शुक्रवार, २० डिसेंबर, २०२४

मुण्डकोपनिषद् 1.2.1-1.2.13

 मुण्डकोपनिषद् प्रथम मुण्डक द्वितीय खण्ड्

तदेतत् सत्यं मन्त्रेषु कर्माणि कवयो यान्यपश्यंस्तानि त्रेतायां बहुधा संततानि। तन्यचरथ नियतं सत्यकामा एष वः पन्थाः सुकृतस्य लोके ॥ मुण्डकोपनिषद् 1.2.1।। 

कवयः मन्त्रेषु  कर्माणि यानि अपश्यन् तत् एतत् सत्यम्। त्रेतायम् तानि बहुधा सन्ततानि। सत्यकामाः नियतम् तानि आचारथ। सुकृतस्य लोके वः एषः पन्थाः ॥


कवयः द्रष्टे कवि पु. प्र. ब. व. 

मन्त्रेषु मन्त्रांमधे मन्त्र पु. स. ब. व. 

कर्माणि कर्मे कर्मन् नपु. द्वि. ब. व. 

यानि जी यद् नपु. द्वि. ब. व. 

अपश्यन् पाहिली दृश् धातू कर्तरि लडः लकार प्र. पु. ब. व. 

तत् ते तद् नपु. प्र. ए. व. 

एतत् हे एतद् नपु. प्र. ए. व. 

सत्यम् सत्य नपु. द्वि. ए. व. 

त्रेतायाम् त्रेतायुगात त्रेता स्त्री. स. ए. व. 

तानि ती तद् नपु. द्वि. ब. व. 

बहुधा विविध प्रकारे अव्यय 

सन्ततानि सतत सन्तत नपु. द्वि. ब. व. 

सत्यकामाः सत्याची इच्छा करणारे सत्यकाम पु. प्र. ब. व. 

नियतम् नेहमी नियत पु. द्वि. ए. व. 

तानि ती तद् नपु. द्वि. ब. व. 

आचरथ आचरण करावे आड्ः +चर् धातू कर्तरि लट लकार म. पु. ब. व. 

सुकृतस्य शुभ कर्माचे सुकृत पु. ष. ए. व. 

लोके जगात लोक नपु. स. ए. व. 

वः तुमचा युष्मद् ष. ब. व. 

एषः हा एतद् पु. प्र. ए. व. 

पन्थाः पन्थ पु. प्र. ब. व.

मुण्डकोपनिषदाच्या प्रथम मुण्डकातील प्रथम खण्डात आपण परा आणि अपरा विद्या यामधील फरक जाणून घेतला. आता प्रथम मुण्डकातील द्वितीय खण्डात ऋग्वेदातील मंत्र आणि त्या अनुषंगाने केली जाणारी कर्मे ह्यांचे विवेचन वाचायला मिळणार आहे. पुस्तक लिहिताना आपण जसे सुरवातीला विषयाची तोंड ओळख करून देतो आणि त्यानंतर एक एक मुद्द्यावर चर्चा करतो तशीच साधारण रचना येथे दिसून येत आहे. ह्या खण्डात विविध कर्मकांडांवर चर्चा केली आहे. ते वाचून मनात संभ्रम निर्माण होतो की ह्या उपनिषदात कर्मकांडांवर इतका भर कशासाठी दिला आहे? अर्थात त्याचे उत्तर दुसर्‍या मुण्डकात आपोआपच मिळते. 

त्रेतायां ह्या शब्दाचा अर्थ नेमका कसा घ्यावा, केवळ त्रेता युगाचा उल्लेख महर्षींना करावयाचा आहे का ते तपासून पहावे लागेल. कारण त्रेता म्हणजे तीन गोष्टींचा संग्रह. म्हणजे येथे तीनही वेदांचा उल्लेख केला आहे का?

सुभाषितानुसार

त्रेतायां मंत्र-श्क्तिश्च, ज्ञानशक्तिः कृते-युगे द्वापरे युद्ध-शक्तिश्च, संघशक्ति कलौ युगे।।

सत्ययुगात ज्ञान शक्ति, त्रेता युगात मन्त्र शक्ति तर द्वापर युगात युद्ध शक्ति चे प्रस्थ होते मात्र कलियुगात संघटनात्मक शक्ति हीच प्रधान आहे.  

मंत्र म्हणजे उपदेश. त्यानंतर सन्तत आणि नियत असे दोन शब्द वापरले आहेत. म्हणजेच जे उपदेश दिले आहेत, त्या प्रमाणे ते नेहमी आणि नियमपूर्वक पाळायचे आहेत.

ह्या मंत्राचा थोडक्यात अर्थ असा की

मंत्रामधे जी विविध प्रकारची कर्मे महर्षींना आढळली, जी त्रेतायुगात आचरली जात होती. सत्य जाणून घेऊ इच्छिणाऱ्यांनी ती नियमित आणि नियमपूर्वक आचरणात आणावी. या जगात चांगल्या कर्मांची फळे प्राप्त करण्याचा हाच योग्य मार्ग आहे.

यदा लेलायते ह्यर्चिः समिद्धे हव्यवाहने।

तदज्यभागवंतरेणाहुतीः प्रतिपदायेत्॥ 1.2.2।।

यदा समिद्धे हव्यवाहने हि अर्चिः लेलायते तदा अज्यभागौ अंतरेण आहुतीः प्रतिपादयेत् ॥


यदा जेव्हा अव्यय 

समिद्धे प्रज्वलित झालेल्या समिद्धः पु. स. ए. व. सम्+इन्ध् धातू प्रज्वलित होणे क्तः प्रत्यय 

हव्यवाहने यज्ञाग्निमधे हवि+वाहन नपु. द्वि. द्वि. व.

हविस् हु धातू यत् प्रत्यय हव्य, हव्यस्य वाहनं हव्यवाहनम् 

हि अर्चिः ज्वाळा अर्चिस् नपु. द्वि. ए. व. 

लेलायते पुन्हा पुन्हा उसळणाऱ्या लेलीय प्र. ए. व. 

लल् धातू लट् लकार प्र. पु. ए. व. 

किंवा ली (श्र्लेषणे) +यड्ः प्रत्यय =लेलीय 

तदा तेव्हा अव्यय 

अज्यभागौ तूप सोडण्याची जागा 

आ-अञ्ज्-क्यप् प्रत्यय तूप 

भागौ भाग पु. प्र. द्वि. व. 

अंतरेण दोन भागांत अंतर नपु. तृ. ए. व. 

आहुतीः आहुति स्त्री. प्र. ब. व. 

आङ् + हु धातू + क्तिन् प्रत्यय 

प्रतिपादयेत् अर्पण करावे प्रति+पद् धातू मिळणे + णिच् दिवादिः कर्तरि विधिलिङ् लकार प्र. पु. ए. व. 

आधीच्या मंत्रात सांगितल्याप्रमाणे निरनिराळ्या कर्मकांडासंबंधि आपण आता वाचणार आहोत. कर्मकांडामधे सर्वात महत्त्वाचा तो यज्ञ.

यज्' या धातूपासून निर्माण झालेला हा शब्द. याचा अर्थ 'देवादिकांचा आदर , संगतीकरण, आणि दान' असा होतो. आपणापेक्षा जे श्रेष्ठ आहेत, त्यांची पूजा करणे म्हणजे यज्ञ. आपल्या मनात मैत्रीची भावना ठेवून सर्वांशी एका विचाराने जगताना प्रगती करण्याची कला म्हणजे संगतीकरण. आपल्यापेक्षा कनिष्ठ व्यक्तींना ज्ञान, बल आणि धन ह्या स्वरुपात मार्गदर्शन करणे म्हणजे दान होय. या संपूर्ण क्रियेला यज्ञ अस म्हणतात.

अग्नीचे आपल्या आयुष्यातील महत्त्व वेगळे सांगायला नको. मात्र ह्या अग्नीचे आणि यज्ञीय अग्नीचे पावित्र्य वेगळे असावे असे मत स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांनी नोंदविले आहे. ( भारतीय संस्कृती कोश, खंड सातवा, पृष्ठ क्र. 600)

यज्ञ हा शब्द ऋग्वेदात अनेकदा वाचायला मिळतो, त्याचा अर्थ बहुतेक वेळा श्रेष्ठ कर्म असाच घेतला गेला आहे. संहितांचे जे ब्राह्मण्य ग्रंथ आहेत त्यामध्ये आयुष्यातील छोट्या-मोठ्या प्रसंगांसाठी यज्ञ करण्यास सांगितले आहेत. ब्राह्मण्य ग्रंथांचा समावेश श्रुतींमध्ये होतो म्हणून ब्राह्मण्य ग्रंथात सांगितलेल्या यज्ञाला 'श्रौतयज्ञ' असे म्हणले जाते.

गृहस्थाने पाच यज्ञ करावेत असे म्हटले आहे. 

देवयज्ञ, पितृयज्ञ, भूतयज्ञ, मनुष्ययज्ञ, ब्रह्मयज्ञ. 

ह्या यज्ञांमुळे देव, पिता, पशू, मनुष्य, समाज व गुरू या पाचही ऋणातून मुक्त होता येते असे म्हणतात. यज्ञ प्रक्रियेत समिधांची आहुती देण्याची पद्धत आहे. त्याच बरोबर 'इदम् न मम् ' असे म्हणण्याची पद्धत आहे. प्रथम मुण्डकातील प्रथम खण्डातील 7 व्या मंत्रात ब्रह्मदेवाने पृथ्वीमधून ओषधि वनस्पती निर्माण केल्या असे वाचले होते. त्याच वनस्पतींपैकी काही समिधा म्हणून आहुती द्यायच्या आणि हे सर्व माझे नाही असे म्हणायचे.

ह्या मंत्राचा थोडक्यात अर्थ असा की

अग्नी प्रज्वलित केल्यानंतर जेव्हा ज्वाला भडकल्यानंतर जेथे तूप सोडले जाते त्याठिकाणी आहुतींना अर्पण करावे.

यस्याग्निहोत्रमदर्शमपौर्णमासं अचातुर्मास्यमनाग्रयणमतिथिवर्जितं च। अहुतमवैश्वदेवमविधिना हुतं आसप्तमांस्तस्य लोकान् हिनस्ति ॥ 1.2.3।।

यस्य अग्निहोत्रम् अदर्शम् अपौर्णमासम् अचातुर्मास्यम् अनाग्रयणम् अतिथिवर्जितम् अहुतम् अवैश्वदेवम् अविधिना हुतम् च तस्य आसप्तमान् लोकान् हिनस्ति ॥


यस्य ज्याचे यद् पु. ष. ए. व. 

अग्निहोत्रम् अग्निहोत्र नपु. द्वि. ए. व. 

अदर्शम्  दर्श अमावस्या यज्ञ कर्म शिवाय 

अ +दर्शम् दर्श नपु. द्वि. ए. व. 

अपौर्णमासम् पौर्णिमा यज्ञ कर्म शिवाय अ+पौर्णमास नपु. द्वि. ए. व. 

अचातुर्मास्यम् चातुर्मास यज्ञ कर्म शिवाय

अ+चातुर्मास्य

 नपु. द्वि. ए. व. 

अनाग्रयणम् नव धान्य यज्ञकर्म शिवाय अन्+आग्रयणम्

नपु. द्वि. ए. व. 

अग्रे अयनं 

अतिथिवर्जितम् अतिथि शिवाय  

अतिथिवर्जित नपु. द्वि. ए. व.   व्रज् धातू सोडणे 

अहुतम् अयोग्य आहुती अ+हुत नपु. द्वि. ए. व. 

हु धातू भक्षण करणे 

अवैश्वदेवम् विश्वदेव कर्म रहित 

अ+वैश्वदेव नपु. द्वि. ए. व. 

अविधिना नियमबाह्य अ+विधि पु. तृ. ए. व. 

हुतम् हवन हुत नपु. द्वि. ए. व. 

च सुद्धा अव्यय 

तस्य त्याचे तद् पु. ष. ए. व. 

आसप्तमान् सातपर्यंत आ+सप्तम पु. द्वि. ब. व. 

लोकान् पिढ्या लोक पु. द्वि. ब. व. 

हिनस्ति नष्ट होतात हिंस् धातू कर्तरि लट लकार प्र. पु. ए. व.

प्रथम मुण्डकातील द्वितीय खण्डातील पहिल्या मंत्रात नियमित आणि नियमपूर्वक कर्मकांडे करण्यास सांगितले होते. तसे न केल्यास त्याचे परिणाम काय होतील त्याचे वर्णन ह्या मंत्रात केले आहे. ते वाचण्याआधी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. जसे न्यायसंस्था आणि निरनिराळे कायदे ही ब्रिटिशांनी आपल्याला दिलेली देणगी. त्यापूर्वी धर्म म्हणजे आपली कर्तव्ये होती. आपण आपली कर्तव्ये नीट पार पाडावी त्यासाठी धार्मिक गोष्टींचा वापर लोकांवर वचक ठेवण्यासाठी करत असावे. जेव्हा परा आणि अपरा विद्यांचा स्पष्ट उल्लेख केला जातो तेव्हा अपरा विद्या म्हणजेच कनिष्ठ विद्या ह्या सामान्य माणसांसाठी असाव्यात असे मनात ठेवून हे मंत्र वाचले तर ते फारसे वावगे वाटत नाहीत.

ह्या मंत्रात अग्निहोत्र असा उल्लेख आहे. अग्निहोत्र आणि यज्ञ ह्यात नेमका फरक काय? तर काहीच नाही. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी दैनंदिन केला जाणारा यज्ञ म्हणजे अग्निहोत्र. आयुर्वेदात ह्याचे फायदे सांगितले आहेत.

दर्श अमावस्या हि पितृपक्षातील पितरांप्रती समर्पित आहे.

पौर्णिमा आणि चातुर्मास ह्या बद्दल आपण जाणतोच. बहुत करून पवित्र लोकांच्या जयंती पौर्णिमेला असतात. आणि चातुर्मासातील दिवस आपण पवित्र मानतो. 

आपल्याकडे नवीन धान्य तयार झाले की त्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आग्रयण यज्ञ करण्याची पद्धत आहे. 

अत् धातू फिरत राहणे+ इथिन्=अतिथि 

अ+तिथि,ह्यामधील तिथि हा शब्द आपल्याला माहीत आहे. तिथिशिवाय म्हणजे अचानक येणारा तो अतिथि.

विश्वदेव म्हणजे देवांचा एक समूह. धर्मदेवांनी दक्षाच्या 10 मुलींशी विवाह केले त्यापैकी एकीचे नाव विश्वा, तिच्या पुत्राचे नाव विश्वदेव. ऋग्वेदात विश्वदेवांचा उल्लेख सापडतो. 

भविष्य पुराणात दहा विश्वेदेवांचे उल्लेख आहेत. 

कृततुर्दक्षो वसुः सत्यः कालकामो धृतिः कुरुः। शङ्कुमात्रो वामनश्च विश्वेदेवा दश स्मृतः। ।।  भविष्य पुराण. 1.125.12 

क्रतु, दक्ष, वसु, सत्य, काला, काम, धृति, कुरु, शंकुमात्रा, वामन हे दहा विश्वेदेव आहेत.

सर्वात पहिल्या मंत्राप्रमाणे (1.1.1)विश्वकर्ता हा ब्रह्मदेव आहे.

ह्या मंत्रातील आ+सप्तम ह्याचा अर्थ समजून घ्यायला हवा.

'आ'उपसर्गाचा अर्थ पर्यंत असा होतो.

त्यापुढे लोकान् हा शब्द वापरला आहे.

आपल्या धार्मिक समजूत प्रमाणे सात लोक आहेत. भूलोक (पृथ्वी और आकाश), भुवर्लोक , स्वर्गलोक , महर्लोक , जनार्लोक , तपलोक आणि सत्यलोक.

आधी चर्चा केल्यानुसार जर कोणी नियमबाह्य (अविधि) वागत असेल (ह्या मंत्रात नियमबाह्य यज्ञ करत असेल) तर हे सात लोक त्याला प्राप्त होणार नाहीत.

आसप्तम ह्याचा दुसरा अर्थ आधीच्या सात पिढ्या असाही काही ठिकाणी लिहिला आहे.

ह्या मंत्राचा सारासार विचार करता गुरू आपल्या शिष्याना काय सांगू इच्छितात. तर अंगी शिस्त बाळगून, नियमबाह्य कामे टाळून दानधर्म आणि दयावृत्ती असू द्यावी. ह्या सर्वाद्वारे आत्म उन्नती साधावी.

ह्या मंत्राचा थोडक्यात अर्थ असा की

ज्याचे अग्निहोत्र दर्शकर्मविरहीत आहे तसेच पौर्णिमा व चातुर्मास यज्ञ विरहित आहे. (ज्याचे अग्निहोत्र) कापणीला आलेल्या नवीन धान्य अर्पण करण्याचा यज्ञ, अतिथिपूजनवर्जित, योग्य प्रकारे आहुती न दिलेले, वैश्वदेव पूजन वर्जित किंवा नियमबाह्य यज्ञ असे असेल तर त्याचे सात पिढ्यातील लोक नष्ट होतात.


काली काली कराली च मनोजवा च सुलोहिता या च सुधूम्रवर्णा।

स्फुलिङ्गिनी विश्वरुची च देवी लेलायमाना इति सप्त जिह्वाः ॥1.2.4।।

काली कराली मनोजवा सुलोहिता सुधूम्रवर्णा स्फुलिङ्गिनी विश्वरुची देवी च इति लेलायमानाः सप्त जिह्वाः ॥


काली काळी काली स्त्री. प्र. ए. व. 

कराली अती उग्र कराली स्त्री. प्र. ए. व.

कराल + ङीष् प्रत्यय 

मनोजवा मनासारखे जोरात धावणे, चंचल मनोजवा स्त्री. प्र. ए. व. 

जु सौत्रो धातू धावणे

 + अच् टाप् 

मन इव जवो यस्याः 

सुलोहिता लाल रंगाची सुलोहिता स्त्री. प्र. ए. व. 

लोहित + स्त्रियां टाप्

लोहित=रुह + इतन् प्रत्यय 

सुधूम्रवर्णा धूरकट सुधूम्रवर्णा

स्त्री. प्र. ए. व. 

सु+धूम्र + टाप् प्रत्यय 

स्फुलिङ्गिनी ठिणगी स्फुलिङ्गिनी स्त्री. प्र. ए. व. 

स्फुल + इङ्गच् प्रत्यय 

विश्वरूची बहुरंगी विश्वरूची स्त्री. प्र. ए. व. 

देवी देवी स्त्री. प्र. ए. व. 

च सुद्धा अव्यय 

इति अव्यय 

लेलायमानाः फडफडणार्‍या लेलायमाना स्त्री. प्र. ब. व. 

सप्त सात सप्तन् त्रिणी लिंगानि द्वि . ब. व. 

जिह्वाः जिभा जिह्वा स्त्री. द्वि . ब. व. 

आपल्याला अग्नी कोणकोणत्या रूपात दिसतो त्याचे वर्णन ह्या मंत्रात केले आहे. शास्त्रीय दृष्ट्या निळ्या रंगाची ज्योत सर्वात चांगली मानली जाते. पिवळ्या रंगाच्या ज्योतीमुळे भांड्यांवर काजळी चढते. मिणमिणती ज्योत आपल्याला माहीत आहे. धुमसत्या अग्नीचा फक्त धूर दिसून येतो. ह्या मंत्रात अग्नीच्या 7 जीभा आहेत असे म्हटले आहे. बायबल मध्ये तर जीभेलाच अग्नी म्हटले आहे (जेम्स 3.5.6)

अग्नीतत्व हा वेगळाच समजून घेण्याचा विषय आहे.

आपल्या पचनशक्तीला जठराग्नी म्हणतात.

ह्या मंत्राचा थोडक्यात अर्थ असा की 

ज्वालांच्या सात फडफडणार्‍या जीभा, काळी, अक्राळविक्राळ, मनासारखी चंचल, लाल रंगाची, धूरकट वर्णाची, ठिणगीस्वरूपात आणि बहुरंगी देवी आहेत.

एतेषु यश्चरते भ्राजमानेषु यथाकालं चाहुतयो ह्याददायन्‌। तं नयन्त्येताः सूर्यस्य रश्मयो यत्र देवानां पतिरेकोऽधिवासः ॥ 1.2.5।।

यः भ्राजमानेषु एतेषु यथाकालम् आहुतयः आददायन् चरते तम् एताः सूर्यस्य रश्मयः यत्र एकः देवानाम् पतिः अधिवासः नयन्ति हि ।।


यः जो यद् पु. प्र. ए. व. 

भ्राजमानेषु प्रदीप्त ज्वाळांमधे 

भ्राज् धातू चमकणे शानच् प्रत्यय पु. स. ब. व. 

एतेषु यामध्ये एतद् पु. स. ब. व. 

यथाकालम् योग्य वेळी यथाकाल पु. द्वि. ए. व. 

आहुतयः आहुति स्त्री. प्र. ब. व. 

आददायन् देतो 

चरते आचरतो चर् धातू कर्तरि लट लकार प्र. पु. ए. व. 

तम् त्याला तद् पु. द्वि. ए. व. 

एताः या एतद् स्त्री. द्वि. ब. व. 

सूर्यस्य सूर्याची सूर्य पु. ष. ए. व. 

रश्मयः किरणे रश्मि स्त्री. प्र. ब. व. 

यत्र जेथे अव्यय 

एकः एक पु. प्र. ए. व. 

देवानाम् देवांचा देव पु. ष. ब. व. 

पतिः अधिपती पति पु. प्र. ए. व. 

अधिवासः निवास अधिवास पु. प्र. ए. व. 

नयन्ति घेऊन जातात नी धातू प्राप्त होणे कर्तरि लट लकार प्र. पु. ब. व.

3र्या मंत्रात नियमपूर्वक यज्ञ न केल्याचे दुष्परिणाम सांगितले होते आता ह्या मंत्रात विधिवत यज्ञ केला असता त्यापुढे काय घडते ते सांगितले आहे.

दिव् धातूपासून तयार झालेला शब्द देव म्हणजे प्रकाश देणारा, मार्ग दाखवणारा. देवांचा अधिपति म्हणजे इन्द्रदेवाचा येथे उल्लेख केला आहे. पर्जन्यदेवता असणाऱा इन्द्रदेव ही पोषण देवता आहे. ‘उदरभरण नोहे  जाणिजे यज्ञ कर्म.’याची सुरुवात पर्जन्यदेवतेपासूनच होते.

ह्या मंत्रात असे म्हटले आहे की

जो योग्य वेळी प्रदीप्त अशा ज्वाळांमधे अग्निहोत्र करून आहुती देतो त्याला त्या ज्वाळा, सूर्य किरणांप्रमाणे जेथे देवांच्या स्वामी च्या एक निवास स्थल (आहे तेथे) पोहोचवतात.

एह्येहिति तमहुतयः सुवर्चसः सूर्यस्य रश्मिभिर्यजमानं वहन्ति। प्रियं वाचमभिवदन्त्योऽर्चयन्त्य एष वः पुण्यः सुक्रोतो ब्रह्मलोकः ॥ 1.2.6 ॥

सुवर्चसः आहुतयः एहि एहि एषः वः सुकृतः पुण्यः ब्रह्मलोकः इति प्रियाम् वाचम् अभिवदन्त्यः अर्च्ययन्त्यः च तं यजमानं सूर्यस्य रश्मिभिः वहन्ति ॥


सुवर्चसः दैदीप्यमान सुवर्चस् पु. ष. ए. व. 

आहुतयः आहुत्या आहुति स्त्री. प्र. ब. व. 

एहि एहि इकडे या आङ् + इ धातू जाणे कर्तरि लोट् लकार परस्मैपद म. पु. ए. व. 

एषः हा एतद् पु. प्र. ए. व. 

वः तुमच्या युष्मद् ष. ब. व. 

सुकृतः सत्कर्माने सुकृत पु. प्र. ए. व. 

पुण्यः पुण्य पु. प्र. ए. व. 

ब्रह्मलोकः ब्रह्मलोक पु. प्र. ए. व. 

इति अव्यय 

प्रियाम् मधूर प्रिया स्त्री. द्वि. ए. व. 

वाचम् वाणी वाच् स्त्री. द्वि. ए. व. 

अभिवदन्त्यः उच्चारणार्‍या अभि + वद् + शतृँ  प्रत्यय स्त्री. प्र. ब. व.

अर्च्ययन्त्यः स्तुती करणार्‍या अ+चर् धातू शतृ प्रत्यय स्त्री. प्र. ब. व. 

च सुद्धा अव्यय 

तम् त्याला तद् पु. द्वि. ए. व. 

यजमानम् यजमान पु. द्वि. ए. व. 

सूर्यस्य सूर्याच्या सूर्य पु. ष. ए. व. 

रश्मिभिः किरणांद्वारे रश्मि स्त्री. तृ. ब. व. 

वहन्ति नेतात वह् धातू कर्तरि लट लकार प्र. पु. ब. व.

आधीच्या मंत्रात आपण योग्य पद्धतीने यज्ञ केल्यास आपल्या आहुती यजमानास इन्द्रदेवापर्यंत पोहोचवतात असे वाचले. पण हे कसे घडते त्याचे वर्णन ह्या श्लोकात काव्यात्मक रूपात केले आहे. जो मनापासून, चांगल्या भावनेने काम करतो त्याला सर्वांचेच सहकार्य मिळते. ह्या मंत्रात असे म्हटले आहे की

प्रकाशमान अशा आहुती  'इकडे या '  'इकडे या ' असा सुमधुर वाणीने स्तुती करून ब्रह्मलोकः म्हणजे तुमच्या सत्कर्माचे फळ आहे आणि त्याकडे जाण्याचा हा सुनियोजित मार्ग आहे असे सांगून यजमानांना सूर्याच्या किरणांद्वारे तिकडे घेऊन जातात.

प्लवा ह्येते अदृधा यज्ञरूपा अष्टादशोक्तमवरं येषु कर्म। एतच्छ्रेयो येऽभिनन्दन्ति मूढा जरामृत्युं ते पुनरेवापि यान्ति ॥ 1.2.7 ॥

एते हि अष्टादश यज्ञरूपाः प्लवाः अदृढाः येषु अवरम् कर्म उक्तम्। ये मूढ़ाः एतत् श्रेयः इति अभिनन्दन्ति ते पुनः अपि जरामृत्युं यान्ति एव ॥


एते या एतद् पु. प्र. ब. व. 

हि खरोखर अव्यय 

अष्टादश अठरा 

यज्ञरूपाः यज्ञरूपी यज्ञरूप पु. प्र. ब. व. 

प्लवाः नौका प्लव पु. प्र. ब. व. 

प्लु धातू जाणे 

अदृढाः बेभरवशाच्या अदृढ पु. प्र. ब. व. 

येषु ज्यांच्या मध्ये यद् पु. स. ब. व. 

अवरम् निकृष्ट अवर पु. द्वि. ए. व. 

वृ धातू पसंत करणे 

कर्म कर्मन् नपु प्र. ए. व. 

उक्तम् सांगितले आहे उक्त नपु. प्र. ए. व. 

ये जे मूर्ख यद् पु. प्र. ब. व. 

मूढ़ाः मूढ पु. प्र. ब. व. 

एतत् हे एतद् नपु. प्र. ए. व. 

श्रेयः श्रेयस्कर श्रेय पु. प्र. ए. व. 

इति असे अव्यय 

अभिनन्दन्ति प्रशंसा करतात अभि+नन्द् धातू वृद्धि होणे कर्तरि लट लकार प्र. पु. ब. व. 

ते ते तद् पु. प्र. ब. व. 

पुनः पुन्हा अव्यय 

अपि सुद्धा अव्यय 

जरामृत्युं वृद्धत्व आणि मृत्यू 

यान्ति प्राप्त होतात 

एव पुन्हा अव्यय

आता हळूहळू उपनिषदातील मुख्य गाभा म्हणजे परा विद्येची ओळख करून देण्याची सुरुवात ह्या मंत्रापासून होते आहे असे वाटते.

यज्ञकर्म करण्यासाठी 16 ऋत्विज् आणि यजमान व त्यांच्या पत्नी अशा 18 जणांची उपस्थिती अपेक्षित असते. 16 ऋत्विज् पैकी 4 जण प्रमुख 

होतृ, अध्वर्यु,उद्भाता आणि ब्रह्मा. ह्यांना जोड देणारे 12 जण पुढीलप्रमाणे मैत्रावरुण, प्रतिप्रस्थाता, ब्राह्मणच्छंसी, प्रस्तोता, अच्छावाक्, नेष्टा, आग्नीध्र, प्रतिहर्त्ता, ग्रवस्तुत्, उन्नेता, पोता और सुब्रह्मण्य.

ऋग्वेदात ऋत्विजांसंबंधी मंत्र सापडतो. 

तवग्ने होत्रं तव पोत्रमृत्वियं तव नेष्ट्रं त्वमग्निदृतायतः। तव प्रशास्त्रं त्वमध्वरीयसि ब्रह्मा चासि गृहपतिश्च नो दमे ॥ऋग्वेद 2.1.2॥

मनुस्मृति 2.143 मध्ये ऋत्विज् संबंधी श्लोक दिसून येतो.

अग्निधेयं पकायज्ञनाग्निष्टोमादिकं माखन | यः करोति वृतो यस्य स तस्यर्त्विगिहोच्यते ||मनुस्मृति।। 2. 143 ||

यज्ञकर्म ह्या शब्दाचा विस्तृत अर्थ आपण श्रीमद्भगवद्गीता वाचताना समजून घेतला आहे तसेच कर्मयोग सुद्धा समजून घेतला आहे. आपल्या आयुष्याचा हेतू आपल्याला उमगायला हवा. यज्ञ म्हणजे विशिष्ट हेतूने केलेला प्रकल्प. आपल्या स्वार्थासाठी केलेला यज्ञ निकृष्ट आणि त्याची कर्मफळे सुद्धा. कर्मयोगी आपल्या कर्माकडे परमेश्वराचे कर्म असे मानतो आणि निष्काम भावाने कर्म करतो. आपला समाजात कर्मकांडांना अवास्तव महत्त्व दिले गेले आहे. ह्या श्रुतीच्या निमित्ताने आपल्या विचारांना चालना मिळत आहे. 

ह्या मंत्राचा थोडक्यात अर्थ असा की

ज्यामध्ये निकृष्ट कर्म सांगितले आहे, जे अठरा जणांच्या सहभागाने केले जाते असे यज्ञ म्हणजे अस्थिर नौका आहेत. पण हेच यज्ञ श्रेयस्कर अशी भलावण जे मूर्ख करतात ते पुन्हा पुन्हा वृद्धत्व आणि आणि मृत्यू ला सामोरे जातात.

अविद्ययामन्तरे वर्तमानाः स्वयं धीराः पण्डितं मन्यमानाः।जङ्घन्यमानाः परियन्ति मूढ़ा अन्धेनैव नीयमाना यथान्धाः ॥1.2.8।।

अविद्ययाम् अंतरे वर्तमानाः स्वयं धीराः पंडितं मन्यमानाः जड्ःघन्यमानाः मूढ़ाः अंधेन एव नीयमानाः अंधाः यथा परियन्ति ॥


अविद्ययाम् अंतरे वर्तमानाः कायम अविज्ञेत राहणारे

अविद्ययाम्  अविद्या स्त्री. स. ए. व. 

अंतरे  अव्यय (अन्तर+इ धातू जाणे, अंतर ठेवून असणे +विच् प्रत्यय कृदन्त नपु.स. ए. व.) 

वर्तमानाः वर्तमान पु. प्र. ब. व. 

स्वयं स्वतः सु+अय नपु. प्र. ए. व. 

धीराः बुद्धिमान धीर पु. प्र. ब. व. 

पंडितम् पंडित पु. द्वि. ए. व. 

मन्यमानाः मानणारे मन्यमान पु. प्र. ब. व. 

मान् धातू ज्ञान प्राप्तीची इच्छा करणे 

जड्ःघन्यमानाः पीडित होत राहतात 

जड्ःघन्यमान पु. प्र. ब. व. 

हन् धातू मारणे यड्ःन्त प्रत्यय जड्ःघन्यते शानच् रूप

मूढ़ाः मूर्ख मूढ पु. प्र. ब. व. 

अंधेन अंधांकडून अंध पु. तृ. ए. व. 

एव सुद्धा अव्यय 

नीयमानाः नेल्या जाणाऱ्या नीयमान नी धातू नेणे  कर्मणि शानच्

अंधाः अंधांसारखे अंध पु. प्र. ब. व. 

यथा जसे अव्यय 

परियन्ति भ्रमण करतात परि+इ धातू जाणे कर्तरि लट् लकार प्र. पु. ब. व.

आधीच्या मंत्रात पुनः म्हणजे वारंवार असा शब्द वापरला होता आता ह्या श्लोकात धातू ची यड्ःन्त रूपे वापरली आहेत.

श्रुती मधील एकेक मंत्र आपल्याला जीवनकोशल्ये शिकवतात. ज्ञान मिळवणे महत्त्वाचे आहेच पण ते सतत मिळवत राहिले पाहिजे. आपल्याला पूर्ण ज्ञान प्राप्त झाले आहे असे ठामपणे म्हणता येत नाही कारण सतत निरनिराळे पैलू आपल्यासमोर उलगडत राहतात. फक्त ते समजून घेण्याची आपली तयारी हवी त्यासाठी आपली दृष्टी चौफेर असावी हे समजावून सांगताना अंध व्यक्तीचे उदाहरण दिले आहे. जी व्यक्ती अंध आहे ती दुसर्‍यांना मार्ग दाखवू शकत नाही. आधीच्या मंत्राचा संदर्भ घेऊन ला मंत्र वाचला तर मोक्ष मिळवण्याचा मार्ग ज्ञानप्राप्ती आहे असे लक्षात येते. त्याही पुढे जाऊन निरर्थक कर्मकांडे करण्यात वेळ न घालवता परा विद्या प्राप्त करण्यासाठी प्रयास करायला हवे. आणखी पुढे जाऊन विचार केला तर माणसाने आपली कुवत ओळखून दुसर्‍याला उपदेश द्यायला हवा असे सुद्धा येथे म्हटले आहे. ह्या मंत्राचा थोडक्यात अर्थ असा की

जे लोक अज्ञानी असून स्वतःला बुद्धिमान पंडित समजतात ते खरे तर मूर्ख असतात आणि अंध व्यक्तीप्रमाणे चाचपडत जाणाऱ्या व्यक्तीसारखे मार्गक्रमण करतात.

अविद्यायां बहुधा वर्तमान वयं कृतार्था इत्यभिमन्यन्ति बालाः। यत्कर्मिणो न प्रवेदयन्ति रागात् तेनातुराः क्षीणलोकश्च्यवन्ते ॥1.2.9।।

अविद्यायाम् बहुधा वर्तमानाः बालाः वयम् कृतार्थाः इति अभिमन्यन्ति। यत् कर्मिणः रागात् न प्रवेदयन्ति तेन क्षीणलोकाः आतुराः च्यवन्ते॥


अविद्यायाम् अविद्येत अविद्या स्त्री. स. ए. व. 

बहुधा बहुतांश अव्यय बहु+धा 

वर्तमानाः असणारे वर्तमान पु. प्र. ब. व. 

बालाः बालबुद्धिचे बाल पु. प्र. ब. व.  

वयम् आम्ही अस्मद् प्र. ब. व. 

कृतार्थाः धन्य कृतार्थ पु. प्र. ब. व. 

इति असे अव्यय 

अभिमन्यन्ति विचार करतात अभि+मन् धातू अवबोधणे 

यत् जे यद् नपु प्र. ए. व. 

कर्मिणः कर्माचे अनुयायी कर्मिन् पु. प्र. ब. व. 

रागात् आसक्तीने राग पु. पं. ए. व. 

रञ्ज् धातू रंगणे घञ् प्रत्यय 

न अव्यय 

प्रवेदयन्ति जाणत नाहीत प्र+वेद् धातू णिच् कर्तरि लट् लकार प्र. पु. ब. व. 

तेन त्यांच्या कडून तद् पु. तृ. ए. व. 

क्षीणलोकाः (कर्म फले) क्षीण झाल्यावर 

क्षीणलोक पु. प्र. ब. व. 

क्षि धातू + क्तः प्रत्यय 

आतुराः (दुःखाने) आतुर आतुर पु. प्र. ब. व.

आङ् + तुर धातू  शीघ्रता करणे+ क प्रत्यय 

च्यवन्ते च्युत होतात च्यु धातु जाणे कर्तरि लट् लकार आत्मनेपद प्र. पु. ब. व.

हा मंत्र वाचला की त्या काळातील विशेषणे वापरण्याची पद्धत आणि आताची पद्धत फारशी वेगळी नसावी असे वाटते. जसे ह्या मंत्रात बाल हा शब्द बालबुद्धी म्हणजे अज्ञानी असा वापरला आहे. येथे वयाचा संबंध नाही. ज्ञानेश्वरांनी तर 15 व्या वर्षीच आत्मानुभव लिहिला. रञ्ज् धातू पासून तयार झालेला शब्द राग म्हणजे आसक्ती दर्शवतो. म्हणजे आधीच बालबुद्धी आणि त्याबरोबर विषयआसक्ती सुद्धा. आधीच्या मंत्रांचा अर्थ लक्षात ठेवून ह्या मंत्राचा अर्थ लावायला हवा. कारण आधीच्या मंत्रात अपरा विद्या चा अर्थ सांगून कर्मकांडांवर टीका केली आहे. तसेच कर्मकांडांवर सीमित राहून पुढील प्रगतीचा मार्ग बंद केल्यास दुःखदायक परीणाम होतील असे ह्या मंत्रात स्पष्ट म्हटले आहे. 7व्या मंत्रात असे म्हटले होते की कर्मकांडाची भलावण करणारे पुन्हा पुन्हा जीवनमरणाच्या फेर्‍यात अडकतात. ह्या मंत्रात असे लोक पदच्युत होतात असे म्हटले आहे.

ह्या मंत्राचा थोडक्यात अर्थ असा की

नाना प्रकारांच्या अविद्येत तच रममाण असलेले बालबुद्धीचे लोक त्यातच धन्यता मानतात. पण आसक्ती युक्त कर्मी हे समजू शकत नाहीत की त्यांच्या पुण्यकर्मांची फळे क्षीण झाली की त्यांचे अधःपतन होते.

इष्टापूर्तं मन्यमाना वरिष्ठं नान्यच्छ्रेयो वेदयन्ते प्रमूढ़ाः नाकस्य पृष्ठे ते सुकृतेऽनुभूत्वा लोकं हीनतरं वा विशन्ति ॥ 1.2.10 ॥ 

इष्टापूर्तं वरिष्ठं मन्यमानाः प्रमूढाः अन्यत् श्रेयः  न वेदयन्ते ते सुकृते नाकस्य पृष्ठे अनुभूत्वा इमं लोकं हीनतरं वा विशन्ति ॥


इष्टापूर्तं  श्रौतकर्म आणि स्मार्त कर्म 

इष्टापूर्त नपु. प्र. ए. व. 

यज् धातू + क्त प्रत्यय 

केटी प्रत्यय (इष्ट) 

पॄ धातू पालन करणे + भावे क्तः प्रत्यय

वरिष्ठं सर्वोत्तम वरिष्ठ नपु. प्र. ए. व. वर धातू +इष्ठन्

मन्यमानाः मानणारे मन्यमान पु. प्र. ब. व. 

प्रमूढाः अज्ञ माणसे प्र+मूढ पु. प्र. ब. व. 

अन्यत् दुसरे सर्वनाम अन्+यत् 

श्रेयः श्रेयस्कर श्रेय पु. प्र. ए. व. 

न अव्यय 

वेदयन्ते जाणत नाहीत प्र+वेद धातू जाणणे णिच् कर्तरि लट लकार प्र. पु. ब. व. 

ते ते तद् पु. प्र. ब. व. 

सुकृते सत्कर्माचे फळ सुकृत पु. स. ए. व. 

नाकस्य पृष्ठे स्वर्गाची पाठ 

नाक पु. ष. ए. व. 

कं - सुख

अकं-दुःख 

न+अकं=नाकं (जेथे दुःख नाही असा, स्वर्ग) 

पृष्ठ पु. स. ए. व. 

अनुभूत्वा अनुभवून अनु+भू धातू असणे +क्त्वा प्रत्यय 

इमं या इदम् पु. द्वि. ए. व. 

लोकं लोकात लोक पु. द्वि. ए. व. 

हीनतरं निम्न हीनतर नपु. प्र. ए. व. 

हीन+तरप् प्रत्यय 

हा धातू त्यागणे +क्तः प्रत्यय 

वा किंवा अव्यय 

विशन्ति प्रवेश करतात विश् धातू प्रवेश करणे कर्तरि लट लकार प्र. पु. ब. व.

ध्यानयोगाचा अभ्यास केला असता परमेश्वराला जोडून घेता येते. कोणतेही कर्मकांड केल्याशिवाय हे शक्य आहे. हे आपण पतंजली योगसूत्राद्वारे जाणतो.

अन्न वस्त्र निवारा ह्या प्राथमिक गरजांपैकी शेती करणे, घरे बांधणे हे आपापले करता येते. मात्र पाण्याची सोय सार्वजनिकरीत्या करावी लागते. म्हणूनच तलाव आणि विहीर खोदणे अशा कर्मांना पूर्त कर्म असे म्हणतात तर यज्ञयाग प्रकारच्या कर्मांना इष्ट कर्म असे म्हणतात. अशी कर्मे केली असता स्वर्गप्राप्ती होते पण ती तात्पुरत्या स्वरूपात. मोक्षप्राप्ती हवी असेल तर त्यासंबंधीचे ज्ञान प्राप्त करणे आवश्यक आहे. उपनिषदांतील हे मन्तव्य अतिशय महत्त्वाचे. ह्या मध्ये एक महत्वाचा मुद्दा सांगितला आहे की सर्व साधारण जो आपला समज असतो की एकदा मानवी जन्म मिळाला की इतर योनी मध्ये पुनर्जन्म होत नाही, हा समज खोटा ठरविला आहे. दुष्कर्म केल्यास पशूयोनीत पुनर्जन्म होऊ शकतो. 

ह्या मंत्रात असे म्हटले आहे की

यज्ञ, दान इत्यादी कर्मे सर्वोत्तम मानणारे लोक अज्ञानी असतात. त्यांना आणखी कल्याणकारी मार्ग माहीत नसतात. त्यांच्या सत्कर्मांच्या फळांचे स्वर्गलोकात उपभोग घेतल्यावर ते पुन्हा ह्या लोकांत (मानवी देहात) किंवा आणखी निम्न स्तरांत प्रवेश करतात.

तपःश्रद्धे ये ह्युपवसन्त्यरण्ये शान्ता विद्वांसो भैक्ष्यचर्यां चरन्तः। सूर्यद्वारेण ते विरजाः प्रयान्ति यत्रामृतः स पुरुषो ह्यव्ययात्मा ॥1.2.11 ॥ 

ये हि शान्ताः विद्वांसः भैक्षचर्यां चरन्तः अरण्ये तपःश्रद्धे उपवसन्ति ते विरजाः सूर्यद्वारेण यत्र सः अमृतः अव्ययात्मा पुरुषः प्रयान्ति ॥


ये जे यद् पु. प्र. ब. व. 

हि खरोखर अव्यय 

शान्ताः संयमाने शान्त पु.. ब. व. 

विद्वांसः विद्वान विद्वस् पु. प्र. ब. व. 

भैक्षचर्यां भिक्षा वृत्ती भैक्षचर्या स्त्री. द्वि. ए. व. 

भैक्ष भिक्षाणां समूह

चरन्तः राहतात चरत् पु. प्र. ब. व. 

अरण्ये वनात अरण्य नपु. स. ए. व. 

तपःश्रद्धे तप आणि श्रद्धा तपःश्रद्धा स्त्री. प्र. द्वि. व. 

उपवसन्ति राहतात उप+वस् धातू कर्तरि लट् लकार प्र. पु. ब. व. 

ते ते तद् पु. प्र. ब. व. 

विरजाः पवित्र विरजा स्त्री. प्र. ब. व. 

वि+रञ्ज् धातू +णिच्+अच् प्रत्यय 

सूर्यद्वारेण सूर्य मार्गाने सूर्यद्वार नपु. तृ. ए. व. 

यत्र जेथे अव्यय 

सः तो तद् पु. प्र. ए. व. 

अमृतः अ+मृत् अमृत पु. प्र. ए. व. 

अव्ययात्मा अविनाशी अव्ययात्मन् पु. प्र. ए. व. 

वि+इ धातू जाणे 

पुरुषः पुरूष पु. प्र. ए. व. 

प्रयान्ति जातात प्र+या जाणे धातू कर्तरि लट लकार प्र. पु. ब. व.

आकाश आणि पृथ्वीला रोज जोडणारा दुवा म्हणजे सूर्यकिरणे जी रोज दृश्य स्वरूपात आपल्याला दिसून येतात. तसा पाऊस काही काळापुरताच असतो. स्वर्ग हा आकाशाच्या दिशेला ही आपली ठाम समजूत आहे. तर स्वर्ग प्राप्ती कोणाला होते ते सांगणारा हा मंत्र. येथे भैक्षचर्या म्हणजे भिक्षा मागून जीवन जगण्याचा उल्लेख केला आहे. तसेच अरण्यात तप करण्याचा उल्लेख आहे. थोडक्यात मिताहारी, तप करण्यासाठी एकांतात राहणारा. अरण्यात कोणत्याही सुखसुविधांशिवाय भिक्षा मागून शरीराला कष्ट देऊन तप करण्यात जीवन व्यतीत करता करता मानसिक आणि शारीरिक शुद्धी (आसक्तीविरहीत) झाली की आपोआपच मोक्ष मिळण्याचा मार्ग मोकळा होतो.

ह्या मंत्रात असे म्हटले आहे की

परन्तु जे विद्वान अरण्यात भिक्षाचर्य अनुसरून तप करून शुद्धी प्राप्त करतात ते सूर्य किरणांच्या मार्गाने मृत्यूरहीत आणि अविनाशी पुरुषांच्या स्थानी पोहोचतात.

परीक्ष्य लोकान्‌ कर्मचितान्‌ ब्राह्मणो निर्वेदमायान्नास्त्यकृतः कृतेन। तद्विज्ञानार्थं स गुरुमेवाभिगच्छेत्‌ समित्पाणिः श्रोत्रियं ब्रह्मनिष्ठम्‌ ॥1.2.12।। 

कर्मचितान् लोकान् परीक्ष्य ब्राह्मणः निर्वेदम् आयात्। कृतेन अकृतः न अस्ति तत् - विज्ञानार्थं सः समित्पाणिः श्रोत्रियं ब्रह्मनिष्ठं गुरुम् एव अभिगच्छेत् ॥


कर्मचितान् कर्म संचित कर्मन् +चि धातू गोळा करणे क्त प्रत्यय पु द्वि. ब. व.

लोकान् लोकांचे लोक पु. द्वि. ब. व.

परीक्ष्य परीक्षण करून परी+ईक्ष् धातू निरीक्षण करणे ल्यप प्रत्यय

ब्राह्मणः ब्राह्मण पु. प्र. ए. व.

निर्वेदम् नास्तिक, वैराग्य निर्वेद पु. द्वि. ए. व.

निर+विद् धातू जाणणे 

आयात् प्राप्त करून आङ् + या धातू जाणे + क्तः कर्तरि लड्ः लकार प्र. पु. ए. व. 

कृतेन कर्माने कृत नपु. तृ. ए. व.

अकृतः शाश्वत अकृतः अकृत पु. प्र. ए. व.

न अव्यय 

अस्ति आहे अस् धातू असणे अदादि गण कर्तरि लट लकार प्र. पु. ए. व. 

तत् ते तद् नपु. प्र. ए. व. 

विज्ञानार्थं ज्ञान मिळवण्यासाठी विज्ञान+अर्थ नपु. द्वि. ए. व. 

सः तो तद् पु. प्र. ए. व. 

समित्पाणिः हातात समिधा घेऊन 

समित्पाणि पु. प्र. ए. व. 

समित् +पाणि 

समिध् पु/स्त्री. प्रथमा ए.व.

समिधः पाण्योः यस्य सःसमित्पाणि।

श्रोत्रियं शास्त्र पारंगत श्रोत्रिय पु. द्वि. ए. व. 

श्रु धातू ऐकणे तृच्छ् प्रत्यय 

ब्रह्मनिष्ठं ब्रह्मनिष्ठ पु. द्वि. ए. व. 

गुरुम् गुरु पु. द्वि. ए. व. 

एव सुद्धा अव्यय 

अभिगच्छेत् जावे अभि+गम् धातू जाणे कर्तरि विधीलिडः लकार प्र. पु. ए. व.

आधीच्या मंत्रात मोक्ष प्राप्तीचा मार्ग सांगितला. अरण्यात जाऊन आसक्ती विरहित होऊन तप करायचे आहे. मोक्ष मिळण्याची प्रक्रिया ही साधीसुधी नव्हे. त्यासाठी अपरा विद्येच्या पलिकडे जाऊन ज्ञान मिळवायचे आहे. जे अपरा विद्येचे ज्ञात आहेत त्यांचा तपशीलवार अभ्यास करायचा आहे. त्यांच्या कडून केली गेलेली यज्ञकर्मे कामना आणि वासना अशा दोषयुक्त व्यक्तींनी केली होती की ते दोषमुक्त होते? हे सर्व जाणून घेऊन आपला पुढचा मार्ग ठरवायचा आहे. ह्या सर्व प्रक्रियांना परीक्ष्य असे म्हटले आहे. परीक्षा करण्यासाठी अनुभव, अनुमान, उपमा आणि आगम हे निकष लावायचे असा शंकरभाष्यामधे उल्लेख आहे. 10 व्या मंत्रात लोक स्वर्गात आपली कर्मफळे भोगून, इहलोकात परत येतात असे म्हटले आहे. आपल्याला अढळपद मिळवायचे आहे. ब्राह्मण ह्या शब्दाचा व्यापक अर्थ समजून घेणे खूप आवश्यक आहे. त्यासाठी विज्ञानार्थं ह्या शब्दाचा आधार घेता येईल. ब्राह्मण म्हणजे ज्ञान प्राप्ती मुळे प्रगल्भता आणि उन्नत असा व्यक्ती . कर्मकांडे करणारा नव्हे. तो श्रोत्रिय म्हणजे सर्व शास्त्रांत पारंगत आहे. आणि तो आपल्या ज्ञानाचा सर्वार्थाने उन्नतीसाठी वापर करत आहे. तो ब्रह्मनिष्ठ आहे म्हणजे त्याला परमतत्त्वाची स्वानुभूती प्राप्त झाली आहे. म्हणजे फक्त कर्मयोगावर विसावून चालणार नाही त्याबरोबर ज्ञानयोग सुद्धा हवा. त्याचबरोबर कठोर तपश्चर्या सुद्धा करायची आहे. असा मनाचा दृढ निश्चय झाला की हातात समिधा घेऊन गुरुकडे जायचे आहे. समिधा हे गुरूसमोर संपूर्णपणे शरणागती पत्करण्याचे प्रतिक आहे. समिधा म्हणजे निरनिराळ्या वनस्पतींच्या काटक्या ज्या ज्वलनशील आहेत, म्हणजे सर्व नकारात्मक गोष्टीं जळून गेल्या आहेत. अशी अंतर्बाह्य पवित्रता अकृत म्हणजे शाश्वत अशा परमतत्त्वाची अनुभूती घेण्यास सिद्ध होत आहे.

ह्या मंत्राचा थोडक्यात अर्थ असा की

कर्म संचिताचे प्राप्त झालेले फळ हे शाश्वत नाही हे समजून घेऊन ब्राह्मणाने (साधकाने) वैराग्ययुक्त होऊन, ज्ञान प्राप्ती साठी श्रुतिसंपन्न, ब्रह्मनिष्ठ अशा गुरूकडे हातात समिधा घेऊन जावे.

तस्मै स विद्वानुपसन्नाय सम्यक्‌ प्रशान्तचित्ताय शमान्विताय। येनाक्षरं पुरुषं वेद सत्यं प्रोवाच तां तत्त्वतो ब्रह्मविद्याम्‌ ॥1.2.13।।

सः विद्वान् प्रशान्तचित्ताय शमान्विताय सम्यक् उपसन्नाय तस्मै येन सत्यम् अक्षरम् पुरुषं वेद तां ब्रह्मविद्यां तत्वतः प्रोवाच ॥


सः तो तद् पु. प्र. ए. व. 

विद्वान् विद्वस् पु. प्र. ए. व. 

प्रशान्तचित्ताय चित्त शांत झालेल्या 

प्रशान्तचित्त पु. च. ए. व. 

शमान्विताय मन ताब्यात असलेला असा 

शम+अन्वित पु. च. ए. व. 

अनु+इण् धातू जाणे क्त प्रत्यय 

सम्यक् उचित सम्यक् पु. प्र. ए. व. सं+अञ्च धातू पूजा करणे  क्विन् प्रत्यय 

उपसन्नाय समीप आलेल्या उपसन्न उप+सद् धातू क्त प्रत्यय पु. च. ए. व. 

तस्मै त्याला तद् पु. च. ए. व. 

येन ज्यायोगे यद् पु. तृ. ए. व. 

सत्यम् सत्य नपु. द्वि. ए. व. 

अक्षरम् अविनाशी अक्षर नपु. द्वि. ए. व. 

पुरुषम् पुरूष पु. द्वि. ए. व. 

वेद जाणतो विद् धातू कर्तरि लट लकार प्र. पु. ए. व. 

ताम् ती तद् स्त्री. द्वि. ए. व. 

ब्रह्मविद्याम् ब्रह्मविद्या स्त्री. द्वि. ए. व. 

तत्वतः खरोखर अव्यय 

प्रोवाच सांगावी प्र+ब्रू धातू बोलणे कर्तरि लिट् लकार परस्मैपद प्र. पु. ए. व.

आधीच्या मंत्रात परब्रह्माच्या शोधात असलेल्या शिष्याने गुरूकडे समिधा घेऊन जावे हे सांगताना शिष्याची पात्रता काय असावी ते सांगितले होते. साधक स्थिर बुद्धीचा, मन अतिशय निश्चल असून त्याने मनावर पूर्ण ताबा मिळवला आहे. शम म्हणजे आसक्तीविरहीत. शिष्याची ब्रह्मविद्या संपादन करण्याची एवढी तयारी झाली असेल तर गुरु कल्पनातीत ज्ञानी असणारच. ब्रह्मविद्या शिकवणारा गुरू हा साक्षात तेजच. आता ह्या मंत्रात गुरूजनांनी शिष्यांशी कसे वागावे ह्या संबंधी सूचना दिल्या आहेत.

गुकारस्त्वन्धकारस्तु रुकार स्तेज उच्यते । अन्धकार निरोधत्वात् गुरुरित्यभिधीयते ॥

‘गु’कार म्हणजे अंधकार,  ‘रु’कार म्हणजे प्रकाश जो अंधकार संपवतो (ज्ञान  प्रकाश देऊन ) त्याला गुरु असे म्हणतात.

गुरौ न प्राप्यते यत्तन्नान्यत्रापि हि लभ्यते। गुरुप्रसादात सर्वं तु प्राप्नोत्येव न संशयः।। 

गुरु कडून जे ज्ञान प्राप्त होत नाही, ते इतरही कुठेच मिळत नाही. गुरु ची कृपाच निःसंशय (माणसाला ) वरदान असते.

उपनिषद् ह्या शब्दाचा अर्थच गुरूच्या जवळ जाऊन बसणे. 

ब्रह्मविद्या म्हणजे काय ते संक्षिप्तपणे आपण सर्वात पहिल्या (1.1.1)मंत्रात वाचले.

आपल्या आयुष्यातील अंधकार नष्ट करणारी ती ब्रह्मविद्या. हि विद्या सत्य, अक्षर अशा पुरुषाला जाणून घेतल्याने प्राप्त होणार आहे.

अक्षर ह्या शब्दाचा अर्थ विस्ताराने सांगण्यासाठी शंकरभाष्यामधे तीन शब्द वापरले आहेत.

क्षर धातूपासून तयार झालेला शब्द क्षरण म्हणजे धूप होणे 

क्षण् धातू +क्त प्रत्यय पासून झालेला शब्द म्हणजे क्षत आघात होणे (गुणवत्ता कमी होणे) 

क्षि धातू म्हणजे र्‍हास होणे पासून क्षय 

थोडक्यात जे अक्षर आहे त्याचा र्‍हास होत नाही, त्याच्या गुणवत्तेत फरक पडत नाही किंवा त्याची धूप होत नाही. 

ह्या मंत्राचा थोडक्यात अर्थ असा की 

चित्त शांत असलेल्या, मनावर ताबा मिळवलेल्या  शिष्याला जो ज्ञानी गुरुंच्या जवळ आला आहे, त्याला ज्यायोगे सत्य अक्षर पुरूषाचे ज्ञान होते अशी ब्रह्मविद्या, तत्वतः उचित प्रकारे शिकवावी. 


|| इति मुण्डकोपनिषदि प्रथममुन्दके द्वितीयः खण्डः ||

मुण्डकोपनिषद् मधील प्रथम मुण्डकातील दूसरा भाग  येथे संपन्न झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा