' इति मत्वा न सज्जते।

हे महाबाहो! 


तत्त्ववित्‌ तत्वम् वेत्ति 

विद् धातू जाणतो

कोणते तत्व? 

गुण-कर्म-विभागयोः गुणाः, कर्माणि च 

तु पण 

 'गुणाः गुण 

गुणेषु गुणांमध्ये 

वर्तन्ते' असतात

वृत् धातू असणे 

 इति मत्वा असे मानून

 मन् धातू समजणे 

न सज्जते सज् धातू सज सञ्ज् संग जडणे 

आधीच्या श्लोकाचा संदर्भ घेऊन

पराक्रमी अर्जुना! (11.46 सहस्रबाहो, 11.16 अनेकबाहो) 

ह्या उलट ज्ञानी माणसे जे सत्य जाणतात (ज्यांचा अहंकार गळून पडला आहे) 

(4.13 गुणकर्मविभागशः

अंगभूत असणारे गुण आणि कामाची विभागणी हे आपण वाचले आहे)

( त्रिगुण, मन, बुद्धि, अहंकार, पाच कर्मेंद्रिय, पाच ज्ञानेन्द्रिय ह्या सर्वांमुळे प्रकट होणारे गुण. कर्म म्हणजे ह्या सर्व घटकांनी एकत्र येऊन घडू शकते ते काम.) 

ह्या सर्व घटकांमध्येच गुण दडलेले असतात हे ज्ञानी माणसांना पक्के माहीत असते ते ह्या सर्वामध्ये अडकून पडत नाहीत. 

जो कराई सो हरी कराई.. कबीर.

----------------------------------------------------------

प्रकृतेर्गुणसम्मूढाः सज्जन्ते गुणकर्मसु।

तानकृत्स्नविदो मन्दान्कृत्स्नविन्न विचालयेत्।।3.29।।


प्रकृतेः गुण-सम्मूढाः गुण-कर्मसु सज्जन्ते, अकृत्स्नविदः तान्‌ मन्दान्‌ कृत्स्नवित्‌ न विचालयेत्‌।

कृत्स्नवित्‌ ज्ञानी 

कृत्स्नम् वेत्ति सर्वकाही जाणणारा 

अकृत्स्नविदः अज्ञानी

न विचालयेत्‌ (न भ्रमयेत्) भ्रमित करू नये 

प्रकृतेः गुण-सम्मूढाः 

प्रकृतेः नैसर्गिक 

गुण-सम्मूढाः 

सम्मूढाः सम +मूढ मुह् धातू बुद्धि भ्रष्ट होणे 

गुण-कर्मसु गुणांनुसार केलेले कर्म 

सज्जन्ते सज्ज् धातू जवळीक असणे 

तान्‌ ते (लोक) 

मन्दान्‌ मन्दबुदधि, फारशी समज नसलेले 

मागील श्लोकात ज्ञानी पुरुषाचे वैशिष्ट्य सांगितल्यानंतर ज्ञानी माणसाने अज्ञानी माणसाला कसे हाताळावे ह्या बद्दल मार्गदर्शन केले आहे. 

सर्वसामान्य माणसे आपल्या अंगभूत असलेल्या गुणांमुळे जे काही कर्म करतात त्यावरच फिदा असतात,( पण ज्ञानी माणसांना मात्र त्यातील सत्य माहीत असते) (अर्धवट ज्ञान धोकादायकच) अशा लोकांना ज्ञानी माणसांनी अजिबात विचलित करू नये. (थोडक्यात त्यांच्या कलाकलाने, कुवतीनुसार त्यांना ज्ञान देत जावे असे म्हणायचे असेल).

--------------------------------------------------------

मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा।

निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः।।3.30।।

अध्यात्म-चेतसा मयि सर्वाणि कर्माणि संन्न्यस्य निराशीः निर्ममः विगत-ज्वरः भूत्वा, युध्यस्व।

युध्यस्व युदध् कर 

युदध् धातू मध्यम पुरूष लोट लकार

अध्यात्म-चेतसा अध्यात्मचेतस् 

आत्मन् स्वतः शी निगडीत 

(त्वं त्यां न॑ इन्द्र देव चि॒त्रामिष॒मापो॒ न पी॑पय॒: परि॑ज्मन् । यया॑ शूर॒ प्रत्य॒स्मभ्यं॒ यंसि॒ *त्मन॒मूर्जं॒* न वि॒श्वध॒ क्षर॑ध्यै ॥ ऋग्वेद 1.63.8) 

त्मन् म्हणजे स्व, श्वास 

चित् धातू विचार करणे 

मयि मला 

सर्वाणि कर्माणि सर्व कर्म 

संन्न्यस्य आपले नाही असे 

सम +नि +अस्

 निराशीः नि रसः आवड इच्छा रहित

 निर्ममः निः मम् मी पणा गळून पडला आहे असा

विगत- लांब जाणे 

वि गत गम धातू जाणे 

ज्वरः

 भूत्वा होऊन 

 भू धातू होणे. 

मी होतो म्हणून इतके तरी करू शकलो. 

मी होते म्हणून निभावले... प्रत्येक वेळी आपण आपला ठसा उमटवायचा प्रयत्न करत असतो. ही अशी स्वतःची ओळख म्हणजेच आपला अहंकार. 28, 29 व्या श्लोकांत ज्ञानी माणसाला उमगलेले सत्य सांगून झाल्यावर श्रीभगवान तेच सत्य अर्जुनाला स्वतः मधे उतरवायला सांगत आहेत. 

तू युद्ध कर पण कसे? 

तुझ्या विवेकी बुद्धीने स्वतः चा अहंकार आणि आकांक्षा बाजूला ठेवून, मनाचे सर्व आजार बाजूला ठेवून, तुझी सर्व कर्तव्य मला अर्पण करून तू युद्ध कर. 

(मी फक्त निमित्तमात्र, कर्ता करविता तोच)

-------------------------------------------------------------------

ये मे मतमिदं नित्यमनुतिष्ठन्ति मानवाः।

श्रद्धावन्तोऽनसूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः।।3.31।।


ये मानवाः अनसूयन्तः श्रद्धावन्तः मे इदम्‌ मतम्‌ नित्यम्‌ अनुतिष्ठन्ति, ते अपि कर्मभिः मुच्यन्ते।

ये मानवाः जी माणसे 

अनसूयन्तः अनसूयात् आक्षेप घेणे 

सू धातू प्रेरित करणे 

श्रद्धावन्तः श्रद्धावान 

मे मम माझे 

इदम्‌ हे

मतम्‌ मते 

नित्यम्‌ सततम् 

अनुतिष्ठन्ति, सुरू ठेवणे

अनु +स्था 

ते अपि त्यांना सुद्धा 

कर्मभिः कामापासून 

मुच्यन्ते मुच धातू मुक्ति मिळणे. 

सर्व मोहमायांपासून तटस्थ राहून अहंकार विरहित कर्म केल्यास काय घडते ते सांगणारा हा श्लोक.

ह्या श्लोकात मतम् हा शब्द महत्त्वाचा वाटतो.

प्रत्येकाला आपले स्वतःचे मत असते ते इतरांपेक्षा वेगळे असू शकते. इथे श्रीभगवान सुद्धा आपले मत (विचार) सांगत आहेत. (म्हणजे त्यांच्या मतापेक्षा वेगळे मत असू शकते हे त्यांना मान्य आहे, असा विचार करता येईल)इथे तत्व, नियम, ब्रह्मवाक्य असे शब्द महर्षि व्यासांनी वापरायचे टाळले आहेत

आधीच्या श्लोकात श्रीभगवान अर्जुनाला समर्पित भावनेने कर्म करायला सांगत आहेत, पण मग ज्यांचा देवावर विश्वास नाही त्यांनी काय करावे?

(गीतेमध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात)

ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा

जे लोक श्रद्धापूर्वक, निशंक मनाने माझ्या शिकवणीचे अनुसरण करतात तेसुद्धा त्यांच्या कर्मबन्धनातून मुक्त होतात.

—-----------------------------------------------------

ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम्।

सर्वज्ञानविमूढांस्तान्विद्धि नष्टानचेतसः।।3.32।।

ये तु अभ्यसूयन्तः मे एतत्‌ मतम्‌ न अनुतिष्ठन्ति, तान्‌ अचेतसः सर्व-ज्ञान-विमूढान्‌ नष्टान्‌ विद्धि।

ये तु पण जे

अभ्यसूयन्तः शंका घेणे 

 अभि + असू (असूया) 

मे माझे 

एतत्‌ हे 

मतम्‌ मत 

न अनुतिष्ठन्ति, अनुसरत नाहीत 

अनु तिष्ठन्ति स्था धातू 

तान्‌ त्यांची

अचेतसः अचेतस् बुद्धि-दरिद्री 

सर्व-ज्ञान-

विमूढान्‌ गोंधळलेला, मती भ्रष्ट

नष्टान्‌ नष्ट होणे 

 विद्धि विद् धातू जाणतो

मागील श्लोकात श्रीभगवानांनी दिलेल्या शिकवणीचे श्रद्धापूर्वक पालन करण्याचा परिणाम काय होतो ते वाचले, आता पुढे भगवान असे म्हणतात की

(माणसाने जिज्ञासू असावे, सतत ज्ञान प्राप्त करण्यासाठी धडपड करावी, पण एक वेळ अशी येते की त्याला त्याच्या मर्यादा समजतात. प्रत्येक गोष्टीचे कारण शोधून काढता येत नाही, अशा वेळी शरण जाणे हाच शहाणपणा असतो पण काही लोकांचा अहंकार इतका मोठा असतो की शरण जाण्याची कल्पना त्यांना फारशी रूचत नाही.)

जे लोक आपल्या अज्ञानामुळे, मूर्खपणामुळे मी सांगितलेला मार्ग शंकेपोटी अनुसरत नाहीत ते स्वतःच आपला विनाश ओढवून घेतात असे समज.

-----------------------------------------------------

सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि।

प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति।।3.33।।


भूतानि प्रकृतिम्‌ यान्ति। ज्ञानवान्‌ अपि स्वस्याः प्रकृतेः सदृशम्‌ चेष्टते। निग्रहः किम्‌ करिष्यति ?

भूतानि 

प्रकृतिम्‌ प्रकृती प्रमाणे 

यान्ति या धातू जाणे 

ज्ञानवान्‌ ज्ञान सम्पन्न 

अपि सुद्धा 

 स्वस्याः स्वतःचे. (स्व) 

प्रकृतेः प्रकृति 

 सदृशम्‌ स्वदृश च्याप्रमाणे 

चेष्टते चेष्ट् धातू प्रयत्न करणे 

निग्रहः मनावर ताबा 

किम्‌ करिष्यति ?

हा श्लोक ह्याच अध्यायातील 4 थ्या श्लोका चा आधार घेऊन समजून घ्यावा लागेल

जसे बुद्धिबळाच्या खेळात उंट तिरका आणि घोडा अडीच घरे चालतो तसेच माणसे कोणत्याही परिस्थितीत आपापल्या स्वभावाप्रमाणेच वागतात.

(अर्जुनाचा स्वभाव तर पराक्रमी) असे असून सुद्धा प्रत्येकालाच स्वतःची अध्यात्मिक उन्नती करून घ्यायची आहे.

म्हणून ह्या श्लोकात श्रीभगवान असे म्हणतात की

सर्व सजीव आपापल्या नैसर्गिक प्रवृत्ती प्रमाणे वागतात. ज्ञानी माणसे सुद्धा आपल्या स्वभावानुसार वागतात, मग आपल्या मनोवृत्तीला दडपून कशासाठी ठेवायचे?

--------------------------------------------------

इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ।

तयोर्न वशमागच्छेत्तौ ह्यस्य परिपन्थिनौ।।3.34।।


इन्द्रियस्य-अर्थे इन्द्रियस्य राग-द्वेषौ व्यवस्थितौ, तयोः वशम् न आगच्छेत् । हि तौ अस्य परिपन्थिनौ ।


इन्द्रियस्य-अर्थे इन्द्रियस्य ह्या किंवा त्या इन्द्रियाचे 

राग-द्वेषौ 

व्यवस्थितौ. स्थापन करणे 

वि+ अव + स्था 

तयोः तद् त्या दोघांचे 

वशम् वश् धातू इच्छा करणे 

न आगच्छेत् आगच्छ येणे 

 गम धातू जाणे 

हि च्या साठी 

तौ ते दोघे 

अस्य ( इदम) ह्याचा 

परिपन्थिनौ अडथळा 

 परिपन्थिन् मार्गात अडथळा आणणे

आपल्या मनात विरूद्ध भावनांचा खेळ सतत चालू असतो. एखादी गोष्ट आवडते एखादी गोष्ट अजिबात आवडत नाही. राग-लोभ, इच्छाआकांक्षा-तिरस्कार.

खाण्यापिण्याच्या बाबतीत तर आपले खूपच नखरे असतात. एखाद्या गोड खाऊ माणसासमोर कारल्याची भाजी ठेवली तर त्याला राग येऊ शकतो.

श्रीभगवान हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहेत.

आपल्या शरीराला आवश्यक अशा गोष्टी आपण करणे आवश्यकच आहे पण त्यामधे आपला राग-लोभ सुद्धा असतो.

(पण आता जर आपण अध्यात्मिक उन्नती च्या मार्गावर असू तर)

अशा गोष्टींचे गुलाम होऊन आपण चालणार नाही (तर आपण ह्यावर मात केली पाहिजे) कारण ह्या गोष्टी आपल्या (अध्यात्मिक) मार्गातील अडसर आहेत.

-------------------------------------------------

श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात्।

स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः।।3.35।।

 

स्वनुष्ठितात्‌ परधर्मात्‌ विगुणः स्वधर्मः श्रेयान्‌। स्वधर्मे निधनम्‌ श्रेयः। परधर्मः भय-आवहः।

स्वनुष्ठितात्‌ स्व अनुष्ठित

अनुष्ठित तडिस नेलेले काम 

परधर्मात्‌ अन्यधर्मात्

 विगुणः गुणरहित 

स्वधर्मः 

श्रेयान्‌ श्रेष्ठ 

स्वधर्मे 

निधनम्‌ मृत्यू 

श्रेयः उत्तम

 परधर्मः दुसर्‍याचे नियत कर्म 

भय-आवहः. भीतीदायक 

हा श्लोक वाचता वाचता सहज मनात विचार आला. आजच्या समानतेच्या जमान्यात स्त्री पुरुषांनी कितीही एकसारखे दिसण्याचा, वागण्याचा प्रयत्न केला तरी पुरुष काही बाळाला जन्म देऊ शकत नाही.

शिक्षकाचा धर्म शिकवण्याचा (पण गावातील शिक्षकांना इतर बरीच कामे करावी लागतात) 

4 थ्या आणि 33 व्या श्लोकांच्या अर्थांच्या पार्श्वभूमीवर श्रीभगवान आपल्या नियत कर्मावर भाष्य करत आहेत.

क्षत्रियाचा धर्म लढण्याचा, त्याने अहिंसेच्या मार्गाचा पुरस्कार करून चालेल का?

श्रीभगवानकृष्ण म्हणताहेत, दुसर्‍याचे नेमून दिलेले काम आपण अगदी चोख करण्यापेक्षा 

आपल्याकडून अपेक्षित असलेले काम जसे जमेल तसे केले तरी चालेल. एकवेळ मरण पत्करले तरी चालेल पण असे दुसर्‍याचे काम करणे फारच भीतीदायक आहे.

-----------------------------------------------

अर्जुन उवाच


अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पूरुषः।

अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः।।3.36।।

अर्जुन उवाच - अथ हे वार्ष्णेय!

 अयं पूरुषः अनिच्छन्‌ अपि बलात्‌ नियोजितः इव केन प्रयुक्तः, पापम्‌ चरति?

अर्जुन उवाच - अर्जुनाने विचारले 

 अथ. तर मग 

 हे वार्ष्णेय! हे वार्ष्णेया 

अयं पूरुषः एखादा माणूस 

अनिच्छन्‌ अपि इच्छेविरुद्ध 

  बलात्‌ इव जसे की सक्तीने 

 नियोजितः वहावत जाणे 

प्रयुक्तः, प्रेरित 

 केन कशासाठी 

पापम्‌ चरति? वाईट कृत्य करतात? 

35 वा श्लोक ऐकल्यानंतर सहाजिकच अर्जुनाच्या मनात प्रश्न आला तो त्याने विचारला

हे वार्ष्णेया (कृष्ण यादव कुळात जन्माला आला होता ह्या गवळी समाजाचे विशेषण वार्ष्णेय जे वृषभ ह्या शब्दावरून आले,वृष्णिकुलसम्भव)

तसे बघायला गेले तर खूप महत्वाचा श्लोक, अतिशय मार्मिक प्रश्न जो आजही आपल्याला भेडसावतो. (माणसे अशी वागतातच का? ) गुन्हेगारी जगताचे विश्लेषण करताना उद्भवणारा सर्वात मुख्य प्रश्न. (आपण गरजेपोटी गुन्हा करणार्यांना तात्पुरते बाजूला ठेवू, जे लोक जाणूनबुजून गुन्हा करतात त्यांचे काय?) 

हे कृष्णा इच्छा नसताना सुद्धा एखादा माणूस कुकर्म कशासाठी करतो, असे वाटते की त्याला तसे करण्यास कोणी भाग पाडत आहे.

--------------------------------------------

श्री भगवानुवाच


काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः।

महाशनो महापाप्मा विद्ध्येनमिह वैरिणम्।।3.37।।

 

श्रीभगवानुवाच - एषः रजः गुण-समुद्भवः एषः कामः, क्रोधः महा-अशनः महा-पाप्मा एनम्‌ इह वैरिणम्‌ विद्धि।

श्रीभगवानुवाच -

 एषः

 रजः गुण-समुद्भवः रजो गुणातून निर्माण झालेले 

समुद्भवः सम उत् भवः निर्माण होणे 

 एषः हा 

 कामः, 

क्रोधः राग 

महा-अशनः महाभोजन 

महा-पाप्मा महापाप 

 एनम्‌ ( एतद्) ह्याचा 

इह. इथे 

 वैरिणम्‌ वैरीन् शत्रू 

विद्धि. जाणून घे

श्रीभगवानांनी आता अर्जुनाने (36 व्या श्लोकात) विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्यायला सुरुवात केली आहे.

संस्कृत मध्ये काम ह्या शब्दाचे इच्छा, आकांक्षा, हाव, हवस असे अनेक अर्थ आहेत. 

रजोगुणामूळे निर्माण होणारी अभिलाषा (जी पूर्ण झाली नाही तर) त्यातून निर्माण होणाऱा क्रोध आपली सदविवेक बुद्धि गिळून टाकतो (क्रोध म्हणजे एकप्रकारचा अग्नी) आणि आपल्याला पाप करायला भाग पाडतो. (म्हणूनच, काम क्रोध) हे आपले सर्वात मोठे शत्रू आहेत असे समज. (जे आपला घात करतात. सर्व काही भस्मसात करतात) 

"अथातो ब्रह्म जिज्ञासा" चला परम सत्याचा शोध घेऊ या. (बादरायण ब्रह्मसूत्र) इच्छा अभिलाषा जरूर असाव्यात पण त्या परम सत्याचा शोध घेणार्‍या असाव्यात.

------------------------------------------------------

धूमेनाव्रियते वह्निर्यथाऽऽदर्शो मलेन च।

यथोल्बेनावृतो गर्भस्तथा तेनेदमावृतम्।।3.38।।


यथा धूमेन वह्निः, मलेन च आदर्शः, आव्रियते, यथा उल्बेन गर्भः आवृतः, तथा तेन इदम्‌ आवृतम्‌।

यथा धूमेन वह्निः, जसे धूरामूळे अग्नि 

मलेन च धुळीमुळे 

आदर्शः, दर्पण 

आव्रियते, अवृतः भवति 

आ+वृ धातू आच्छादन करणे

 यथा जसे 

उल्बेन उल्ब गर्भाच्या भोवती असलेले आवरण 

उच् धातू एकत्र होणे 

गर्भः

 आवृतः, झाकून टाकतात 

तथा तेन तसेच त्याने 

इदम्‌ ह्याचे 

आवृतम्‌।


ह्या श्लोका तील तेन इदम् हे शब्द महत्त्वाचे, जे आधीच्या श्लोकाशी संबंध दर्शवतात.

काम ह्या शब्दाचा अर्थ लालसा, ही लालसा क्रोधाग्नी ला जन्माला घालते ज्यामध्ये आपली सदविवेक बुद्धि जळून जाते हे तीन उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे.

पहिली दोन उदाहरणे आपल्याला सहज दृष्टीस पडतात पण तिसरे उदाहरण का दिले असावे बरे असा प्रश्न पडतो.

धूरामूळे अग्नि पूर्ण दृष्टिस पडत नाही पण तो आतल्या आत धुमसत असतो. म्हणजे इथे लालसा कमी प्रमाणात असून सदविवेक बुद्धि शाबूत आहे असे म्हणायचे असावे.

आरशावर जेव्हा धूळ साठते तेव्हा आरशाचा काहीच उपयोग नाही. (आपली सदविवेक बुद्धि पार झाकोळून जाते) आणि ही धूळ सहज उडून जात नाही, त्यासाठी फडके घेऊन पुसण्याचे कष्ट घ्यावे लागतात.

गर्भाभोवती जे आवरण असते त्याला भेदून बाहेर पडण्यासाठी (आईला) बाळाला कष्ट तर होतातच पण विशिष्ट काळ सुद्धा द्यावा लागतो. ही प्रक्रिया इतकी सहज सोपी नाही.

---------------------------------------

आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा।

कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च।।3.39।।

हे कौन्तेय! दुष्पूरेण कामरूपेण अनलेन नित्यवैरिणा एतेन च ज्ञानिनः ज्ञानम्‌ आवृतम्‌।

हे कौन्तेय! कुंतीसूत 

दुष्पूरेण दुष्पूर अतृप्त, आधाशी 

दुष्पूरेण + अनलेन

अनलेन अनल अग्नि 

कामरूपेण कामरुप 

नित्यवैरिणा नित्यं वैरीन्

 एतेन ह्याने 

एतद् म्हणजे हा

 ज्ञानिनः प्र. ब. व. ज्ञानी माणसे 

ज्ञानिनः ष. एकवचन ज्ञानी माणसांचे 

ज्ञानम्‌ ज्ञान 

 आवृतम्‌ म्हणजे आच्छादितम्

आता काम म्हणजे लालसा ह्याला अग्नी ची उपमा दिली आहे. अग्नी ला जितके काही अर्पण करत जाऊ तितका तो वाढत जातो. (म्हणजे कामेच्छापूर्ती हा मार्ग योग्य नाही) जे श्रीमंत असतात त्यांना अजून जास्त पैसे मिळावे असे वाटते, त्यासाठी ते काहीही करायला तयार असतात. जुगारी आपल्या हव्यासापोटी देशोधडीला लागतो.

न कहापणवस्सेन, तित्ति कामेसु विज्जति, अप्पस्सादा दुखा कामा, इति विज्ञाय पण्डितो।

(धम्मपद श्लोक-186) भगवान बुद्ध

पण हा श्लोक ज्ञानी माणसासाठी लिहीला आहे. सर्वसामान्य माणसांनी धनप्राप्ती साठी प्रयत्न करू नये असे म्हटलेले नाही. त्यांनी आपल्या आशाआकांक्षा सोडून द्याव्यात असे म्हटलेले नाही.

पण जो आता कर्मयोगाचा अंगिकार करत आहे (जो स्वतःच्या स्वार्थासाठी नाही तर दुसर्यासाठी कर्म करत आहे) त्याच्या मनात लालसा असणे त्याच्या शत्रू समान आहे.

म्हणून श्रीभगवान असे म्हणतात की

हे कुन्तीपुत्र

ज्ञानी माणसाची लालसा ही अग्नि सारखी भडकत राहते, जी कधी तृप्त होत नाही म्हणून ती त्याच्या शत्रू सारखी असते ज्याच्या मागे त्याचे ज्ञान (सदविवेकबुदधि) झाकोळून जाते.

-----------------------------------------------

इन्द्रियाणि मनो बुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते।

एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम्।।3.40।।

इन्द्रियाणि मनः बुद्धिः अस्य अधिष्ठानम्‌ उच्यते। एषः एतैः ज्ञानम्‌ आवृत्य देहिनम्‌ विमोहयति।

इन्द्रियाणि इन्द्रिय 

मनः बुद्धिः 

अस्य ह्याचे 

इदम् हे 

अधिष्ठानम्‌ अधिष्ठान आसन निवासस्थान 

अधि + स्था 

उच्यते. म्हटले आहे 

 वच् धातू बोलणे 

 एषः एतैः हे, ह्यांच्यामुळे 

(एतद् हा) 

ज्ञानम्‌ 

आवृत्य आङ् + वृतु वृ धातू आच्छादन करणे 

देहिनम्‌ देहिन् देह

विमोहयति। मोहित करतात 

वि +मुह् धातू बुद्धि भ्रष्ट होणे

आधीच्या 3 श्लोकात ' काम ' म्हणजे लालसा, अभिलाषा, हाव हे कसे क्रोधाला आमंत्रण देतात आणि आपले शत्रू ठरतात हे वाचले.

मग हा शत्रू असतो तरी कुठे? (कुठे लपून बसलेला असतो?) ह्याबद्दल श्रीभगवान म्हणतात

आपले अवयव, मन, (भावना) बुद्धि हेच तर त्या शत्रू चे निवासस्थान आहे. वासनांच्या प्रभावामुळे आपले मन भ्रमिष्ट होते, भ्रमिष्ट मन बुद्धि पोखरून टाकते जे आपल्या ज्ञानावर पडदा टाकतात आणि हे धारण करणारा (इन्द्रिय, मन, बुद्धि) देह वासनांना बळी पडतो.

------------------------------------------

तस्मात्त्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ।

पाप्मानं प्रजहि ह्येनं ज्ञानविज्ञाननाशनम्।।3.41।।


तस्मात्‌ हे भरतर्षभ! त्वम्‌ आदौ इन्द्रियाणि नियम्य, ज्ञान-विज्ञान-नाशनम्‌ एनं पाप्मानम्‌ हि प्रजहि ।


 हे भरतर्षभ! भरत वंशातील ख्यातनाम, अर्जुनाचे विशेषण 

तस्मात्‌ म्हणून 

त्वम्‌ तू 

आदौ आदी सुरवातीपासून 

 इन्द्रियाणि

 नियम्य, नियंत्रित कर 

यम् धातू नियंत्रण करणे 

 ज्ञान-विज्ञान

नाशनम्‌ विनाशक 

 एनं हा 

पाप्मानम्‌ पापी

 हि नक्कीच 

प्रजहि विजय मिळविणे 

 प्र +हन् धातू मारणे 

आज आपण ज्याला विज्ञान म्हणतो, जे प्रयोगशाळेत कधीही सिद्ध करता येते तो विज्ञानाचा अर्थ इथे अपेक्षित नाही. सध्याच्या काळाप्रमाणे आपण त्याला ज्ञान , आत्मज्ञान, अंतःप्रेरणा असे म्हणू शकतो.

ह्या शब्दांचा नक्की फरक कसा करायचा?

जे ज्ञान आपल्याला उपजत असते ती अंतःप्रेरणा.

ज्या गोष्टी आपल्याला शिकवल्या जातात, आपण जे आत्मसात करतो ते ज्ञान

आणि ज्या गोष्टी आपण अनुभवातून शिकतो ते आत्मज्ञान. अगदी साधे उदाहरण द्यायचे झाले तर साखर गोड असते हे ज्ञान आपल्याला असते पण गोडवा म्हणजे काय ते आपल्याला साखर खाल्यानंतरच समजते ते झाले आत्मज्ञान.

आता आपला शत्रू कुठे आहे ते समजले आहे, आता त्यावर उपाय काय? ह्यावर श्रीभगवान म्हणतात

अर्जुना!

म्हणूनच अगदी सुरवातीपासून तू आपल्या इन्द्रियांवर काबू ठेव, ह्या पापरूपी लालसेवर विजय मिळव जी आपल्या ज्ञान आणि आत्मज्ञान ह्यासाठी विनाशकारी आहे.

-------------------------------------------------------------

इन्द्रियाणि पराण्याहुरिन्द्रियेभ्यः परं मनः।

मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धेः परतस्तु सः।।3.42।।


इन्द्रियाणि पराणि आहुः, इन्द्रियेभ्यः परम्‌ मनः, मनसः तु परा बुद्धिः, बुद्धेः यः तु परतः सः।


इन्द्रियाणि इन्द्रिय 

पराणि श्रेष्ठ 

आहुः असे म्हणतात 

ब्रू धातू बोलणे 

 इन्द्रियेभ्यः इन्द्रिया पेक्षा 

परम्‌ श्रेष्ठ

मनः, 

मनसः 

तु परन्तु 

परा श्रेष्ठ 

 बुद्धिः, 

बुद्धेः 

यः यद् जो

 तु 

परतः उत्कृष्ट 

 सः तो (आत्मा) 

आधीच्या श्लोकात सांगितलेल्या शत्रू चे निवासस्थानांचे वर्गीकरण ह्या श्लोकात केले आहे. आपले शरीर जड पदार्थांपासून तयार आहे ज्यामधे पाच ज्ञानेन्द्रिय आहेत ज्यामुळे आपल्याला जाणीवा होतात जसे स्पर्श, वास, चव, आकार आणि शब्द.

ह्या इन्द्रिया पेक्षा मन श्रेष्ठ आणि मनापेक्षा बुद्धि श्रेष्ठ.. आणि आत्मा बुद्धि पेक्षा ही श्रेष्ठ.

ह्याच अर्थाचा श्लोक कठोपनिषद् मधे दिला आहे.

इन्द्रियेभ्यः परा ह्यर्था अर्थेभ्यश्च परं मनः।

मनसस्तु परा बुद्धिर्बुद्धेरात्मा महान्परः ॥ 1.3

----------------------------------------------------------------

एवं बुद्धेः परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना।

जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम्।।3.43।।

 

एवम्‌ बुद्धेः परम्‌ बुद्ध्वा आत्मना आत्मानम्‌ संस्तभ्य, हे महाबाहो!

 काम-रूपम्‌ दुरासदम्‌ शत्रुम्‌ जहि।

हे महाबाहो

एवम्‌ म्हणून 

बुद्धेः परम्‌ बुद्धि पेक्षा श्रेष्ठ 

बुद्ध्वा 

बुध् धातू समजून घेणे 

 आत्मना आत्म्याचे 

आत्मानम्‌ आत्म्याने 

आत्मन्

 संस्तभ्य निश्चल करणे 

सम् + स्तम्भ् 

काम-रूपम्‌ कामरुपी

दुरासदम्‌ दुरासद भयंकर 

शत्रुम्‌ शत्रू 

जहि कर्तरी लोट लकार 

हन् धातू मारणे 

तिसर्‍या अध्यायातील हा शेवटचा श्लोक अर्थातच निष्कर्ष सांगणारा

आपली ज्ञानेन्द्रिये आपल्या मनाच्या आदेशानुसारच काम करतात. जसे कोणी आपल्याशी बोलत आहे पण आपले लक्ष मात्र दुसरीकडे असेल तर आपल्याला ऐकू येत नाही. पटकन आपण म्हणतो, जरा परत सांग. 

म्हणून मन श्रेष्ठ. 

आपल्या बुद्धि ला जाणवत असते आज आपले मन उदास आहे किंवा आनंदी आहे. 

म्हणून बुद्धि मनापेक्षा श्रेष्ठ. 

बुद्धि पेक्षा श्रेष्ठ आत्मा. आत्मा हा तर साक्षात भगवानांचा अंश. 

ह्याच अर्थाचा कठोपनिषद् मधील श्लोक. 

आत्मानं रथिनं विद्धि शरीरं रथमेव तु। 

बुद्धिं तु सारथिं विद्धि मनः प्रग्रहमेव च ।। 

इन्द्रियाणि हयानाहुर्विषयां स्तेषु गोचरान्।

आत्मेन्द्रियमनोयुक्तं भोक्तेत्याहुर्मनीषिणः।। 

(कठोपनिषद्-1.3.3-4)

म्हणून श्रीभगवान असे म्हणतात

हे महाबाहो

आत्मा हा बुद्धि, मन, इन्द्रिय ह्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे समजून घे आणि ह्या आत्मज्ञानाने कामरुपी भयंकर शत्रूचा नायनाट कर आणि आपल्या ( मन, बुद्धि, इन्द्रिय) आत्म्यावर काबू ठेव.

—--------------------------------------------------------------------------                                      🙏🙏🙏🙏